संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी सरकारने सर्वांगीण दृष्टिकोन अवलंबला असून भारत सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सुसज्ज आहे : गुजरातमधील गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात संरक्षण मंत्र्यांचे संबोधन
प्रविष्टि तिथि:
17 OCT 2022 5:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2022
“सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्व पैलूंना बळकट करण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारला आहे.” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातमधील गांधीनगर येथील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये जमीन आणि सागरी सीमा, हवाई सीमा, सायबर, डेटा, अवकाश, माहिती, ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण सुरक्षा समाविष्ट आहे आणि या घटकांचे संरक्षण करणे सार्वभौम राष्ट्रासाठी आवश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. सर्व सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी जनतेला दिली.
मात्र बाह्य आणि अंतर्गत सुरक्षा धोक्यांमध्ये फरक करणे कठीण होत चालले आहे. कारण संकरित युद्धामुळे हा फरक जवळजवळ संपुष्टात आला आहे,असे सिंह म्हणाले. ते पुढे म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचे स्वरूप विस्तारले असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे,असे त्यांनी सांगितले.
“नवीन प्रकारचे धोके समोर येत आहेत ज्यामुळे अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेतील सीमारेषा पुसट झाली आहे. दहशतवादाशिवाय, सायबर युद्ध आणि माहिती युद्ध हे सुरक्षाविषयक धोक्यांचे नवीन प्रकार आहेत. याव्यतिरिक्त, मानवी तस्करी आणि मनी लाँड्रिंगसारख्या (काळा पैसा पांढरा करणे) समस्या आहेत ज्या दिसायला वेगळ्या आहेत, परंतु एकमेकांशी संबंधित आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व संस्थांनी एकात्मिक पद्धतीने काम केले पाहिजे,” असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले.
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1868552)
आगंतुक पटल : 241