संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘आयएनएस खांदेरी’ या पाणबुडीतून कारवार येथे केला समुद्र प्रवास
कुठलाही धोका निपटण्यासाठी सज्जता आणि आक्रमक क्षमता राखल्याबद्दल भारतीय नौदलाची केली प्रशंसा
Posted On:
27 MAY 2022 6:31PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या कारवार नौदल तळ, कर्नाटक भेटी दरम्यान 27 मे, 2022 रोजी भारतीय नौदलाच्या सर्वात प्रबळ असलेल्या नौकांपैकी एक ‘आयएनएस खांदेरी’ या स्टेल्थ पाणबुडीतून समुद्र प्रवास केला. कलवरी श्रेणीच्या या अत्याधुनिक पाणबुडीच्या युद्ध क्षमता आणि आक्रमक शक्तीविषयी त्यांना माहिती देण्यात आली.
संरक्षण मंत्र्यांनी या पाणबुडीला पाण्याखाली वर्चस्व प्रस्थापित करण्याची क्षमता देणाऱ्या प्रगत सेन्सर सूट, युद्ध प्रणाली आणि शस्त्र क्षमता दर्शवणाऱ्या कार्याची पाहणी केली.
राजथान सिंह यांनी, या पाहणीबद्दल माध्यमांशी बोलताना, अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्याबद्दल पाणबुडीच्या कर्मचाऱ्यांचे तसेच कुठलाही धोका निपटण्यासाठी सज्जता आणि आक्रमण क्षमता कायम ठेवणे यासाठी अभिनंदन केले. भारतीय नौदल एक आधुनिक, प्रबळ आणि विश्वसनीय दल आहे, कुठल्याही परिस्थितीत सतर्क, सजग आणि विजयी होण्यास ते सक्षम आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. “आज भारतीय नौदलाची, जगातील आघाडीच्या नौदलामध्ये गणना होते.”असे ते म्हणाले.
‘आयएनएस खांदेरी’ हे मेक इन इंडियाचे ठळक उदाहरण आहे असे ते म्हणाले. भारतीय नौदलाने मागणी नोंदवलेल्या 41 पैकी 39 जहाजे/पाणबुड्या भारतीय जहाज बांधणी केंद्रात बनत आहेत. ज्या वेगाने आणि जितक्या संख्येने भारतीय नौदलाने जहाजे आणि पाणबुड्यांचे जलावतरण केले आहे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला ‘आत्मनिर्भर भारत’ तयार करण्याचा संकल्प अधिकच मजबूत होत आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले
भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू युद्ध नौका ‘विक्रांत’च्या जलावतरणाबद्दल राजनाथ सिंह म्हणाले, यामुळे आयएनएस विक्रमादित्य सोबतच देशाची सागरी सुरक्षा अधिक मजबूत होईल. मात्र, त्याचवेळी त्यांनी हे स्पष्ट केले की भारतीय नौदलाची सज्जता ही आक्रमणासाठी चिथावणी नाही तर, हिंद महासागर क्षेत्रात शांतता आणि सुरक्षेची हमी देण्यासाठी आहे.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828800)
Visitor Counter : 138