वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक पुरवठा साखळी केवळ खर्चावर नव्हे तर विश्वासावरही आधारित असावी-पीयूष गोयल

Posted On: 12 NOV 2021 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2021

वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज सांगितले की, कोविड-19 ने हे अधोरेखित केले आहे की पुरवठा साखळी केवळ खर्चावर नव्हे तर विश्वासावर देखील आधारित असावी. पारदर्शक, विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळी सुनिश्चित करणे हा व्यापार पुनरुज्जीवनाचा गाभा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आणि कोविड-19 महामारी दरम्यान भारत हा लवचिकतेचा स्रोत आणि विश्वासू भागीदार म्हणून उदयास आला असेही ते म्हणाले.

ते आज नवी दिल्ली येथून जागतिक स्तरावर पुरवठा साखळीतील बदल: मेक इन इंडियाला फलदायी ठरू शकतात? या विषयावर बँक ऑफ अमेरिकाच्या महत्वाकांक्षी आभासी परिषदेत केलेल्या बीजभाषणात बोलत होते.

कोविड-19 महामारीमुळे पुरवठा आणि मागणीमध्ये व्यत्यय आल्याने सर्वत्र उत्पादकांना त्यांच्या पुरवठा साखळींचे पुनर्मूल्यांकन करण्यास भाग पाडले आहे असे मंत्री महोदय म्हणाले. भारताने केवळ आपल्या सर्व आंतरराष्ट्रीय सेवा वचनबद्धतेची पूर्तता करूनच नव्हे तर गंभीर वैद्यकीय पुरवठा (पीपीई, चाचणी, मास्क) उत्पादनात आत्मनिर्भर बनून आपली क्षमता आणि कार्यकुशलता संपूर्ण जगाला दाखवून दिली आहे असेही त्यांनी सांगितले.

वाढत्या आर्थिक निर्देशकांकडे त्यांनी  लक्ष वेधले. आपल्या निर्यातीत होणारी वाढ आणि थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ तसेच गुंतवणुक उच्च वाढीच्या मार्गावर असल्याने हे दशक विकासाचे दशक म्हणून आकार घेत आहे. ते म्हणाले की व्यापार हा परस्पर फायदेशीर आणि सहयोगी मार्गाने वाढला पाहिजे.

पुरवठा साखळीला पर्याय म्हणून भारताचे सामर्थ्य  अधोरेखित करताना मंत्री म्हणाले की, भारतात वैविध्यपूर्ण व्यावसायिक दृष्टिकोन, कुशल कर्मचारी आणि तुलनेने कामगारांवरील खर्च कमी आहे. त्यांनी भारताच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन प्रकल्पाबद्दल माहिती दिली आणि सांगितले की नवीन पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन भारताच्या पायाभूत सुविधांच्या नियोजनाला नवीन जीवन देईल आणि पर्यायाने वाहतूक खर्च 5% पर्यंत कमी करण्यात मदत करेल.

‘व्हाय इंडिया’वरून ‘व्हाय नॉट इंडिया’मध्ये आणि आता ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’आणि भारतातून जगाची सेवा करण्यात जागतिक भावना परिवर्तित होत आहे यावर त्यांनी भर दिला. "हा काळ भारतासाठीचा  आहे," असे ते म्हणाले, त्यांनी जगाला ‘भारतात येण्याचे, भारतात गुंतवणूक करण्याचे आणि जगासाठी मेक इन इंडियाचे आणि लवचिक पुरवठा साखळीच्या मोठ्या परिसंस्थेचा भाग होण्याचे आमंत्रण दिले.

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771269) Visitor Counter : 253


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu