महिला आणि बालविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री स्मृती झुबीन इराणी यांनी विविध बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षांना देशभरात बाल संरक्षणासाठी बाल न्यायविषयक नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे केले आवाहन, मुलांच्या सुरक्षेसाठी समाजाने संघटित होणे आवश्यक असल्यावर दिला भर
Posted On:
20 NOV 2022 6:44PM by PIB Mumbai
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने GHAR - GO Home and Re-Unite (मुलांचे पुनर्वसन आणि प्रत्यावर्तन) या पोर्टल सोबत "बाल कल्याण समित्यांसाठी प्रशिक्षण मॉड्युल्स तसेच मुलांचे पुनर्वसन आणि प्रत्यावर्तन करण्यासाठीचे नियम प्रसिद्ध केले. आज 20 नोव्हेंबर, जागतिक बाल दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाला महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव इंदिवर पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0010DFY.jpg)
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002R593.jpg)
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0032W0V.jpg)
एका दृकश्राव्य संदेशात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी बाल संरक्षणासंदर्भात राष्ट्रीय स्तरावरील पहिला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, बालहक्कांच्या रक्षणासाठी बाल कल्याण समित्या खूप मोलाची भूमिका बजावत आहेत. बाल संरक्षणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना, स्मृती इराणी यांनी सर्व बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षांना आवाहन केले की संपूर्ण देशभरात बाल हक्क संरक्षणासाठी कायदा आणि नियम, 2021 आणि 2022 मधील सुधारणा अंमलात आणण्यासाठी आपले सर्वोत्तम योगदान द्यावे. नियम आणि प्रशिक्षण मॉड्यूल्स तयार करण्याच्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. बालकांच्या रक्षणासाठी समाजाने एकजूट व्हायला हवे, यावरही त्यांनी भर दिला.
![Image](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0048DFF.jpg)
याप्रसंगी बोलताना इंदिवर पांडे म्हणाले की, भारताला बाल संरक्षणासाठी बाल न्याय नियमांमध्ये प्रमाणित प्रोटोकॉल आणि एकसमानता अंमलात आणण्याची गरज आहे. कोविड 19 महामारीच्या काळात बालकल्याण समित्या आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षांनी केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत, कोविड-19 साथीच्या रोगाच्या काळादरम्यान अशा सुमारे 4345 मुलांची ओळख पटली ज्यांनी त्यांचे दोन्ही पालक गमावले होते. त्यांना पीएम केअर योजनेंतर्गत मदत देण्यात आली. दर 3 महिन्यांनी या मुलांच्या परिस्थितीवर जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे आणि या बालकांना शिक्षण आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत मिळेल याची खात्रजमा करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877579)
Visitor Counter : 191