कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांचे "व्हिजन इंडिया" जाणून, "विकसित भारताच्या" उद्दिष्ट्य साध्य करण्याचा ध्यास घेतला : केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
12 JAN 2024 6:27PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांचे "व्हिजन इंडिया", अर्थात भारतासाठी असलेला दृष्टीकोन जाणला, आणि भारताला "विकसित भारताच्या" उद्दिष्टापर्यंत घेऊन जाण्याचा ध्यास घेतला आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज जम्मू येथे सांगितले.

डॉ. जितेंद्र सिंह आज जम्मूमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंती निमित्त आणि अंबफल्ला येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन मिशन चॅरिटेबल रुग्णालयाच्या 54 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी युवकांच्या क्षमता विकासावर भर दिला, जेणेकरून ते त्यांच्या प्रतिभेची पूर्ण ताकद ओळखू शकतील आणि त्या दिशेने आपल्यामधील उर्जेला दिशा देतील.
अमृत काळाच्या पुढील 25 वर्षांमध्ये प्रत्येकाने आपली शक्ती, क्षमता आणि प्रतिभेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले, जेणेकरून ते 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये आपले योगदान देऊ शकतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी ) 2020 आणले, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. स्वामी विवेकानंदांच्या मते, शिक्षणाचे ध्येय क्षमताबांधणी आणि माणसाचा विकास, हे असायला हवे. याच ध्येयाने प्रेरित होऊन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यात आले असून विद्यार्थ्यांमधील अंतर्निहित प्रतिभा आणि योग्यता यांना वाव देण्यावर धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे, डॉ. सिंह यांनी सांगितले. पूर्वी विद्यार्थी पालकांच्या आकांक्षांचे कैदी होते; आता त्यांना त्यांच्या स्वाभाविक कलानुसार विषय निवडण्याचे आणि बदलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. हे सक्षमीकरण एनईपी 2020 मुळे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले.
सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रमुख वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली. थेट लाभ हस्तांतरणामुळे (डीबीटी ) लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रोख लाभ पोहोचण्याची खातरजमा होऊन मध्यस्थांना प्रणालीतून दूर करून अधिक पारदर्शकता आणली गेली असल्याचे सिंह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धर्म, जातीचा कोणताही भेदभाव न करता दिला जात मोफत गॅस सिलिंडर आहे.

वैद्यकीय क्षेत्रात अधिक सार्वजनिक-खासगी भागीदारीची आवश्यकता डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. विविध संस्थांमधील समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कोविड लस, चंद्रयान, आणि अरोमा अभियान या भारताच्या अलीकडील यशाची उदाहरणे त्यांनी दिली आणि समन्वित प्रयत्नांचा ही फलनिष्पत्ती असल्याचे सांगितले.
***
S.Bedekar/R.Agashe/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1995665)