गृह मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बिहारच्या किशनगंज इथे आयोजित “सुंदर सुभूमी” कार्यक्रमात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे मार्गदर्शन
आज भारत संपूर्ण जगाला सांगतो आहे- “गेल्या 75 वर्षांत अथक प्रयत्न आणि चिकाटीच्या बळावर आम्ही आमच्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने, ‘अर्थपूर्ण’ बनवत, ब्रिटीशांना मागे टाकले आहे”
Posted On:
24 SEP 2022 10:20PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज बिहारच्या किशनगंज इथे, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित “सुंदर सुभूमी” ह्या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
यावेळी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाबद्दल स्वातंत्र्यसैनिक भृगु नाथ शर्मा आणि स्वातंत्र्यसैनिक दिवंगत गोपाल राय वैद्य तसेच दिवंगत लाल रंजन राय यांच्या कुटुंबियांना अमित शाह यांनी सन्मानित केले.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा इतिहासात पुन्हा कधीही न येणारा क्षण आहे, असं अमित शाह म्हणाले. ह्या अमृत महोत्सवी वर्षाचे साक्षीदार असणारे आपण सर्वजण भाग्यवान आहोत. अगणित लोकांचे बलिदान आणि 1857 ते 1947 या वर्षांच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतर जेव्हा शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व लोकांच्या मनात अनेक आशा आणि स्वप्ने होती. ज्यांनी या देशासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांना माहीत होते, की आपल्या ह्या बलिदानातून जे स्वातंत्र्य मिळणार आहे, तेव्हाच आपल्या आयुष्याला खरा अर्थ मिळणार आहे. आणि ह्या महान लोकांच्या त्यागामुळेच आपण स्वतंत्र झालो, असे ते पुढे म्हणाले.
आपण अत्यंत अभिमानाने आपल्या स्वातंत्र्य काळाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र देशाच्या या 75 व्या वर्षांत, आपण बरेच काही मिळवले आहे. 2014 साली आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात 11 व्या क्रमांकावर होती. मात्र, आता, ह्या अमृत महोत्सवी वर्षांत, आपण ब्रिटनला मागे टाकून, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालो आहोत. आज भारत, संपूर्ण जगाला हे सांगतो आहे, की आम्ही आमचे अथक परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर आमचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने, ‘अर्थपूर्ण’ बनवत ब्रिटनला मागे टाकले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862008)
Visitor Counter : 183