रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

बिहारमधील दिघा आणि सोने पूर यांना जोडणाऱ्या गंगा नदीवरील 4.56 किमी लांबीच्या 6 मार्गिकांच्या नवीन पुलाच्या बांधकामाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 27 DEC 2023 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या  आर्थिक व्यवहार   समितीच्या बैठकीमध्‍ये बिहारमधील दिघा आणि सोनेपूर यांना जोडणाऱ्या गंगा नदीवरील 4.56 किमी लांबीच्या 6 मार्गिकांच्या नवीन पुलाच्या बांधकामाला  मंजुरी देण्यात आली. हा  पूल सध्‍या पश्चिम बाजूला अस्तित्वात असलेल्या दिघा-सोनेपूर रेल्वे कम रस्ते पुलाला समांतर बांधण्‍यात येणार आहे.   हा पूल  बिहार राज्यातील पाटणा आणि सारण  जिल्‍ह्यात येत असून तो ईपीसी म्हणजे -अभियांत्रिकी,खरेदी आणि बांधकाम तत्वावार बांधण्‍यात येणार आहे.  

खर्चामध्‍ये  समाविष्ट कामे :

या प्रकल्पाची एकूण किंमत 3,064.45 कोटी रूपये आहे. त्यामध्‍ये 2,233.81 कोटी रूपये  बांधकाम खर्चाचा समावेश आहे.

लाभार्थ्यांची संख्या:

या पुलामुळे राज्याचा, विशेषतः उत्तर बिहारचा सर्वांगीण विकास होऊन वाहतूक वेगवान  आणि सुलभ होईल.

तपशील:

दिघा (पाटणा आणि गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे) आणि सोनेपूर (सारण जिल्ह्यातील गंगा नदीचा उत्तर किनारा आहे) सध्या फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी रेल्वे कम रोड ब्रिजने जोडलेले आहेत. त्यामुळे सध्याचा रस्ता हा मालमोटार वाहतूक  आणि  अवजड वाहतुकीसाठी वापरला जाऊ शकत नाही. त्यामुळे  मोठा आर्थिक फटका बसत आहे. दिघा ते सोनेपूर दरम्यान हा पूल बांधून वाहतुकीमधील  अडथळे दूर केले जातील आणि  पूल बांधल्यानंतर या प्रदेशाची आर्थिक क्षमता वाढविण्‍यासाठी मालवाहतूक करणे शक्य होणार आहे.

हा पूल पाटणा ते औरंगाबाद येथील एनएच-139 मार्गे स्वर्णिम  चतुर्भुज कॉरिडॉर आणि बिहारच्या उत्तरेकडील सोनेपूर (एनएच-31), छप्रा, मोतिहारी (पूर्व-पश्चिम कॉरिडॉर जुना एनएच-27), बेतिया (एनएच-727) यांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.  हा प्रकल्प बुद्ध सर्किटचा एक भाग आहे. त्यामुळे  वैशाली आणि केशरिया येथील बुद्ध स्तूपांना उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान होईल. तसेच, एनएच-139डब्ल्यू मार्ग  पूर्व चंपारण जिल्ह्यातील केशरिया येथे अतिशय प्रसिद्ध अरेराज सोमेश्वर नाथ मंदिर आणि प्रस्तावित विराट रामायण मंदिर (जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक) यांना कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

हा प्रकल्प पाटणामध्‍ये होत आहे त्यामुळे  बिहार राज्याच्या राजधानीद्वारे उत्तर बिहार आणि बिहारच्या दक्षिण भागाला चांगली कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. या पुलामुळे वाहनांची वाहतूक जलद आणि सुलभ होईल, परिणामी प्रदेशाचा सर्वांगीण विकास होईल. आर्थिक विश्लेषणाच्या परिणामांनुसार  ‘बेस केस’मध्ये 17.6% ईआयआरआर  दर्शविण्‍यात आला आहे. कारण यामुळे   अंतर आणि प्रवासाच्या वेळेत  बचत होणार आहे.

अंमलबजावणीचे  धोरण आणि उद्दिष्टे:

बांधकाम आणि कामकाजाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी 5D-बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM), ब्रिज हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम (BHMS), मासिक ड्रोन मॅपिंग यासारख्या नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून ‘ईपीसी’  तत्वावर कामाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

हे काम निर्धारित तारखेपासून 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

रोजगार निर्मिती क्षमतेसह महत्वाचे  परिणाम:

  1. बिहारच्या उत्तर आणि दक्षिण भागांमध्ये वेगवान  दळणवळण आणि उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अशा प्रकारे, संपूर्ण प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक वाढीस चालना देणे.
  2. प्रकल्पाच्या बांधकाम आणि देखभाल कालावधी दरम्यान केलेल्या विविध उपक्रमांमुळे कुशल आणि अकुशल कामगारांसाठी थेट रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे.

समाविष्ट राज्ये/जिल्हे:

हा पूल दक्षिणेकडील पाटणा  जिल्ह्यातील दिघा  आणि बिहारमधील गंगा नदीच्या उत्तरेकडील सारण या दोन जिल्ह्यांना जोडणार आहे.

पार्श्वभूमी:

सरकारने 8 जुलै 2021 च्या राजपत्र अधिसूचनेद्वारे "पाटणा (एम्स) जवळील एनएच-139 च्या जंक्शनपासून बकरपूर, माणिकपूर, साहेबगंज, अरेराजला जोडणारा आणि बिहार राज्यातील बेतियाजवळ एनएच- 727 च्या जंक्शनवर संपणारा महामार्ग एनएच -139(डब्ल्यू)  म्हणून घोषित केला आहे.

 

Jaydevi PS/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1990992) Visitor Counter : 75