गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

अमृत 2.0 अंतर्गत ‘इंडिया वॉटर पिच-पायलट-स्केल स्टार्ट-अप चॅलेंज’ चा हरदीप सिंह  पुरी यांनी केला प्रारंभ


या स्पर्धेअंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय 100 स्टार्ट-अप्सची निवड करेल आणि त्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये निधीचे पाठबळ प्रदान केला जाईल

Posted On: 12 MAR 2022 4:29PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, हरदीप सिंह पुरी यांनी त्यांच्या मंत्रालयाच्या ,नगरोत्थान आणि शहरी परिवर्तनसाठी अटल अभियान (अमृत) 2.0 अंतर्गत इंडिया वॉटर पिच-पायलट-स्केल स्टार्ट-अप चॅलेंजम्हणजेच, जलविषयक समस्यांबाबत प्रायोगिक तत्वावर उपाययोजना सुचवणाऱ्या स्टार्ट अप कंपन्यांच्या स्पर्धेचा प्रारंभ केला. 1 ऑक्टोबर 2021 रोजी माननीय पंतप्रधानांच्या हस्ते अमृत 2.0 चा औपचारिक प्रारंभ केल्यानंतर, 5 ऑक्टोबर 2021 रोजी (गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान), लखनौ येथे हितसंबंधितांशी सल्लामसलत करण्यात आली. आणि 12 ऑक्टोबर 2021 रोजी या अभियानाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली.

माननीय पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, स्टार्टअप्सना तंत्रज्ञान भागीदारम्हणून संलग्न करण्याच्या तंत्रज्ञान उप-अभियानाला मंत्रिमंडळाने अमृत 2.0 अंतर्गत मान्यता दिली आहे. शाश्वत आर्थिक विकासासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने, नवकल्पना आणि संरेखन विकसित करून पाणी/वापरलेले-पाणी प्रक्रिया क्षेत्रातील स्टार्टअप्सना सक्षम करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत मंत्रालय 100 स्टार्ट-अप्सची निवड करेल आणि त्यांना 20 लाख रुपये पाठबळ तसेच मार्गदर्शनपर निधी म्हणून दिले जातील.

स्टार्टअप्स, तरुण नवोन्मेषी , उद्योग भागीदार, इनक्यूबेटर्स आणि राज्ये/शहरांना अशा प्रकारचा पहिला नेटवर्किंग मंच प्रदान करण्यासाठी, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने आज इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे इंडिया वॉटर पिच-पायलट-स्केल स्टार्ट-अप कॉन्क्लेव्हचे आयोजन केले होते.या परिषदेदरम्यान केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्र्यांनी माय जिओव्ही (MyGov ) मंचावर स्टार्टअप चॅलेंजचा प्रारंभ केला.

2.77 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची अमृत 2.0 ही परिवर्तनकारी आणि अनोखी योजना आहे, असे पुरी यांनी यावेळी बोलताना सांगितले. ही योजना देशातील जलसुरक्षा सुनिश्चित करेल, पाण्याचा  वाहतूक खर्च कमी करेल, भूजल प्रदूषण कमी करेल आणि पाणी वापर क्षमता वाढवेल, असे ते म्हणाले. हे अभियान यशस्वी होण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान, नवी वितरण यंत्रणा इ.आणून स्टार्ट-अप्सना सार्थ भूमिका बजावावी लागेल असेही त्यांनी सांगितले.

***

S.Tupe/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1805344) Visitor Counter : 231