ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वर्ष 2025-26 च्या साखर हंगामासाठी साखर कारखान्यांद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देय उसाच्या रास्त आणि किफायतशीर किंमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी


ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 355 रुपये रास्त आणि किफायतशीर भाव

5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि शेती संबंधित सहाय्यक काम करणाऱ्या 5 लाख कामगारांना या निर्णयाचा लाभ

Posted On: 30 APR 2025 6:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2025

 

उस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने 2025-26 (ऑक्टोबर - सप्टेंबर) साखर हंगामासाठी उसाचे रास्त  आणि किफायतशीर मूल्य (एफआरपी) 10.25% च्या मूळ पुनर्प्राप्ती दरासाठी 355 रुपये प्रति क्विंटल दराने मंजूर केले आहे. यामध्ये 10.25% पेक्षा जास्त वसुलीत प्रत्येक 0.1% वाढीसाठी 3.46 रुपये प्रति क्विंटल प्रीमियम आणि वसुलीत प्रत्येक 0.1%  घटीसाठी एफआरपी  मध्ये 3.46 रुपये प्रति क्विंटल दराने कपात करण्यात आली आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारने  निर्णय घेतला आहे की ज्या साखर कारखान्यांची वसुली 9.5% पेक्षा कमी आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही कपात केली जाणार नाही. अशा शेतकऱ्यांना 2025-26 च्या आगामी साखर हंगामात उसासाठी 329.05 रुपये प्रति क्विंटल मिळतील.

2025-26 च्या साखर हंगामासाठी उसाचा उत्पादन खर्च (ए2 +एफएल) 173 रुपये प्रति क्विंटल आहे. 10.25% च्या पुनर्प्राप्ती दराने 355 रुपये प्रति क्विंटल एफआरपी हा उत्पादन खर्चापेक्षा 105.2% अधिक आहे. 2025-26 च्या साखर हंगामासाठीचा एफआरपी चालू साखर हंगाम 2024-25 पेक्षा 4.41% जास्त आहे.

मंजूर केलेला एफआरपी   2025-26 च्या साखर हंगामात (1ऑक्टोबर , 2025 पासून सुरु ) साखर कारखान्यांद्वारे शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करण्यासाठी लागू असेल. साखर क्षेत्र हे एक महत्त्वाचे कृषी-आधारित क्षेत्र आहे ज्याचा प्रभाव सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर  अवलंबून असलेले तसेच शेतमजूर आणि वाहतूक यासारख्या विविध सहाय्यक कामांमध्ये काम करणाऱ्यांव्यतिरिक्त साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष  काम करणाऱ्या सुमारे 5 लाख कामगारांच्या उपजीविकेवर पडतो.

पार्श्वभूमी:

कृषी व्यय आणि मूल्य  आयोगाच्या  शिफारशींच्या आधारे आणि राज्य सरकारे आणि इतर हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर एफआरपी निश्चित करण्यात आला आहे.

मागील साखर हंगाम 2023-24 मध्ये, 28.04.2025 पर्यंत  शेतकऱ्यांना देय असलेल्या 1,11,782 कोटी रुपयांपैकी सुमारे 1,11,703  कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत; अशा प्रकारे, 99.92% ऊस थकबाकी देऊन झाली आहे. चालू साखर हंगाम 2024-25, मध्ये, 28.04.2025 पर्यंत  शेतकऱ्यांना देय असलेल्या 97,270 कोटी रुपयांपैकी सुमारे 85,094 कोटी रुपये अदा करण्यात आली असून    उसाची 87% थकबाकी देऊन झाली आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2125544) Visitor Counter : 14