दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ईएसटीआयसी 2025 मध्ये ‘डिजिटल कम्युनिकेशन’ या विषयावरील सत्रात दूरसंचार विभागाने भारताचा दूरसंचार नवोन्मेष व 6जी दृष्टिकोन मांडला

Posted On: 05 NOV 2025 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025

दूरसंचार विभागाने  3 ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित उदयोन्मुख विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष परिषद(ईएसटीआयसी 2025) मध्ये सहभाग नोंदवला. प्रमुख आयोजकांपैकी एक म्हणून, दूरसंचार विभागाने 5 नोव्हेंबर 2025 रोजी ‘डिजिटल कम्युनिकेशन’ या विषयावर आधारित सत्राचे नेतृत्व केले. हे सत्र दूरसंचार सचिव आणि  डिजिटल कम्युनिकेशन्स कमिशनचे अध्यक्ष डॉ. नीरज मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. देशभरातील प्रमुख शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक आणि आघाडीच्या उद्योजकांनी  या सत्रात सहभाग घेतला.

आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. नीरज मित्तल म्हणाले,"दूरसंचार हे केवळ अर्थव्यवस्थेचेच नव्हे, तर विविध क्षेत्रात नव्या तंत्रज्ञान विकासालाही सक्षम करणारे माध्यम बनले आहे." कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, "या क्षेत्राने आपल्यासाठी अशक्य वाटणारे शक्य करण्याची नवी संधी दिली आहे."

डॉ. मित्तल यांनी नमूद केले की, कनेक्टिव्हिटी हा सर्व उत्पादनक्षम क्रियाकलापांचा कणा  आहे आणि भारतातील दूरसंचार क्रांतीचा देशाच्या आर्थिक वाढीवर थेट परिणाम झाला आहे. पंतप्रधानांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली भारताने जगातील सर्वात वेगवान 5जी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट साध्य केले आहे. देशभरात 100 5जी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे नव्या वापराच्या क्षेत्रांचा विकास आणि 6जी तंत्रज्ञानात भारताचे नेतृत्व सुनिश्चित केले जात आहे.

दूरसंचार सचिव यांनी स्पष्ट केले की, पुढील पिढीचे संप्रेषण हे बहुआयामी आहे.संशोधन व विकासाला चालना देणे, देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि शैक्षणिक संस्था, उद्योग व शासन यांच्यात मजबूत सेतू बांधणे हे त्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

डॉ.मित्तल यांनी भारत 6जी अलायन्स या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या अग्रगण्य उपक्रमाचा उल्लेख केला. या आघाडीने आतापर्यंत जागतिक 6जी संस्थांसोबत 10 आंतरराष्ट्रीय करार केले असून, 2030 पर्यंत जगातील एकूण 6जी पेटंट्समध्ये  10 टक्के योगदान भारताचे असेल, हे उद्दिष्ट ठेवले आहे.

ईएसटीआयसी 2025 ची संकल्पना आहे  ‘विकसित भारत 2047 – शाश्वत नवोन्मेष, तांत्रिक प्रगती आणि सक्षमीकरणाचे नेतृत्व’. या परिषदेचे उद्घाटन 3 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन भारत सरकारच्या 13 मंत्रालये व विभागांनी, भारत सरकारच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे केले आहे.

अधिक माहितीसाठी दूरसंचार विभागाच्या अधिकृत हँडल्सला भेट द्या :

X - https://x.com/DoT_India

Insta-  https://www.instagram.com/department_of_telecom?igsh=MXUxbHFjd3llZTU0YQ==

Fb - https://www.facebook.com/DoTIndia

Youtube: https://youtube.com/@departmentoftelecom?si=DALnhYkt89U5jAaa

 

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2186699) Visitor Counter : 6