रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वेमंत्र्यांनी मारुती सुझुकी इंडिया लि., मानेसर येथे भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गति शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे केले उद्घाटन

Posted On: 17 JUN 2025 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2025

 

माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज हरियाणातील मानेसर येथील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड येथे देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गति शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केले.

मारुती सुझुकीच्या मानेसर येथील प्रकल्पातील गति शक्ती कार्गो टर्मिनल हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा विकास प्रकल्प असून, त्यामुळे ऑटोमोबाईल वाहतुकीच्या लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेत लक्षणीयरित्या वाढ होणार आहे. या गतिशक्ती कार्गो टर्मिनलची लोडिंग क्षमता भारतातील सर्वाधिक क्षमतेपैकी एक, म्हणजेच वार्षिक 4.5 लाख वाहने इतकी आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना, गेल्या दशकात भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांना अधोरेखित केले. ते म्हणाले, “2014 पूर्वी रेल्वेचा वार्षिक अर्थसंकल्प 24,000 ते 25,000 कोटी रुपयांच्या जवळपास असायचा. आता त्यात  वाढ करून तो 2.5 लाख कोटी झाला आहे. अनेक स्थानकांवर आणि डब्यांमध्ये शौचालये यांसारख्या मूलभूत प्रवासी सुविधा उपलब्ध नव्हत्या. गेल्या अडीच वर्षांत, सामान्य श्रेणीच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी एक केंद्रित अभियान सुरू करण्यात आले आहे. केवळ गेल्या एका वर्षात 1200 पेक्षा जास्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रवासी रेल्वे सेवा अद्ययावत करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता 100 पेक्षा जास्त मेमू गाड्यांची क्षमता वाढवली जाईल — त्यांची रचना 8 ते 12 डब्यांवरून 16 ते 20 डब्यांपर्यंत वाढवली जाईल — ज्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.  100 पेक्षा जास्त मेमू गाड्यांच्या निर्मितीसाठी आंध्र प्रदेशातील काझीपेट येथे एक नवीन कारखाना उभारण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नमो भारत ट्रेनच्या यशस्वी प्रारंभाचा संदर्भ देत ते म्हणाले, “सध्या कार्यरत असलेल्या दोन नमो भारत ट्रेनना मिळालेल्या जोरदार सार्वजनिक प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन, आम्ही वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यासाठी 50 नवीन नमो भारत ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवासी आणि मालवाहतुकीच्या कामगिरीबाबत बोलताना, “आर्थिक वर्ष 2023–24 मध्ये भारतीय रेल्वेने अंदाजे 720 कोटी प्रवाशांची आणि 1,617 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. या कामगिरीमुळे भारतीय रेल्वेने जागतिक स्तरावर दुसरी सर्वाधिक मालवाहतूक नोंदवली, ज्यामुळे 2023–24 हे वर्ष ऐतिहासिक ठरले, असे त्यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सोयीबद्दल बोलताना, मंत्र्यांनी तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये एका महत्त्वपूर्ण सुधारणेची घोषणा केली, जी एक जुलै 2025 पासून लागू होईल. ते म्हणाले, “नवीन नियमानुसार, बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांत, केवळ आधार-प्रमाणीकृत (Aadhaar-authenticated) आणि केवायसी-सत्यापित वापरकर्त्यांनाच  तत्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी असेल. या उपायामुळे वास्तविक प्रवाशांनाच तिकीटे उपलब्ध होतील  हे सुनिश्चित करण्यास मदत होईल.”

अमृत भारत ट्रेनच्या सुरुवातीबद्दल बोलताना, मंत्री म्हणाले, “तीन अमृत भारत ट्रेन सध्या कार्यरत आहेत आणि त्यांना जनतेचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काही दिवसांत, आणखी सहा अमृत भारत ट्रेन सुरू केल्या जातील आणि, आणखी 50 ट्रेनचे उत्पादन सुरू आहे, आणि त्यानंतर आणखी तुकड्या येतील, असे ते म्हणाले.

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2136996)