सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अस्वीकरण : किलादी उत्खनन अहवालाबाबत माध्यमांमध्ये प्रसारित माहितीच्या संदर्भात स्पष्टीकरण

Posted On: 29 MAY 2025 5:04PM by PIB Mumbai

नवी ‍‍दिल्ली, 29 मे 2025


तामिळनाडूमध्ये शिवगंगा जिल्ह्यातील किलादी उत्खननावर आधारित अहवालाच्या प्रकाशनासंदर्भात अलीकडच्या काळात काही माध्यमांतर्फे प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) प्रतिसाद आणि अस्वीकरण स्वरुपात खालील उत्तर दिले असून संबंधित माध्यम प्रकाशनांनी ते त्वरित प्रकाशित करावे असे सांगण्यात आले आहे.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग एएसआय महासंचालकांच्या अधिपत्याखाली उत्खनन झालेल्या स्थळांवर आधारित अहवाल वेळोवेळी प्रकाशित करत असतो. प्रत्येक उत्खनन कार्यावर बराच वेळ, शक्ती आणि पैसे खर्च होत असल्यामुळे आणि उत्खननाचा मूळ उद्देश बऱ्याचदा पूर्ण होत नसल्यामुळे या पैलूवर अधिक भर दिला जातो.

एका सुनिश्चित प्रक्रियेनुसार, उत्खननकर्त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर हे अहवाल विविध विषय तज्ञांकडे पाठवले जातात आणि त्यांना प्रकाशनासाठी पाठवण्यात येणाऱ्या अहवालांची पडताळणी करण्याची विनंती करण्यात येते. विषय तज्ञांनी सुचवल्यानुसार उत्खननकर्त्यांनी त्यात विविध बदल केल्यानंतर हे अहवाल अंतिमतः प्रकाशनासाठी पाठवण्यात येतात. हे अहवाल एमएएसआय म्हणजेच मेमॉयर्स ऑफ आर्किऑलॉंजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेतर्फे प्रकशित केले जातात.

किलादी अहवालाच्या बाबतीत हीच प्रक्रिया अनुसरली गेली. हा अहवाल पडताळणीसाठी तज्ञांकडे पाठवण्यात आला.किलादीमध्ये सहभागी उत्खननकर्त्याने सादर केलेल्या अहवालात तज्ञांनी सुचवलेल्या आवश्यक दुरुस्तीबद्दल त्याला कळवण्यात आले असले तरी त्याने आजपर्यंत अहवालात दुरुस्ती केलेली नाही.

काही माध्यमांमध्ये यासंदर्भात प्रसारित माहिती दिशाभूल करणारी तसेच असत्य असून ती संपूर्णपणे आणि जोरदारपणे नाकारण्यात येत आहे. महासंचालक तसेच एएसआयचे अधिकारी उत्खनन स्थळाचे महत्त्व जाणून आहेत, मात्र याबाबतचे सर्व अहवाल प्रकाशनासाठी पाठवण्यापूर्वी त्यांची  योग्य पडताळणी, संपादन, शुद्धलेखन तपासणी तसेच संरेखन करणे आवश्यक आहे. किलादी अहवाल प्रकाशित करण्यात एएसआयला स्वारस्य नाही,  हा केवळ कल्पनाविलास असून विभागाची मुद्दाम बदनामी करण्याच्या हेतूने असा समाज पसरवण्यात आला आहे.

संचालक (उत्खनन आणि अन्वेषण विभाग) यांनी दिलेले पत्र ही नियमित बाब असून अहवालात अवश्य बदल करण्यासंदर्भात हे संचालक नियमितपणे उत्खननकर्त्यांना पत्र लिहित असतात.

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग पुन्हा एकदा माध्यमांना या विषयाचे बारकावे नीट समजून घेण्याची, पुरातत्वविद्येसारख्या तांत्रिक विषयाचा प्रत्येक पैलू तपासून पाहण्याची आणि कोणतीही बाब प्रकाशित करण्यापूर्वी त्याची समग्र समजूत विकसित करण्याची विनंती करत आहे.विद्वान माध्यमे अशा तांत्रिक बाबींशी संबंधित विहित प्रक्रिया समजून घेण्यासाठी काही अधिकचे कष्ट घेतील अशी अपेक्षा देखील विभागाने व्यक्त केली आहे.

यासंदर्भातील कोणत्याही चौकशीसाठी कृपया एएसआयच्या संयुक्त महासंचालक नंदिनी भट्टाचार्य यांना 9324608991 या क्रमांकावर संपर्क साधावा.

S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2132369)