विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
शाश्वत स्टार्टअप्स उभारण्यासाठी आयआयटी, आयआयएम, एम्स, आयआयएमसी आणि सीएसआयआर यासारख्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये घनिष्ट सहकार्याचे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे आवाहन
नवोन्मेषाला गती देण्यासाठी आणि महत्वाकांक्षी उद्दिष्टे गाठण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याचे डॉ.जितेंद्र सिंह यांचे आवाहन
Posted On:
24 JUN 2025 8:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2025
शाश्वत स्टार्टअप्स आणि नवोन्मेष-संचालित उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयआयटी, आयआयएम, एम्स, आयआयएमसी आणि सीएसआयआर यासारख्या उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये घनिष्ट सहकार्याचे आवाहन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले आहे. ते आज (24 जून 2025) आयआयएम मुंबई येथे अत्याधुनिक इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर बोलत होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, डॉ. सिंह यांनी भर दिला की, "वेगवेगळ्या विभागांनी आपापले काम स्वतंत्रपणे, कप्प्या- कप्प्यामध्ये करण्याचे युग आता संपले आहे." भारताची जलद विकासाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी शिक्षण क्षेत्र, उद्योग आणि सरकार यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. "सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमध्ये अधिक समन्वय हा पर्याय नसून, ती एक आवश्यकता आहे," ते म्हणाले.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी नागरी सेवांचे लोकशाहीकरण आणि गेल्या दशकभरातील महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या वाढत्या लाटेवर प्रकाश टाकला.
डॉ. सिंह यांनी मागील 11 वर्षे आणि त्याआधीच्या दशकातील तफावत लक्षात घेऊन आधीच्या पिढ्यांकडे करिअरचे पर्याय मर्यादित होते असे नमूद केले. त्यांनी असेही नमूद केले की अलिकडच्या काळात, मुलींनी नागरी सेवा परीक्षेत सातत्याने अव्वल स्थान मिळवले आहे, जे देशाच्या सामाजिक परिदृश्यात लक्षणीय बदल झाल्याचे संकेत आहेत.

त्यांनी BioE3 हे धोरण- अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि रोजगारासाठी जैव तंत्रज्ञान, हे गेम-चेंजर ठरल्याचे नमूद केले, ज्यामुळे जागतिक बायोटेकमध्ये आघाडीवर राहण्याच्या दृष्टीने भारताला चालना मिळत आहे.
भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था म्हणून उदयाला येत आहे, असे सांगून डॉ. सिंह यांनी खुलासा केला की स्टार्टअपची संख्या 2014 मधील 350 वरून 2025 मध्ये 1.5 लाखांवर पोहोचली आहे.
त्यांनी असेही अधोरेखित केले की राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP-2020) हे स्टार्टअप परिसंस्थेला मजबूत समर्थन देत असून, ते विद्यार्थ्यांना विषय निवडीमध्ये लवचिकता देते आणि केवळ रोजगार शोधणारेच नव्हे तर नवोन्मेषक बनण्यासाठी एक समग्र शैक्षणिक वातावरण देते.

जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे योगदान सुमारे 14% असले तरी ते भारताच्या लोकसंख्येच्या सर्वात मोठ्या वर्गाला आधार देते, याकडे डॉ. सिंह यांनी लक्ष वेधले. या क्षेत्रातील दडलेली क्षमता आणि ती उपयोगात आणण्यासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा वापर करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. डॉ. सिंह यांनी सध्याचे तरुण "भाग्यवान आणि अद्वितीय स्थानी” असल्याचे म्हटले आहे, कारण 2047 मध्ये, जेव्हा भारत आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा ते त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असतील.
“तुम्ही अशी पिढी आहात जी विकसित भारताचे नेतृत्व करेल - एक पूर्णपणे विकसित भारत. "ही तुमच्यासाठी केवळ संधी नाही, तर ती तुमची जबाबदारी आहे," असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले, की त्यांनी राष्ट्राचे भविष्य घडवण्यामधील आपली ऐतिहासिक भूमिका बजावण्यासाठी सज्ज व्हावे.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2139366)