जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी नवी दिल्ली येथे “ग्रामीण नळाद्वारे पाणी पुरवठा योजनांच्या संचालन आणि देखभालीसाठी धोरण आराखडा” विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे केले उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2025 10:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2025
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी आज नवी दिल्ली येथे ग्रामीण नळाव्दारे होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचे संचालन आणि देखभालीसाठी धोरण आराखडा (ओ अँड एम) या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय भागधारक सल्लामसलत कार्यशाळेचे उद्घाटन केले. जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या (डीडीडब्ल्यूएस) वतीने 10 आणि 11जुलै, 2025 रोजी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. जल जीवन मिशन (जेजेएम) मध्ये पायाभूत सुविधा निर्मितीपासून शाश्वत सेवा पुरवठ्याकडे संक्रमण होत असताना,पाणी योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित ठेवण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची आहे.

केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी त्यांच्या उद्घाटन भाषणात मिशन एका नवीन टप्प्यात प्रवेश करत असताना मजबूत कार्यान्वयन आणि देखभाल प्रणालींची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, जगात कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात मिशन हाती घेण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि नळाव्दारे पाणी योजनेचा ग्रामीण जीवनावर खूप सकारात्मक प्रभाव पडतो. यामध्ये लोकांचे आरोग्य सुधारणे, अर्थव्यवस्थेत वाढ होणे, असमानता कमी करणे आणि रोगांचा भार कमी करताना वेळ आणि पैसा वाचवणे यासारख्या सर्वांगीण परिणामांचा पाटील यांनी पुनरुच्चार केला.
येत्या काळात ग्रामीण भागात प्रत्येक घरात, दररोज, स्वच्छ पाणी पोहोचते की नाही, यावरच या योजनांचे यश अवलंबून आहे, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, त्यासाठी शाश्वत ‘ओ अँड एम’ वर तडजोड करता येणार नाही. यावेळी त्यांनी मिळालेल्या हक्कांसह जबाबदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः पावसाळ्यासारख्या आव्हानात्मक काळात लक्ष्यित हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, " पंतप्रधानांच्या कल्पनेतील ‘हर घर जल’चे ध्येय साध्य करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे; जेणेकरून कोणीही मागे राहणार नाही. देशामधले पाणी सुरक्षित करण्यासाठी आपण आता एकत्र काम केले पाहिजे."

दोन दिवसांच्या राष्ट्रीय कार्यशाळेच्या संदर्भाची माहिती देताना,डीडीडब्ल्यूएसचे सचिव अशोक के.के. मीना यांनी जल जीवन मिशन अंतर्गत भारताने केलेल्या विक्रमी प्रगतीवर प्रकाश टाकला. या योजनेत 15.66 कोटींहून अधिक ग्रामीण घरांना आता नळाव्दारे पाणी उपलब्ध होत आहे. हे प्रमाण 81% पेक्षा जास्त राष्ट्रीय व्याप्तीचे प्रतिनिधित्व करते. आता खरे आव्हान भविष्यामध्ये विश्वासार्ह आणि सुरक्षित पाणीपुरवठा होत राहील, हे सुनिश्चित करणे आहे, यावर त्यांनी भर दिला.
उद्घाटन सत्रानंतर विषयानुसार गोलमेज चर्चा झाली, ही चर्चा म्हणजे पहिल्या दिवसाचे गाभा सत्र होते.
कार्यशाळेने मिशनच्या चार स्तंभांना पुन्हा पुष्टी दिली: यामध्ये लोकांचा सहभाग (जनभागीदारी), भागधारकांचे सहकार्य, राजकीय इच्छाशक्ती आणि आवश्यक स्त्रोतांचा वापर यांचा समावेश आहे. जल जीवन मिशन ग्रामीण पाणी सेवांच्या स्थानिक मालकी आणि सामुदायिक व्यवस्थापनाकडे वळण्यास निरंतर उत्प्रेरित करीत आहे.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी झालेली चर्चा, ही दुसऱ्या दिवसाची पायाभरणी करणारी आहे. दुसऱ्या दिवशी तांत्रिक हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. ग्रामीण जल प्रशासनामध्ये ‘ओ अँड एम’ म्हणजे कार्यान्वयन आणि देखभाल यांना चालना देण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, जीआयएस, अवकाश तंत्रज्ञान आणि डिजिटल मंचाचा वापर करणे, यावर चर्चा, मार्गदर्शन करण्यात येईल.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2143903)
आगंतुक पटल : 34