युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांच्या हस्ते ‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेत्यांचा सन्मान


“खेलो इंडिया आणि फिट इंडिया देशातील सर्वात यशस्वी मोहिमांपैकी एक”

देशभरातील 9 कोटीहून अधिक नागरिकांनी फिट इंडिया चळवळीत सहभाग नोंदवला : केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर

मुंबई येथील पी जी गरोडिया शाळेचे तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ ठरले महाराष्ट्रातून विजेते

Posted On: 21 JUL 2022 8:50PM by PIB Mumbai

मुंबई 21 जुलै 2022

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुरागसिंग  ठाकूर यांच्या हस्ते फिट इंडिया प्रश्नमंजुषास्पर्धेच्या राज्य पातळीवरील फेरीच्या विजेत्यांचा गौरव गुरुवारी मुंबई येथे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील कौटिल्य भवन येथे झालेल्या सोहळ्यात करण्यात आला. यावेळी देशभरातील 72 विद्यार्थी आणि 36 विद्यालयांना सुमारे 99 लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. फेब्रुवारी आणि मार्च 2022 या महिन्यांमध्ये घेण्यात आलेल्या फिट इंडिया प्रश्नमंजुषास्पर्धेच्या राज्यस्तरीय फेऱ्यांमध्ये देशभरातील 360 विद्यालयांनी भाग घेतला.

राज्यस्तरीय फेऱ्यांतील विजेते

राज्यस्तरीय फेऱ्यांमध्ये विजेते ठरलेले 36 संघ (प्रत्येकी 2 विद्यार्थी) आणि त्यांच्या विद्यालय प्रतिनिधींना रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. यामध्ये विजेत्या विद्यालयाला अडीच लाख रुपयांचे तर विजेत्या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेबारा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

महाराष्ट्रातून मुंबईच्या पी.जी. गरोडिया (आयसीएसई) शाळेचे तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ हे दोन विद्यार्थी फिट इंडिया प्रश्नमंजुषास्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीचे विजेते ठरले आहेत.

महाराष्ट्रातून राज्य पातळीवर विजेता ठरलेला तन्मय गौतम शेठ याने या स्पर्धेचा उपक्रम राबविल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने यापुढे देखील अशा प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे, तो पुढे म्हणाला.

मुंबईच्या पी.जी. गरोडिया (आयसीएसई) शाळेचे विद्यार्थी तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ त्यांचे क्रीडा विभागप्रमुख विनोद पाटील यांच्यासोबत

यावेळी विजेत्यांना संबोधित करतांना, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंग  ठाकूर म्हणाले, ‘फिट इंडिया अभियानाअंतर्गत, अनेक उपक्रम सुरु झाले असून त्यामुळे या अभियानाला गती मिळाली आहे. तसेच, फिट इंडिया शाळा सप्ताह, फिट इंडिया स्वातंत्र्य चळवळ, फिट इंडिया सायक्लोथौन आणि इतर अनेक उपक्रमांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत, नऊ कोटी लोक ह्या विशाल मोहिमेत सहभागी झाले आहेत.

तुमच्यापैकी प्रत्येक जण आता खेळ आणि तंदुरुस्तीच्या मोहिमेचा राजदूत आहे. असे ठाकूर यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगत, त्यांना फिट इंडिया मोबाईल अॅपविषयी लोकांना माहिती देण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, फिट इंडिया अभियानसुरु केल्याची आठवण सांगतअनुरागसिंग  ठाकूर म्हणालेभारताला एक तंदुरुस्त आणि सुदृढ देश बनवण्याच्या हेतूने पंतप्रधानांनी ही चळवळ सुरु केली होती. खेलो इंडिया आणि फिट इंडिया या दोन्ही चळवळी देशातल्या सर्वाधिक यशस्वी मोहिमांपैकी एक ठरल्या आहेत, असे अनुरागसिंग ठाकूर म्हणाले.

विद्यार्थ्यांनी केवळ त्यांच्या कारकिर्दीविषयी विचार न करता देश विकासाच्या कोणत्या क्षेत्रात त्यांना योगदान देण्याची इच्छा आहे याचा देखील विचार करायला हवा. सध्या देशात साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याबद्दल बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ आपल्या हक्कांचा विचार न करता घटनेने आपल्याला नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या देखील लक्षात ठेवायला पाहिजेत याचे स्मरण ठाकूर यांनी करून दिले.

भारताच्या समृद्ध क्रीडाविषयक इतिहासाविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या या ‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या मंचावर ऑनलाईन पद्धतीने साडेतेरा हजार शाळांमधील 36,299 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. राज्य स्तरीय फेऱ्यांसाठी यापैकी 360 शाळांची निवड करण्यात आली. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेऱ्यांनंतर राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील विजेते निवडण्यात आले. 

राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीचे महासंचालक संदीप प्रधान यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले.

फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धा : शालेय वयाच्या मुलांमध्ये तंदुरुस्ती आणि क्रीडा विषयाबाबत रुची निर्माण करून त्यांच्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून सप्टेंबर 2021 मध्ये भारतातील या पहिल्यावहिल्या तंदुरुस्ती आणि क्रीडा विषयक शालेय प्रश्नमंजुषेची सुरुवात करण्यात आली. नॅशनल टेस्टींग एजन्सीने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी 13, 500 शाळांनी ऑनलाईन सहभागी होत फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या प्राथमिक फेरीत 36,299 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यापैकी 360 निवडक शाळांनी राज्यस्तरीय फेरी पार केली. उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्यफेरीनंतर 36 राज्य, केंद्रशासित प्रदेशातील सहभागीतांनी अंतिम फेरी गाठली.

राष्ट्रीय पातळीवरील फेरी

फिट इंडिया प्रश्नमंजुषास्पर्धेची राष्ट्रीय पातळीवरील फेरी लवकरच आयोजित करण्यात येईल आणि स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून त्याचे थेट प्रसारण देखील करण्यात येईल.

फिट इंडिया प्रश्नमंजुषास्पर्धेच्या राष्ट्रीय फेरीमध्ये विजेत्या ठरलेल्या शाळेला 25 लाख रुपये तर त्या शाळेच्या विजेत्या संघातील दोन विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपये (प्रत्येकी1.25 लाख), पहिल्या उपविजेत्या शाळेला 15 लाख तर त्या शाळेच्या संघाला दीड लाख रुपये (प्रत्येक विद्यार्थ्याला 75 हजार) देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील दुसऱ्या उप-विजेत्या शाळेला 10 लाख रुपये आणि त्या शाळेच्या संघातील दोन विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये (प्रत्येकी 50 हजार रुपये) देण्यात येणार आहेत.

फिट इंडिया राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेतील 36 विजेत्यांची नावे इथे पाहू शकता :

 

* * *

PIB Mumbai | JPS/SRT/SC/RA/PJ/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1843619) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Hindi