वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत ‘इवाय ऑंत्रप्रन्यू ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात युवा शक्ती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जागतिक व्यापारावर टकला प्रकाश


भारताची प्रतिभा, तंत्रज्ञान आणि नवउद्योजकता विकासाच्या पुढील टप्प्याला चालना देईल: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री

कृत्रिम बुद्धिमत्ता, मुक्त व्यापार करार आणि युवा नेतृत्व ही विकसित भारत दृष्टिकोनाची गुरुकिल्ली: पियुष गोयल

Posted On: 25 FEB 2026 10:32PM by PIB Mumbai

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज संध्याकाळी मुंबईत येथे ‘इवाय ऑंत्रप्रन्यू ऑफ द इयर’ पुरस्कारांच्या 27 व्या आवृत्तीत बीज भाषण केले. देशभरातील आघाडीचे नवउद्योजक, उद्योग प्रमुख आणि स्टार्टअप संस्थापकांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्र्यांनी हे पुरस्कार प्रदान केले.

भारताचा युवा वर्ग आणि मानवी भांडवल हे देशाच्या विकासाच्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत, हे मेळाव्याला संबोधित करताना, गोयल यांनी अधोरेखित केले. विविध उद्योजक आणि व्यावसायिक नेत्यांशी झालेल्या संवादांचा उल्लेख करताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले की उत्कटता, नवोन्मेष आणि कुशल मनुष्यबळ ही भारताची सर्वात मोठे स्पर्धात्मक ताकद आहे. नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या एआय शिखर परिषदेचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री म्हणाले की, या परिषदेला मिळालेल्या जागतिक प्रतिसादाने भारताच्या नवोन्मेष परिसंस्था आणि तांत्रिक क्षमतांची खोली आणि परिपक्वता स्पष्ट झाली आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या नष्ट करणार नाही तर रुपांतर घडवून आणेल, असे गोयल यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोजगार याविषयीच्या चिंतेवर स्पष्टीकरण देताना सांगितले. भारत दरवर्षी सुमारे 23 लाख स्टेम (एसटीईएम) पदवीधर तयार करतो तसेच देशाकडे तरुण, जुळवून घेणारे आणि महत्त्वाकांक्षी प्रतिभावान मनुष्यबळाचा अद्वितीय साठा आहे असे, त्यांनी नमूद केले. Y2K युगाशी तुलना करत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ताचे पुढील परिवर्तनाचा वळणबिंदू म्हणून वर्णन केले, जो भारतीय व्यवसायांसाठी चांगल्या संधी, उच्च-मूल्याची कामे, मजबूत निर्यात आणि जागतिक समन्वय निर्माण करेल, तसेच सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण आणि प्रणाली प्रशासन यासारख्या क्षेत्रात कुशल व्यावसायिकांची मागणी वाढवेल, असे त्यांनी सांगितले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी भारताच्या वाढत्या जागतिक व्यापारात ठळक उपस्थितीवर देखील प्रकाश टाकला. भारताने 38 राष्ट्रांना व्यापणारे नऊ मुक्त व्यापार करार केले आहेत, ज्यामुळे भारतीय व्यवसायांना जागतिक व्यापाराच्या जवळजवळ दोन तृतीयांश भागात प्राधान्याने प्रवेश मिळत आहे, असेही ते म्हणाले. हे करार भारतीय वस्तू, सेवा, कृषी आणि मत्स्य उत्पादने तसेच कामगार-केंद्रित क्षेत्रांना नवीन बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास, जागतिक मूल्य साखळींमध्ये समाविष्ट होण्यास आणि कौशल्याची गतिशीलता वाढविण्यास मदत करतील, असे त्यांनी सांगितले.

आत्मनिर्भरता म्हणजे एकाकीपणा नाही यावर भर देऊन गोयल म्हणाले की, आत्मनिर्भर भारत म्हणजे जागतिक सहभागातून सक्षम, विश्वासार्ह आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी तयार करणे. उद्योजक आणि उद्योग नेत्यांनी देशभरातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, शेतकरी, निर्यातदार आणि मच्छीमारांपर्यंत जागतिक संधी पोहोचाव्यात असे आवाहन त्यांनी केले. अमृतकाळात युवा भारत देशाला 2047 पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनवण्यात नेतृत्व करेल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करताना गोयल म्हणाले की, भारताचा विकास प्रवास त्याच्या उद्योजक आणि तरुणांच्या बळावर अथकपणे सुरू राहील. सर्व भागधारकांनी विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

***

NehaKulkarni / ShradhhaMukhedkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232978) अभ्यागत कक्ष : 13