कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
किशोरींचे सक्षमीकरण: सोनभद्र येथे ‘नव्या’ या व्यावसायिक प्रशिक्षण उपक्रमाची सुरुवात
किशोरवयीन मुलींना ‘नव्या’च्या माध्यमातून स्वावलंबी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण देण्यात येणार: केंद्रीय मंत्री जयंत चौधरी
Posted On:
24 JUN 2025 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2025
16 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलींना सक्षम करण्याच्या उद्देशासह आज सोनभद्र या उत्तर प्रदेशातील आकांक्षित जिल्ह्यात ‘नव्या’ या परिवर्तनकारी उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. ही केवळ एका कार्यक्रमाची सुरुवात नसून भारताच्या कन्यांच्या रूपातील सक्षम, स्वावलंबी आणि जागरूक नागरिक तयार करण्याच्या दिशेने घेतलेली ऐतिहासिक झेप आहे. किशोरींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन सुसज्ज करण्यासोबतच त्यांना स्वाभिमान, संधी आणि सामाजिक सहभागासाठी मंच उपलब्ध करून देणे हा ‘नव्या’चा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरींसह केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर उपस्थित होत्या.
‘नव्या’ हा केंद्रीय कौशल्यविकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम आहे. किशोरी गटातील मुलींना व्यावसायिक कौशल्ये शिकवून त्यांना आत्मनिर्भर, आत्मविश्वासपूर्ण आणि सक्षम बनवण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. देशभरातील 19 राज्यांतील 27 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्याद्वारे देशाच्या सर्वात दुर्लक्षित भागापर्यंत समान संधींची पोहोच सुनिश्चित करून मुलींना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्यात येणार आहे.
सध्या हा उपक्रम, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या 9 राज्यांतील 9 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. हे जिल्हे नीती आयोगाने आकांक्षित जिल्हे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.
या उपक्रमाअंतर्गत, मुलींना पीएमकेव्हीवाय 4.0 च्या माध्यमातून ग्राफिक डिझायनर, स्मार्टफोन तंत्रज्ञ, ड्रोन असेम्ब्ली तज्ञ, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन तंत्रज्ञ तसेच व्यावसायिक मेकअप कारागीर अशा अपारंपरिक आणि आधुनिक नोकऱ्यांसाठी प्रशिक्षित करण्यात येईल. अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देऊ करून, मुलींना पारंपरिक मर्यादांच्या पलीकडे असलेल्या रोजगार आणि उद्योजकताविषयक संधींशी जोडणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. या मुलींच्या केवळ कौशल्यात वाढ करणे नव्हे तर त्यांच्यात जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ओळख घडवण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
हे प्रशिक्षण केवळ उपजीविकेचा मार्ग न दाखवता, त्याहीपलीकडे जाऊन समग्र व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करण्याच्या हेतूने सुरु करण्यात येत आहे. उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री जयंत चौधरी म्हणाले, “किशोरावस्थेतील मुलींना स्वावलंबी करण्यासाठी त्यांना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यासाठी नव्या’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण केवळ रोजगारापुरते मर्यादित नसून ते या मुलींना लहान व्यवसाय आणि स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी देखील सक्षम करेल.”
याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर म्हणाल्या, “किशोरवयीन मुलींना स्वावलंबी करण्यात ‘नव्या’ हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. मुलींना स्वतंत्र आणि सक्षम नागरिक होणे शक्य करण्यासाठी त्यांना कौशल्ये शिकवून सज्ज करणे ही आमची सामायिक बांधिलकी आहे. हा उपक्रम या मुलींना सन्मानाचे आणि आत्मविश्वासपूर्ण जीवन जगायला उपयुक्त ठरेल.”





N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139389)