श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओकडून आस्थापनांना ईपीएफच्या कक्षेबाहेरील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कर्मचारी नोंदणी अभियान 2026 चा लाभ घेण्याचे आवाहन
प्रविष्टि तिथि:
22 AUG 2026 11:08AM by PIB Mumbai
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ने आस्थापनांना कर्मचारी नोंदणी अभियानाचा (ईईसी 2026) लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हे अभियान 29 जुन 2026 पासून लागू करण्यात आले आहे. हे अभियान, 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2026 या कालावधीत ईपीएफ लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याची विशेष एकदाच उपलब्ध होणारी संधी प्रदान करते.
हे अभियान 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहणार असून, नियोक्त्यांना स्वेच्छेने नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे तसेच पात्र कामगारांना भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीवेतन आणि विमा यांचे लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
ईईसी 2026 च्या अंतर्गत पात्र नियोक्ते, अशा कर्मचाऱ्यांची नोंदणी करू शकतात, जे विहित कालावधीत ईपीएफच्या लाभापासून वंचित राहिले असून हयात आहेत आणि घोषणापत्र दिलेल्या तारखेपासून त्या आस्थापनेत अद्याप कार्यरत आहेत. मागील अनुपालन नियमित करण्यासाठी या अभियानाद्वारे विशिष्ट सवलती देण्यात आल्या आहेत. ज्या प्रकरणी कर्मचाऱ्याचा हिस्सा यापूर्वी कापला गेला नव्हता, तो हिस्सा माफ करण्याच्या तरतुदीचाही यात समावेश आहे.
नियोक्त्यांनी विहित ऑनलाइन प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांची नाव नोंदणी आणि अंशदान जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक घोषित कर्मचाऱ्यासाठी 'उमंग' (UMANG) अॅपद्वारे ‘चेहरा आधारित प्रमाणीकरण’ (Face Authentication) वर आधारित 'सार्वत्रिक खाते क्रमांक' अर्थात यूएएन तयार केला जाईल आणि इलेक्ट्रॉनिक चालान -कम-रिटर्न' (ईसीआर) द्वारे अंशदान जमा केले जाईल.
पात्र कर्मचाऱ्यांना वैधानिक सामाजिक सुरक्षेच्या चौकटीत आणण्यासाठी एक सुनियोजित कार्यपद्धती उपलब्ध करून देऊन, आस्थापना आणि कामगारांना लाभ मिळवून देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. नियोक्त्यांनी, त्यांच्या रोजगार आणि वेतनाच्या नोंदींचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि विहित कालावधीत ईपीएफ लाभाच्या व्याप्तीच्या बाहेर राहिलेल्या पात्र कर्मचाऱ्यांचा शोध घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
नियोक्ते, कर्मचारी, आस्थापना, कंत्राटदार आणि इतर संबंधित घटकांपर्यंत 'ईईसी 2026' ची प्रमुख वैशिष्ट्ये पोहोचवण्यासाठी ईपीएफओद्वारे व्यापक जनजागृती आणि संपर्क उपक्रम राबवले जात आहेत. भारत सरकारची मंत्रालये तसेच विविध विभाग, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था आणि इतर संघटनांना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील आस्थापना आणि सेवा प्रदात्यांमध्ये या अभियानाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
या एकदाच उपलब्ध होणाऱ्या संधीचा लाभ घेण्याचे आणि 31 ऑक्टोबर 2026 रोजी हे अभियान संपण्यापूर्वी पात्र कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन नियोक्त्यांना करण्यात येत आहे.
***
आशिष सांगळे / सविता म्हसकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2302301)
आगंतुक पटल : 12