रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
84 व्या भारतीय रस्ते परिषदेत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण; शाश्वत आणि आत्मनिर्भर वाहतूक क्षेत्रावर भर
बायो बिटुमेन आणि पुनर्उपयोजित प्लास्टिक – भारताच्या हरित पायाभूत सुविधा उद्दीष्टाकडे वाटचाल
Posted On:
07 NOV 2025 4:39PM by PIB Mumbai
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय रस्ते परिषदेच्या (आयआरसी) 84 व्या वार्षिक सभेला आज संबोधित केले. भुवनेश्वर इथे झालेल्या या परिषदेला ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री पृथ्वीराज हरिचंदन, आयआरसीचे अध्यक्ष प्रा. मनोरंजन परिदा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
इथेनॉल, मिथेनॉल, बायो एलएनजी, सीएनी आणि हरित हायड्रोजन यांचे वाढते उत्पादन आणि वापर यांच्यामुळे भारताने तेल आयात करणारा देश ते तेल निर्यात करणारा देश अशी मजल गाठत आहे, असे गडकरी यांनी अधोरेखित केले. रस्ते सुरक्षेबाबत असलेली सरकारची ठाम वचनबद्धता, आधुनिक अभियांत्रिकीवर दिलेला भर, कुशल वाहतूक यंत्रणा आणि सुरक्षित, कार्यक्षम वाहतुकीबाबतच्या जनजागृतीसाठी सरकारने राबविलेले उपक्रम यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
रस्ते अभियंत्यांची प्रमुख भूमिका अधोरेखित करताना केंद्रिय मंत्री म्हणाले की, त्यांच्या कामातील अचूकता, नवकल्पना यांची अचूक विकास आराखडे तयार करण्यात आणि सुरक्षित, विनासायास महामार्ग विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. महामार्गांच्या बांधकामात ‘बायो बिटुमिन’ आणि पुनर्उपयोजित प्लास्टिकचा वापर केल्यामुळे रस्त्यांचा टिकाऊपणा, शाश्वतता आणि खर्चातील बचत वाढली आहे. शिवाय देशाच्या पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांच्या उद्दीष्टपूर्तीलाही हातभार लागत आहे, असे त्यांनी नमूद केले.
सरकारच्या दृष्टीकोनाचा पुन्हा उल्लेख करुन नितीन गडकरी म्हणाले की, नवकल्पनेवर आधारित, शाश्वत आणि जागतिक दर्जाची वाहतूक व्यवस्था उभी करणे हे आमचे ध्येय आहे. हा सुधारणावादी दृष्टीकोन असंख्य रोजगार निर्माण करेल, पायाभूत सुविधा कौशल्य प्रणाली मजबूत करेल आणि भारताला आत्मनिर्भर, लवचिक भविष्याकडे घेऊन जाईल असेही त्यांनी सांगितले.
***
सुवर्णा बेडेकर/ सुरेखा जोशी/ परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2187657)
Visitor Counter : 4