कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

11 व्या राष्ट्रीय बीज परिषदेचे,ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंदिया कृषी विद्यापीठात झाले उदघाटन


कृषी शास्त्रज्ञांवर देशाला आत्मनिर्भर करण्याची मोठी जबाबदारी आहे – केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर

प्रविष्टि तिथि: 21 AUG 2022 7:01PM by PIB Mumbai

 

'आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी संशोधनाद्वारे मोठी प्रगती साध्य केली असून,भारतात आज अन्नधान्याचे सर्वाधिक उत्पादन होत आहे आणि त्याबाबतीत भारत पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे;' असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री, नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे.शेतकऱ्यांचे श्रम, सरकारची कृषीहिताची धोरणे आणि शास्त्रज्ञांचे संशोधन यांचा या यशात मोलाचा वाटा आहे आणि कृषी उत्पादनाच्या बाबतीत आपण जागतिक स्तरावर आघाडीवर आहोत,असेही तोमर पुढे म्हणाले.

हवामान बदल होत असल्याने आता या आव्हानांनाही सामोरे जावे लागेल. डाळी आणि तेलबियांमध्येही आपल्याला स्वयंपूर्णता गाठता आली पाहिजे.यासाठी सरकार देखील एखाद्या मोहिमेच्या स्वरुपात काम करत आहे, मात्र धोरणे आणि निधी यासोबतच अशा बियाण्यांचा शोध लावला गेला पाहिजे की जेणेकरुन उत्पादकता वाढेल आणि देश आत्मनिर्भर होईल. ही महत्त्वाची जबाबदारी कृषी शास्त्रज्ञांवर आहे आणि त्यांना अधिक जोमाने काम करण्याची गरज आहे, असे  तोमर यावेळी म्हणाले.ते आज ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंदिया कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या11 व्या राष्ट्रीय बीज परिषद-2022 च्या उदघाटनप्रसंगी बोलत होते.

यावेळी विद्यापीठात नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहाला दिवंगत दत्तोपंत ठेंगडी यांचे नाव देण्याचाही समारंभ झाला.

श्री तोमर म्हणाले की,दिवंगत ठेंगडी हे बुद्धिवादी,राष्ट्रवादी विचारवंत, कामगार चळवळीचे प्रणेते आणि व्यापार संघटनेचे नेते होते.त्यांनी प्रथम कामगार आणि शेतकऱ्यांचे हित पाहिले. ठेंगडीजी यांनी ज्या स्वदेशीच्या भावनेवर भर दिला, त्यामुळे देशाला स्थानिक उद्योगातून सामर्थ्य लाभले आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या.ठेंगडी यांच्या नावाचे सभागृह असणे, हे प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमाद्वारे, देशातील सुधारित बियाणे उत्पादनाच्या क्षेत्रातील भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवीन प्रयोगांवर चर्चा केली जाईल आणि विशेष करून तेलबिया आणि कडधान्ये यांच्या सुधारित बीजोत्पादनाच्या, रणनीती बाबत प्रदीर्घ विचारमंथनाद्वारे धोरण तयार केले जाईल.या तीन दिवसीय परिषदेत देशातील नामवंत बीजोत्पादन तज्ञ सहभागी होत आहेत.यावेळी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले.

***

S.Patil/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1853481) आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri