गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि बिहारमधील सीताब दियारा येथे जाहीर सभेलाही संबोधित केले

Posted On: 11 OCT 2022 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11  ऑक्टोबर  2022

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त बिहारमधील त्यांच्या जन्मस्थानी सिताब दियारा येथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आणि  जाहीर सभेला संबोधित केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे राज्यमंत्री अश्विन चौबे आणि गृह राज्यमंत्री  नित्यानंद राय यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून जयप्रकाश नारायण यांचा पुतळा उभारण्याची  शपथ घेतली होती आणि आज जयप्रकाश यांच्या 121 व्या जयंतीदिनी ती पूर्ण झाली  आहे. शाह म्हणाले की, जयप्रकाश नारायण यांचे जीवन अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण होते.  जयप्रकाश यांनी स्वातंत्र्यासाठी केवळ चळवळीच्या मार्गाने लढा दिला नाही तर  महात्मा गांधींनी दाखवलेला मार्ग देखील अवलंबला. स्वातंत्र्यानंतर जेव्हा सत्ता हाती घेण्याची वेळ आली तेव्हा जयप्रकाश संन्याशाप्रमाणे विनोबा भावे यांच्यासह  सर्वोदय चळवळीत सामील झाले. जयप्रकाश नारायण यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भूमिहीन, गरीब, दलित आणि मागास लोकांप्रति  समर्पित केले. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जयप्रकाश यांनी समाजवाद, सर्वोदय आणि जातिहीन समाजाच्या निर्मितीसाठी अनेक नवीन प्रस्ताव दिले. मात्र 1970 च्या दशकात भ्रष्टाचार आणि भ्रष्ट सरकारने लादलेल्या आणीबाणी विरोधातील चळवळ हे त्यांनी  देशासाठी दिलेले सर्वात मोठे योगदान होते.

शाह म्हणाले की, आज त्यांच्या जन्मस्थानी जेपींच्या तत्त्वांसाठी एक भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. जेपींच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन भावी  पिढी देशाच्या विकासाला नवी गती देऊ शकेल, या उद्देशाने येथे स्मारकाबरोबरच  संशोधन केंद्र उभारण्याचा निर्णयही नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे ते म्हणाले. येथे संशोधन आणि विकास केंद्राच्या स्थापनेनंतर , विद्यार्थ्यांना  जेपींची तत्त्वे आणि त्यांनी ग्रामीण विकासासाठी केलेले कार्य यावर संशोधन करता येईल. अमित शहा म्हणाले की जयप्रकाश यांनी  सहकार, ग्राम उन्नती आणि सर्वोदयाच्या कार्यातून मोठे योगदान दिले आहे आणि आज त्यांच्या जयंतीदिनी हे राष्ट्र जयप्रकाश नारायण यांचे स्मरण करत आहे.

 

 S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1866939) Visitor Counter : 222


Read this release in: English , Urdu , Telugu