पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय व्यावसायिकांशी साधलेला संवाद

Posted On: 01 JUL 2021 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 जुलै 2021

 

नमस्कार!

आपणा सर्वांना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा ! डॉक्टर बी.सी. रॉय यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ साजरा केला जाणारा हा दिवस, आमचे डॉक्टर्स,तसेच आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च आदर्शांचे प्रतीक आहे. विशेषतः, गेल्या दीड वर्षांत आमच्या डॉक्टरांनी ज्याप्रकारे देशबांधवांची सेवा केली आहे, त्यातून एक आदर्श उदाहरण त्यांनी ठेवले आहे. 130 कोटी देशबांधवांच्या वतीने मी सर्व डॉक्टर्सना धन्यवाद म्हणतो आहे, त्यांचे आभार मानतो आहे.

मित्रांनो,

डॉक्टर्सना परमेश्वराचे दुसरे रूपच मानले जाते, आणि ते उगाच नाही मानले जात, असे कितीतरी लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात आरोग्याचे गंभीर संकट निर्माण झाले, ते एखादा आजार किंवा अपघाताचा त्यांना फटका बसला, किंवा अनेकदा आपल्यावर असे संकट येते,ज्यावेळी आपल्याला अशी भीती असते की आपण आपल्या प्रियजनांना गमावून बसू. मात्र अशा सर्व प्रसंगी डॉक्टर्स एखाद्या देवदूताप्रमाणे आपल्या आयुष्याची दिशा बदलतात, आपल्याला एक नवे आयुष्य देतात.

मित्रांनो,

आज जेव्हा देश कोरोनाशी एवढी मोठी लढाई लढतो आहे, अशा वेळी डॉक्टरांनी अहोरात्र मेहनत करुन अनेक आयुष्ये वाचवली आहेत. हे पुण्यकर्म करतांना देशातल्या अनेक डॉक्टरांनी आपले प्राण देखील दिले. या लढाईत,लोकांचा जीव वाचावतांना प्राणांची आहुती देणाऱ्या या सर्व डॉक्टरांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो.

मित्रांनो ,

कोरोनाविरुद्धच्या  या लढ्यात जेवढी आव्हाने आली, त्या सगळ्यांवर आपले वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी उपाय शोधले, प्रभावी औषधे तयार केलीत. आज आपले डॉक्टर्सच कोरोनाविषयक प्रोटोकॉल्स तयार करत आहेत. त्यांची अंमलबजावणी करण्यात मदत करत आहेत. हा विषाणू नवा आहे, त्याच्या स्वरूपात सारखे बदलही होत आहेत. मात्र आपल्या डॉक्टरांचे ज्ञान, त्यांचे अनुभव यांच्या आधारावर विषाणूच्या या धोक्याचा आणि आव्हानांचा एकत्र सामना करत आहोत. इतक्या दशकात, भारतात ज्या प्रकारच्या वैद्यकीय पायाभूत सुविधा देशात उभारल्या गेल्या, त्यांच्या मर्यादा आपल्या सर्वांना माहिती आहेत. पूर्वीच्या काळात, वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे कशाप्रकारे दुर्लक्ष केले गेले, याची आपल्यालाही कल्पना आहे. आपल्या देशातला लोकसंख्येच्या तणावामुळे हे आव्हान अधिकच कठीण झाले आहे. मात्र, असे असतांनाही, कोरोना काळात, जर आपण प्रति लाख लोकसंख्येमधील संसर्गाचे प्रमाण पहिले, मृत्यूदर पहिला तर भारताची स्थिती , मोठमोठ्या विकसित आणि समृध्द देशांच्या तुलनेत पुष्कळच सावरलेली आहे. अगदी एका व्यक्तीचाही अकाली मृत्यू तेवढाच दुःखद आहे, मात्र, भारताने कोरोना काळात, लाखो लोकांचे आयुष्य वाचवले आहे. याचे खूप मोठे श्रेय, आपले परिश्रमी डॉक्टर्स, आपले आरोग्य कर्मचारी आणि आपल्या पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या सर्व कोरोना योद्ध्यांना जाते.

मित्रांनो,

आमच्या सरकारने आरोग्य सुविधांवर सर्वाधिक भर दिला आहे. गेल्या वर्षी, पहिल्या लाटेदरम्यान, आम्ही सुमारे 15 हजार कोटी रुपये निधीची आरोग्य सुविधांसाठी तरतूद केली होती, ज्यातून आपल्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा बळकट करण्यास मदत झाली.यावर्षी, आरोग्यविषयक आर्थिक तरतुदींमध्ये दुपटीपेक्षा अधिक वाढ करत, ती, दोन लाख कोटी रुपयांपेक्षा धिक करण्यात आली आहे. आता आम्ही अशा क्षेत्रांमध्ये आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी, 50 हजार कोटी रुपयांची एक पतहमी योजना घेऊन आलो आहोत. जिथे आरोग्य सुविधांची कमतरता आहे, अशा ठिकाणी ही योजना राबवली जाणार आहे. आम्ही मुलांसाठी आवश्यक आरोग्य पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी देखील 22 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची तरतूद केली आहे.

आज देशात अत्यंत वेगाने नवे एम्स सुरु केले जात आहेत, नवी वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात आहेत. आधुनिक आरोग्य सुविधा निर्माण केल्या जात आहेत. 2014 पर्यंत देशात केवळ सहा एम्स होते. मात्र, गेल्या सात वर्षात 15 नव्या एम्सच्या उभारणीचे काम सुरु झाले आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या देखील सुमारे दीडपटीने वाढली आहे. त्याचाच परिणाम म्हणून,इतक्या कमी काळात, एकीकडे पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये दीडपट वाढ झाली आहे,तर पदव्युत्तर जागांमध्ये 80 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच, इथपर्यंत पोचण्यासाठी जो संघर्ष आपल्याला करावा लागला आहे, तेवढ्या कठीण परिस्थितीचा सामना आपल्या मुलांना करावा लागणार नाही. दुर्गम भागात देखील आपल्या जास्तीत जास्त युवक-युवतींना डॉक्टर बनण्याची संधी मिळेल, त्यांची प्रतिभा, त्यांच्या स्वप्नांना भरारी घेण्याची संधी मिळेल. वैद्यकीय क्षेत्रात होत असलेल्या या बदलांसोबतच, डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी देखील आमचे सरकार वचनबद्ध आहे.आमच्या सरकारने डॉक्टरांवर होणारे हिंसक हल्ले रोखण्यासाठी गेल्या वर्षीच कायद्यात अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच, आम्ही आमच्या कोविड योध्यांसाठी मोफत विमा सुरक्षा योजना देखील घेऊन आलो आहोत. 

मित्रांनो,

कोरोनाविरुद्धची लढाई असो किंवा वैद्यकीय व्यवस्था सुधारण्याचे देशाचे उद्दिष्ट असो, या सर्व कार्यात आपल्याला अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण सर्वांनी,पहिल्या टप्पात लस घेतली, त्यावेळी देशभरात, लसींबाबतचा उत्साह आणि विश्वास कित्येक पटीने वाढला होता. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण सर्वजण कोविड विषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करता, त्यावेळी, लोक संपूर्ण श्रद्धेने त्याचे पालन करतात. आपण आपली ही भूमिका अधिक सक्रीयतेनं पार पाडावी, आपले क्षेत्र अधिक व्यापक करावे, अशी माझी अशी इच्छा आहे.

मित्रांनो,

आणखी एक खूप उत्तम गोष्ट आम्ही पहिली आहे, ती अशी की वैद्यकीय व्यवसायातल्या लोकांनी  योगाविषयी जागरूकता निर्माण करण्यातही पुढाकार घेतला आहे. योगाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी जे काम स्वातंत्र्यानंतर केले जायला हवे होते, ते काम आज होत आहे. या कोरोना काळात, योग-प्राणायामाचा लोकांच्या आरोग्यावर कशाप्रकारे सकारात्मक प्रभाव पडतो आहे, कोविडनंतर येणाऱ्या आजार किंवा त्रासांचा सामना करण्यासाठी योग कशाप्रकारे मदत करतो आहे, यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्राशी संबंधित अनेक संस्थांकडून, पुराव्यावर आधारित अध्ययन केले जात आहे. यासाठी देखील आपल्यापैकी अनेक लोक देखील पुष्कळ लोक बराच वेळ देत आहेत.

मित्रांनो ,

आपल्यापैकी अनेक लोकांना विज्ञानाची माहिती आहे, आपण तज्ञ आहात,विशेषज्ञ आहात त्यामुळे भारतीय योगाला समजून घेणे, साहजिकच तुमच्यासाठी सोपे झाले आहे. जेव्हा तुम्ही सगळे योगावर अध्ययन करता, त्यावेळी सगळे जग त्याकडे गांभीर्याने बघतात. भारतीय वैद्यकीय परिषद, योगाचे अध्ययन आणि प्रसार करण्याचे कार्य मिशन मोडवर करु शकते का? योगावर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे अध्ययन  करू शकेल का? योगावरचे हे अध्ययन आंतरराष्ट्रीय मासिकात प्रकाशित करण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो, त्याचा प्रचार करणे, असा काही प्रयत्न करता येईल का? असे अध्ययन जगभरातील डॉक्टरांना आपल्या रुग्णांना योगाविषयी जागृत करण्यास प्रोत्साहित करेल, असा मला विश्वास वाटतो.

मित्रांनो ,

जेव्हा कधी परिश्रम, बुद्धिमत्ता आणि कौशल्ये यांचा विषय निघतो, त्यावेळी या सर्व गुणांबाबत आपली कोणीही बरोबरी करू शकत नाही, मी आपल्याला ही देखील विनंती करु इच्छितो की आपण संपूर्ण लक्ष देऊन, काळजीपूर्वक आपल्या अनुभवांचे दस्तऐवजीकरण करत रहा. विविध रुग्णांवर उपचार करतांना आपल्याला आलेल्या अनुभवांचे हे दस्तऐवजीकरण अत्यंत महत्वाचे आहे. त्यासोबतच, रुग्णांची लक्षणे, उपचार पद्धत आणि त्यावर रुग्णाकडून मिळालेला प्रतिसाद या सगळ्याची सविस्तर टिपणे लिहून ठेवायला हवीत. हे एक संशोधनवजा अध्ययन ठरू शकेल. जितक्या मोठ्या संख्येने आपण रुग्णांची सेवा आणि काळजी घेत आहात, त्या दृष्टीने पहिले तर आपण आधीच जगात याबाबतीत सर्वात पुढे आहात. सध्याचा काल हे देखील सुनिश्चित करेल, की आपल्या वैज्ञानिक अध्ययनांची जग दखल घेईल आणि येणाऱ्या पिढ्यांना त्याचा लाभ मिळेल. यामुळे एकीकडे जगाला, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित, कित्येक किचकट प्रश्न समजून घेण्यास मदत होईल, त्याचवेळी, त्यावर तोडगा शोधण्यासाठीची दिशा देखील मिळेल. कोविड महामारी यासाठीची एक चांगली सुरुवात होऊ शकेल. लस कशाप्रकारे आपल्याला मदत करत आहे, कशाप्रकारे, आपल्याला लवकर निदान झाल्याचे फायदे मिळत आहेत, किंवा मग एखादी विशिष्ट उपचारपद्धती कशाप्रकारे आपली मदत करत आहे. या सगळ्याबबत आपण जास्तीत जास्त अध्ययन करु शकतो. गेल्या शतकात जेव्हा महामारी आली होती,तेव्हा त्याबाबतचे काही अध्ययन,दस्तऐवज आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत. आज मात्र, आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि आपण कोविडशी कसा सामना केला, याचे प्रत्यक्ष अनुभव शब्दबद्ध करुन त्याचे दस्तऐवजीकरण करु शकलो, तर ते भविष्यात संपूर्ण मानवतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. आपल्या या अनुभवांमुळे वैद्यकीय संशोधनालाही एक नवी गती मिळेल.

शेवटी मी इतकेच सांगेन की आपली सेवा, आपले परिश्रम, आपला “सर्वे भवन्तु सुखिन:’ हा संकल्प साध्य करण्यात निश्चितच उपयुक्त ठरतील. आपला देश कोरोनाविरुध्दचे हे युद्ध तर जिंकेलच, शिवाय विकासाच्या नवी क्षितिजे देखील साध्य करेल.

याच शुभेच्छांसह, आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद !

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732065) Visitor Counter : 253