राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
महाराष्ट्रात नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटकांच्या उत्पादन कारखान्यातील स्फोटात 18 कामगारांचा मृत्यू आणि 24 जण गंभीररीत्या भाजल्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून घेतली दखल
Posted On:
05 MAR 2026 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
महाराष्ट्रात नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील स्फोटके निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान 18 कामगारांचा मृत्यू झाला आणि 24 जण जखमी झाले, या वृत्ताची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) स्वतःहून दखल घेतली आहे. 1 मार्च 2026 रोजी सकाळी 7:00 वाजता कारखान्याच्या पॅकिंग विभागात ही घटना घडली. अनेक पीडितांना गंभीर दुखापतींव्यतिरिक्त 30 ते 80 टक्क्यांपर्यंत गंभीर भाजलेल्या जखमा झाल्या आहेत.
आयोगाने असे निरीक्षण नोंदवले आहे की, जर बातमीतील मजकूर खरा असेल तर तो पीडितांच्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर प्रश्न उपस्थित करतो. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांना नोटीस बजावली आहे आणि दोन आठवड्यांच्या आत या प्रकरणाविषयी सविस्तर अहवाल मागवला आहे. या अहवालात जखमींच्या आरोग्याची स्थिती आणि तपास तसेच जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना भरपाईचे वाटप यांचा समावेश अपेक्षित आहे.
2 मार्च 2026 रोजी प्रसारित झालेल्या माध्यम अहवालानुसार, स्फोटके आणि कारखाना कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याची शक्यता प्राथमिक निष्कर्षांवरून दिसून आली आहे. कारखाना व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235772)
अभ्यागत कक्ष : 59