संरक्षण मंत्रालय

राष्ट्रीय हित जपण्यासाठी सतत बदलत्या जागतिक परिस्थितीत सागरी सज्जता आवश्यक आहे : भारतीय तटरक्षक दलाच्या 39 व्या कमांडर्स परिषदेत संरक्षण मंत्री

Posted On: 30 MAY 2022 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 30 मे 2022 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) तीन दिवसीय 39 व्या कमांडर्स परिषदेचे उद्घाटन केले. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही. एस. पठानिया आणि संरक्षण मंत्रालयाचे आणि भारतीय तटरक्षक दलाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात, संरक्षण मंत्र्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या व्यावसायिकता आणि समर्पणाची प्रशंसा करताना सांगितले की त्याच्या अतुलनीय कामगिरीमुळे ते जगातील सर्वोत्तम आणि सर्वात मोठे तटरक्षक बनले आहे.

राष्ट्राच्या आर्थिक आणि धोरणात्मक हितांचे रक्षण हा एक महत्त्वाचा पैलू असल्याचे सांगत, सतत बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीमध्ये सागरी सज्जता राखण्याच्या गरजेवर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. सतत बदलत्या  जागतिक परिस्थितीमुळे भारताच्या सागरी सुरक्षा गरजांमध्ये बदल झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत  राजनाथ सिंह म्हणाले की, या घटनेने हे दिसून आले की, देशाचा दृष्टीकोन दीर्घकाळ भू - सीमांच्या सुरक्षेवर केंद्रित होता आणि किनारपट्टीच्या सुरक्षेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. सरकारच्या दूरदृष्टीमुळे  गेल्या काही वर्षांत भारतीय तटरक्षक दलाने आपली क्षमता सतत वाढवल्याबद्दल आणि किनारी सुरक्षा अधिक बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. या प्रयत्नांमुळे, 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर देशात सागरी मार्गाने  कोणत्याही दहशतवादी कारवाया झालेल्या नाहीत, असे ते म्हणाले.

संरक्षण मंत्र्यांनी  मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राच्या महत्वावर आपले  मत मांडताना हा प्रदेश भारताच्या सागरी सुरक्षेचा एक महत्त्वाचा पैलू असल्याचे सांगितले.  “या प्रदेशातील वाढत्या प्रादेशिक आणि जागतिक व्यापारामुळे नवीन आव्हाने समोर आली आहेत. भू-राजकीय तणाव आणि धोरणात्मक हितसंबंधांच्या संघर्षामुळे पारंपारिक सुरक्षा आव्हाने निर्माण झाली आहेत. दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी आणि चाचेगिरी ही अपारंपरिक आव्हाने आज आपल्यासमोर आहेत. या आव्हानांचा फटका संपूर्ण प्रदेशाला बसत आहे. एक जबाबदार सागरी शक्ती म्हणून आपल्याला  नियम-आधारित, शांततापूर्ण आणि स्थिर वातावरण निर्माण करण्यात स्पष्ट स्वारस्य आहे. प्रादेशिक आणि जागतिक समृद्धीसाठी असे नियम आधारित वातावरण आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, भारतीय तटरक्षक दलाची भूमिका खूप मोठी आहे,” असे ते म्हणाले.

सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत हे गुंतवणुकीचे एक मजबूत आणि विश्वासार्ह ठिकाण म्हणून उदयास आले आहे, याकडे लक्ष वेधून राजनाथ सिंह म्हणाले, देशाची खरी क्षमता तेव्हाच समोर येऊ शकते, जेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला विशेषतः नील अर्थव्यवस्थेला  सुरक्षित आणि नियम आधारित सागरी वातावरण उपलब्ध होईल.  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी तटरक्षक दलाला  देशाच्या विशाल किनारपट्टीवर आणि विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

सुरक्षा, व्यापार, पर्यावरण आणि मानवतावादी सहाय्य या सर्व बाबी लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रदूषण नियंत्रक जहाजांची खरेदी आणि डॉर्नियर फ्लीटचे अद्ययावतीकरण यासह अनेक मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.  ‘आत्मनिर्भर भारत’ उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने भारतीय तटरक्षक दलाच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. “आज, भारतीय तटरक्षक दलाच्या  जहाजांचे आणि विमानांचे उत्पादन आणि देखभाल -दुरुस्ती देशातच  केली जात आहे. भारतीय तटरक्षक दल त्याच्या भांडवली खर्चापैकी  जवळपास 90% स्वदेशी मालमत्तेच्या विकासावर खर्च करत आहे,”असे  ते म्हणाले.

भारतीय तटरक्षक दलाची  कमांडर्स परिषद दरवर्षी आयोजित केली जाते, ज्यात सर्व प्रादेशिक कमांडर्स  भविष्यासाठी रूपरेषा आखतात  आणि विविध धोरण आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करतात. या सेवेसाठी भविष्यवादी दृष्टीकोन तयार करणे आणि आव्हानांवर कार्यक्षमतेने मात करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1829515) Visitor Counter : 234


Read this release in: English , Urdu , Hindi , Malayalam