उपराष्ट्रपती कार्यालय

भारत-आफ्रिका भागीदारीला आमचे सर्वाधिक प्राधान्य - उपराष्ट्रपती


तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान उपराष्ट्रपतींनी गॅबॉन येथे भारतीय समुदायाशी संवाद साधला

Posted On: 01 JUN 2022 8:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जून 2022

जगाची प्रगती जगाच्या दक्षिणेकडील भागाच्या विकासावर अवलंबून आहे आणि भारत-आफ्रिका संबंधांना आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे याचा उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज पुनरुच्चार केला .

गॅबॉन, सेनेगल आणि कतार या तीन देशांच्या दौऱ्यावर असलेल्या उपराष्ट्रपतींनी काल गॅबॉनच्या लिब्रेव्हिल येथे भारत-गॅबॉन व्यवसाय कार्यक्रमात व्यापारी समुदायाला काल संबोधित केले . भारताच्या आफ्रिकेसोबत वाढत्या आर्थिक संबंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘आफ्रिकेसोबत सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन आरोग्य, डिजिटल आणि हरित विकास यावर केंद्रित असेल. कारण आमचा विश्वास आहे की हे आफ्रिकेचे देखील प्राधान्यक्रम आहेत.

नायडू यांनी नमूद केले की भारत-गॅबॉन द्विपक्षीय व्यापाराने 2021-22 मध्ये महामारी असूनही 1 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारत आता गॅबॉनच्या निर्यातीसाठी दुसरे सर्वात मोठे गंतव्य स्थान आहे. तेल आणि वायू, खाणकाम, औषध निर्मिती , लाकूड प्रक्रिया इत्यादी विविध क्षेत्रात विशेषतः गॅबॉन विशेष आर्थिक क्षेत्रात (GSEZ) अनेक भारतीय कंपन्या आहेत असे ते म्हणाले. तत्पूर्वी, नायडू यांनी गॅबॉन विशेष आर्थिक क्षेत्राला (GSEZ) भेट दिली आणि तेथील सुविधांची पाहणी केली आणि तेथील भारतीय उद्योजकांशी संवाद साधला.

ऊर्जा सहकार्याबाबत , उपराष्ट्रपती म्हणाले की, भारताच्या ऊर्जा सुरक्षा विषयक गरजेसाठी गॅबन हा एक महत्त्वाचा भागीदार आहे आणि भारताने 2021-22 मध्ये गॅबनमधून 670 दशलक्ष डॉलर्स किमतीचे कच्चे तेल आयात केल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून तेल आणि वायू क्षेत्रात भारत-गॅबन वैविध्यपूर्ण सहभाग प्रस्थापित करण्याची महत्त्वपूर्ण क्षमता आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार या अधिकृत शिष्टमंडळाचा एक भाग आहेत,त्यांनी व्यापारी समुदायाला संबोधित केले आणि हरित ऊर्जा, सेवा, आरोग्य आणि कृषी यासह भारत-गॅबन सहकार्याचा आणखी विस्तार करण्याचे आवाहन केले.भारत आणि गॅबॉनने त्यांच्या आर्थिक भागीदारीचा विस्तार करावा आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेतील पूरक घटकांचा उपयोग करावा अशी सूचना त्यांनी केली. "आपण प्रमुख सामर्थ्य आणि सहकार्याचे संभाव्य मार्ग ओळखले तर एकत्रितपणे बरेच काही करता येऊ शकते", असे डॉ भारती प्रवीण पवार म्हणाल्या.

या कार्यक्रमानंतर नायडू यांच्यासाठी भारतीय समुदायाने स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. मेळाव्याला संबोधित करताना नायडू यांनी आनंद व्यक्त केला की, हा छोटा मात्र महत्वपूर्ण भारतीय समुदाय गॅबनमध्ये विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

जगभरातील 30- दशलक्ष इतका सशक्त भारतीय समुदाय भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.

नायडू यांनी गॅबॉनमधील भारतीय समुदायाने भारतीय संस्कृती जिवंत ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि संपूर्ण समुदाय एकत्रितपणे प्रमुख भारतीय सण साजरे करतात याचे कौतुक केले. त्यांनी समुदायाला स्थानिक कायदे आणि चालीरीतींचा आदर करायला सांगितले आणि त्याच वेळी 'शेअर अँड केअर' या जुन्या भारतीय मूल्यांचे जतन आणि ज्येष्ठांचा आणि निसर्गाचा आदर करण्याचेही आवाहन केले.

नायडू यांनी आठवण करून दिली की, भारत सरकारने आफ्रिका खंडात भारताच्या राजनैतिक पाऊलखुणा विस्तारण्याच्या उद्देशाने 18 नवीन दूतावास स्थापन करण्याची घोषणा केली आहे. "यामुळे आफ्रिकेबरोबर आमचे आर्थिक संबंध निश्चितच वाढतील आणि आफ्रिकेत काम करण्यास इच्छुक असलेल्या भारतीय उद्योगासाठी ते खूप मोलाचे ठरेल", असे त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय शासन अधिक न्याय्य बनवण्यासाठी आणि विस्तारित आणि समावेशी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दिशेने एकत्रितपणे काम करण्यासाठी त्यांनी भारत-आफ्रिका सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन केले.

 

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1830250) Visitor Counter : 174


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi