कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

संकल्प - सर्वसमावेशक वाढीस चालना आणि जिल्हा कौशल्य समित्या बळकट करणे


कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाकडून नऊ आयआयएमना शैक्षणिक भागीदार म्हणून सोबत घेत महात्मा गांधी नॅशनल फेलोशिपची सुरुवात

Posted On: 13 FEB 2021 6:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2021

 
‘संकल्प’ या कार्यक्रमांतर्गत धोरणात्मक भागीदारीतून कौशल्य परिवर्तन’आणि महात्मा गांधी राष्ट्रीय फेलोशिप (एमजीएनएफ) आणि इतर उपक्रमांचा प्रारंभ केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज करण्यात आला.

जिल्हा कौशल्य प्रशासन आणि जिल्हा कौशल्य समित्या (डीएससी) यांना बळकट करण्यासाठी संकल्प (कौशल्य संपादन व उपजीविकेच्या साधनांच्या वाढीसाठी माहितीपर जागरूकता) हा जागतिक बँकेकडून कर्जपुरवठा होणारा कार्यक्रम आहे.

जिल्हा प्रशासनासह प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाच्या अंगभूत घटकांसह हा दोन वर्षांचा शैक्षणिक कार्यक्रम आहे. एमजीएनएफ अंतर्गत असलेले फेलो डीएससीशी संलग्न होण्यासह एकूण कौशल्य परिसंस्था समजून घेण्यासाठी शैक्षणिक कौशल्य आणि तांत्रिक क्षमता प्राप्त करतील आणि त्यांना जिल्हा कौशल्य विकास योजना (डीएसडीपी) तयार करण्याच्या यंत्रणेद्वारे जिल्हा पातळीवर कौशल्य विकास नियोजन व्यवस्थापन करण्यास मदत करतील.

एमजीएनएफच्या पहिल्या तुकडीत 69 जिल्ह्यांत 69 फेलो कार्यरत होते. एमजीएनएफच्या यशस्वी प्रारंभानंतर मंत्रालय आता देशातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये एमजीएनएफचा विस्तार करीत आहे. एमजीएनएफमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता आणि लौकिक कायम ठेवण्यासाठी मंत्रालयाने केवळ आयआयएमबरोबर शैक्षणिक भागीदारी केली आहे आणि  एमजीएनएफचा विस्तार राष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी आयआयएम बेंगळुरू, आयआयएम अहमदाबाद, आयआयएम लखनऊ, आयआयएम कोझिकोडे, आयआयएम विशाखापट्टणम, आयआयएम-उदयपूर, आयआयएम नागपूर, आयआयएम रांची आणि आयआयएम-जम्मू या नऊ आयआयएमना या कार्यक्रमात सहभागी केले आहे.

याव्यतिरिक्त, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि लक्षद्वीप या राज्यांतील जिल्हा अधिकार्‍यांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केरळ स्थानिक प्रशासन संस्थे (केआयएलए) सह भागीदारी केली आहे.

“स्किल इंडियाच्या गेल्या 6 वर्षात देशभरात व्यावसायिक प्रशिक्षणात क्षमता बांधणी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच सुरू झालेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 आणि आमच्या संकल्प योजनेंतर्गत आजच्या आयआयएम, आयआयटी, जीआयझेड-आयजीव्हीट, किला यांच्या शैक्षणिक भागीदारीसह मागणीनुसार कौशल्य सुनिश्चित करून आम्ही जिल्ह्यांना सक्षम बनवू, असे या उपक्रमांबद्दल बोलताना डॉ.महेंद्रनाथ पांडे यांनी सांगितले. या कार्यक्रमांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ च्या दृष्टीकोनानुसार परिवर्तनशील बदल घडवून आणण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणि परिणामांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

स्त्री-पुरुष समानतेबाबत जागरुकता आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध (पीओएसएच) याविषयी कौशल्य प्रशिक्षण” कार्यक्रमाचे देखील यावेळी  आयोजन करण्यात आले. या प्रकल्पाची अंमलबजावणी संस्था म्हणून व्यवस्थापन व उद्योजकता आणि व्यावसायिक कौशल्य परिषद (एमईपीएससी) यांच्या सहयोगातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सहा महिन्यांच्या या प्रकल्पाची राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांतील 15 जिल्ह्यांत अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्यामधून 1800 प्रशिक्षणार्थी आणि 240 व्यावसायिक प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697775) Visitor Counter : 224