अंतराळ विभाग

अंतराळ तंत्रज्ञान जम्मू क्षेत्रात स्टार्ट-अप आणि नवोन्मेषासाठी  नवी कवाडे  उघडेल: डॉ जितेंद्र सिंह


अंतराळ तंत्रज्ञानातले अग्रणी सतीश धवन डोगरा अभिमानाचे तेजस्वी प्रतीक: डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 12 MAR 2022 7:24PM by PIB Mumbai

 

उत्तर भारतातील पहिल्या अंतराळ केंद्राचे उद्घाटन आज जम्मूमध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच अणुऊर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री, डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. अंतराळ तंत्रज्ञान जम्मू क्षेत्रात स्टार्ट-अप आणि नवोन्मेषासाठी  नवीन कवाडे  उघडेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पूर्वी बहुतांश अंतराळ तंत्रज्ञान संस्था  केवळ दक्षिणेकडील राज्यांपुरता  मर्यादित होत्या. अभियांत्रिकी, एरोनॉटिक्स आणि यासंदर्भातील इतर शाखांचे प्रशिक्षण देणारी एकमेव भारतीय अंतराळ आणि तंत्रज्ञान संस्था. केवळ  थिरुअनंतपुरममध्ये होती. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये अंतराळ केंद्र आणि भारतातील दुसऱ्या प्रकारची अंतराळ प्रशिक्षण संस्था उघडणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केरळ ते काश्मीरपर्यंतच्या अंतराळ प्रवासाची व्याप्ती दर्शवते  आणि त्याचसोबत या संस्थेचे नामकरण  सतीश धवन केंद्र  करणे, हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या जम्मू काश्मीरचे सुपुत्र सतीश धवन यांना आदरांजली असल्याचे सिंग यांनी सांगितले.  धवन जम्मू - काश्मीरचे असूनही  जम्मू आणि काश्मीरमधील एकाही संस्थेला त्यांचे  नाव दिले गेले नाही, ही शोकांतिका असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. अंतराळ तंत्रज्ञानातले अग्रणी सतीश धवन  डोगरा अभिमानाचे तेजस्वी प्रतीक असल्याचे ते म्हणाले.

जगाचा भविष्यकाळ प्रामुख्याने अंतराळ अर्थव्यवस्था, अंतराळ सहयोग आणि अंतराळ मुत्सद्देगिरीवर यावर अवलंबून असेल, असे ते म्हणाले.  परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणातून भारताला लाखो युरोपियन युरो आणि अमेरिकी  डॉलर्सचा महसूल आधीच मिळत असल्याचे सिंग यांनी अंतराळ अर्थव्यवस्थेचा संदर्भ देताना नमूद केले.  अंतराळ सहयोगाचा संदर्भ देताना, त्यांनी सार्क उपग्रहाचे उदाहरण दिले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार विकसित  सार्क उपग्रह बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ इत्यादी बहुतांश शेजारील देशांच्या गरजा पूर्ण करत आहे.

अंतराळ तंत्रज्ञान  खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्याचे श्रेय संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असे सिंग यांनी सांगितले.

अंतराळ तंत्रज्ञानामध्ये भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने जगात आधीच आघाडी घेतली आहे,असे त्यांनी सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे  इथून पुढली  पंचवीस वर्षे देशासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगाचे आघाडीचे राष्ट्र म्हणून भारताची आगेकूच अंतराळाच्या  माध्यमातून आधीच सुरू झाली असल्याचे डॉ. सिंग यांनी नमूद केले.

***

R.Aghor/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805386) Visitor Counter : 164


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil