संरक्षण मंत्रालय

हिंद-प्रशांत क्षेत्रात सुरक्षाविषयक निव्वळ पुरवठादार म्हणून भारत उदयाला येत आहे- आग्रा येथे 'समन्वय-2022' या बहुसंस्थात्मक एचएडीआर सरावाच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन


भविष्यातील नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी माहिती, संसाधने व सामग्रीची देवाणघेवाण करण्याचे राजनाथ सिंह यांचे आवाहन

Posted On: 29 NOV 2022 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2022

 

नजीकच्या काळात भारतीय नागरिकांना तसेच प्रादेशिक भागीदारांना मानवहितार्थ मदत पुरवण्याबाबत तसेच आपत्कालीन सहाय्य पुरवण्याबाबत भारताच्या क्षमतेत वाढ झाल्यामुळे,  एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून प्रादेशिक स्तरावर भारताचा उदय झाला असून हिंद-प्रशांत क्षेत्रात सुरक्षाविषयक निव्वळ पुरवठादार म्हणून भारताला ओळख मिळाली आहे. उत्तरप्रदेशात आग्रा येथे समन्वय-2022 या- एच.ए.डी.आर. अर्थात मानवहितार्थ मदत आणि आपत्कालीन सहाय्य उपक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे प्रतिपादन केले. या उपक्रमात अनेक संस्थांचा सहभाग होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सागर (SAGAR - प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास)' कार्यक्रमांतर्गत, भारत अनेक भागीदारांना सहकार्य करत असून, प्रदेशात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्वांच्या आर्थिक विकास आणि सुरक्षेची खबरदारी घेणे, हा यामागील उद्देश आहे- असेही राजनाथ सिंह म्हणाले. आशियाला- विशेषतः हिंद-प्रशांत क्षेत्राला हवामानबदलाची झळ बसण्याचा धोका अधिक आहे असे नमूद करून संरक्षमंत्री सिंह यांनी विश्वास व्यक्त केला की- समन्वय-2022 मध्ये मित्रराष्टत्रांसोबत राष्ट्रीय स्तरावरील भागीदारानी भाग घेतल्यास आपत्ती व्यवस्थापन क्षमतांमध्ये आणखी वाढ होईल.

नैसर्गिक आपत्तींचे पूर्वानुमान काढण्याबरोबरच मोठ्या लोकसंख्येपर्यंत माहितीचे प्रसारण होणे व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणेही आवश्यक आहे, हे संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले. यासाठी यंत्रणेला सक्षम केले पाहिजे.

भारतात आणि अन्य देशांतही सहाय्य पुरवण्यात यशस्वी ठरलेल्या भारताच्या भक्कम एचएडीआर यंत्रणेविषयी तपशील देत सिंह म्हणाले की, "सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे या रचनेला अधिक बळकटी आली आहे."

एच.ए.डी.आर.शी संबंधित कामांमध्ये सहभागी असलेल्या विविध संस्थांना एकत्र आणण्याबद्दल त्यांनी समन्वय 2022 उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातील नैसर्गिक आपत्तींशी दोन हात करण्याच्या दिशेने समन्वयाने प्रयत्न करण्यासाठी या उपक्रमामुळे एक रचना उदयाला आली आहे, असे ते म्हणाले. सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातूनही आपत्ती बचाव यंत्रणा बळकट असणे महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी भर दिला.

तत्पूर्वी, या उपक्रमांतर्गत क्षमता दर्शक कार्यक्रमाची पाहणी केली. यामध्ये, SU-30 विमाने तसेच वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांनी केलेल्या हवाई प्रात्यक्षिकांचा समावेश होता. विविध संस्थांच्या एच.ए.डी.आर.संबंधी मालमत्तांच्या प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. आपत्ती-व्यवस्थापन क्षेत्रातील भारताच्या वाढत्या क्षमतांचे यात दर्शन घडवण्यात आले होते.

        

N.Chitale/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 



(Release ID: 1879872) Visitor Counter : 167


Read this release in: English , Urdu , Hindi