नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये सातवी हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट परिषद संपन्न


राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामध्ये उद्योगाचे केले स्वागत

Posted On: 24 JUN 2025 9:25PM by PIB Mumbai

पुणे/मुंबई, 24 जून 2025
 

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्र सरकार, पवनहंस आणि फिक्की यांच्या सहयोगाने  पुणे येथे सातव्या हेलिकॉप्टर अँड स्मॉल एअरक्राफ्ट परिषदेचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू, तर सन्माननीय अतिथी म्हणून नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

 

आपल्या बीज भाषणात, केंद्रीय मंत्री राममोहन नायडू किंजरापू म्हणाले की, भविष्यकालीन विमान वाहतूक परिसंस्थेचे आवश्यक घटक म्हणून हेलिकॉप्टर आणि लहान विमानांना प्रोत्साहन द्यायला हवे. ते म्हणाले, “माझा असा विश्वास आहे की पुढील दशकातील विमान वाहतूक केवळ मोठी विमाने आणि मोठ्या विमानतळांद्वारे नव्हे तर आधुनिक आणि समावेशक हवाई उपायांद्वारे परिभाषित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, हेलिकॉप्टर आणि छोटी विमाने ही विमान वाहतूकीच्या लोकशाहीकरणाच्या आमच्या उद्दिष्टाच्या केंद्रस्थानी आहेत.”

केंद्रीय मंत्र्यांनी डीजीसीए अंतर्गत एक समर्पित हेलिकॉप्टर संचालनालय स्थापन करण्याची घोषणा केली, जे सिंगल-विंडो नियामक देखरेख प्रदान करेल, हेलिकॉप्टर-विशेष सुरक्षा आणि प्रमाणपत्रांशी संबंधित समस्यांचे निराकरण करेल आणि ऑपरेटरच्या प्रक्रियात्मक गरजा पूर्ण करेल.

ऑपरेटर्स आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांशी बोलताना, त्यांनी मजबूत सुरक्षा संस्कृती तयार करण्यावर भर दिला. ते म्हणाले, “प्रवाश्यांची  सुरक्षा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी, कोणताही शॉर्टकट असता कामा नाही, संवादातील चुकांना जागा नाही आणि चुकीचा निर्णय घेण्याला वाव असता कामा नये. आपण विश्वास, संवाद आणि शिस्तीची संस्कृती निर्माण करायला हवी, जी केंद्र, राज्ये आणि ऑपरेटर्सची सामायिक जबाबदारी आहे असे मला वाटते.”

‘विकसित भारत 2047’ साठी सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देताना, किंजरापू राममोहन नायडू म्हणाले की, हेलिकॉप्टर आणि लहान विमाने भारताची प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी, आर्थिक परिवर्तन आणि सर्वसमावेशक विकासाचा कणा बनतील.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "आम्ही आमच्या हवाई वाहतूक प्रणालींचे आधुनिकीकरण करत आहोत, हरित इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देत आहोत आणि eVTOL सारख्या भविष्यकालीन विमानांना धोरणात्मक प्राधान्यांच्या क्षेत्रात आणत आहोत."

आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेवर भर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, “विमान वाहतूक क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने, आम्ही वैमानिक, देखभाल कर्मचारी, ड्रोन ऑपरेटर आणि रोटरक्राफ्ट तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. यामुळे येत्या दशकात आपले तरुण केवळ या क्षेत्रात सहभागी होणार नाहीत, तर त्याचे नेतृत्वही करतील.”

हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवांबद्दल बोलताना ते म्हणाले, “विशेषतः डोंगराळ आणि दुर्गम भागात, एअर अॅम्ब्युलन्स एक सामान्य सुविधा बनावी यासाठी HEMS ला बळकटी दिली जात आहे. ही जीवनरक्षक सेवा देशाच्या आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांचा अविभाज्य भाग बनवणे, हे आमचे उद्दिष्ट आहे.”

या परिषदेत 20 राज्य सरकारे, उद्योग क्षेत्रातील नेते, आयएफएससीए (गिफ्ट सिटी), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, डीजीसीए, एएआय आणि पवनहंस लिमिटेडचे उच्चपदस्थ अधिकारी सक्रीयपणे सहभागी झाले.

या परिषदेत डीजीसीएसुरक्षा नियम, आयएफएससीएच्या नेतृत्वाखाली वित्तपुरवठा आणि भाडेतत्त्वावरील संधी आणि ओईएम आणि ऑपरेटर्ससाठी ऑपरेशनल आव्हाने यावरील तांत्रिक सत्रांचा समावेश होता.

राज्य सरकारी अधिकाऱ्यांनी प्रादेशिक आकांक्षा आणि संधींवर प्रकाश टाकला, तर उद्योग क्षेत्रातील भागधारकांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता आणि वित्तपुरवठा चौकटींबद्दल दृष्टीकोन मांडला. 

   

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2139387)
Read this releasein: English , Urdu , Hindi