आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

अतिसार आजार आणि पोषण (एएससीओडीडी ) या विषयावरील 16 व्या आशियाई परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी केले संबोधित


भूतकाळात आलेल्या अनुभवांवरून बोध घेऊन संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करणे अनिवार्य :डॉ भारती प्रवीण पवार

Posted On: 11 NOV 2022 1:22PM by PIB Mumbai

कोलकाता येथे आयोजित अतिसार आजार  आणि पोषण (एएससीओडीडी ) या विषयावरील   16 व्या आशियाई परिषदेला     केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी आज संबोधित केले. पश्चिम बंगालचे आरोग्य सचिव नारायण स्वरूप निगम, आणि आरोग्य सेवा महासंचालनालयाचे महासंचालक डॉ. अतुल गोयल हे देखील यावेळी उपस्थित होते. भारत आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देश, आफ्रिकन देश, अमेरिका, युरोपीय देशांचे प्रतिनिधी या परिषदेत आभासी माध्यमातून सहभागी झाले. "समुदाय सहभागाद्वारे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये पटकी (कॉलरा)  ,विषमज्वर ( टायफॉइड ) आणि आतड्यांसंबंधीच्या  अन्य रोगांचा  प्रतिबंध आणि नियंत्रण: सार्स -सीओव्ही -2 महामारीच्या पलीकडे".ही एएससीओडीडी परिषदेची संकल्पना होती.

अतिसार आजार  आणि पोषण या विषयावरील  16 वी आशियाई परिषद कोलकाता येथे आयोजित केल्याबद्दल आयसीएमआर-राष्ट्रीय कॉलरा आणि आतड्यासंबंधीचे आजार संस्थेचे संचालक आणि चमूचे  अभिनंदन केले.  “गेल्या काही वर्षांत, एएससीओडीडीने केवळ कॉलरा आणि टायफॉइडच्या रोगपरिस्थिती विज्ञानावरच नव्हे तर आतड्यांसंबंधी लस उपक्रम, प्रतिजैविक प्रतिकार, पाणी, पर्यावरण आणि स्वच्छते संदर्भातील पैलू, आण्विक निदान, अन्न आणि पोषण इत्यादींवरील  अनेक पैलूंच्या अनुषंगाने  चर्चा व्यापक केली  आहे. " असे डॉ. पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

गेल्या अडीच वर्षांपासून जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अनेक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांवर कोविड-19 महामारीचा  कशाप्रकारे परिणाम झाला आहे यावर  डॉ भारती पवार यांनी  प्रकाश टाकला. ''पंतप्रधान  नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील भारत सरकारने आपल्या सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दरात आणि दर्जेदार आरोग्य सेवेची उपलब्धता सुनिश्चित केली आहे.  भविष्यासाठी  सज्ज होण्याच्या दृष्टीने  देशाच्या आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्याची  हीच वेळ आहे, हे पंतप्रधानांनी अनेक वेळा नमूद केले आहे . भारतीय आरोग्य पायाभूत सुविधांचा ज्याप्रकारे विस्तार होत आहे  ते प्रशंसनीय असून  येत्या काही वर्षांत या आरोग्य सुविधा जे बदल घडवून आणतील त्याचे साक्षीदार जग असेल ”, असे त्यांनी सांगितले.
 
"वसुधैव कुटुंबकम" या तत्त्वाचे पालन करून भारताने 219 कोटींहून अधिक मात्रा देत विक्रमी  लसीकरण करून आपल्यासारख्या मोठ्या लोकसंख्येसाठी विनामूल्य  लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे कशाप्रकारे  राबवला हे जगाने पाहिले आहे, हे त्यांनी नमूद केले. ''भूतकाळात आलेल्या अनुभवांवरून बोध घेऊन संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट  करणे अनिवार्य आहे'' , असे त्या म्हणाल्या.
 
2030 पर्यंत कॉलरा संपुष्टात आणण्यासाठी मार्गदर्शक आराखडा , कॉलराची लस विकसित करणे आणि जलद निदान, आतड्यांसंबंधी जिवाणूच्या प्रतिजैविक प्रतिकारासंदर्भात  समकालीन दृष्टीकोन: नवीन उपक्रम आणि आव्हाने आणि हिपॅटायटीससह इतर विषाणू संसर्गावरील  लस, कोविड महामारी दरम्यान अतिसार आजारावरील संशोधनातून घेतलेला बोध यासह आतड्यांमध्ये संसर्ग  , पोषण, धोरण आणि अभ्यास यासंदर्भातील नव्याने   उद्भवलेल्या  समस्यांवर या परिषदेत लक्ष केंद्रित करण्यात आले.


या परिषदेत आरोग्य संशोधन विभागाच्या सहसचिव  अनु नागर, राष्ट्रीय कॉलरा आणि आतड्यासंबंधीचे आजार संस्थेच्या संचालिका  डॉ. शांता दत्ता , एएससीओडीडीच्या अध्यक्ष फिरदौसी कादरी या  देखील उपस्थित होत्या.

 

***

Jaydevi PS/SBC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875158) Visitor Counter : 200


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu