माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पीएम स्वनिधी योजनेची यशोगाथा : ट्रान्सजेंडर समुदायातील व्यक्तीने खानपान व्यवसाय चालवून मांडले आदर्श उदाहरण


विदर्भात 'विकसित भारत संकल्प यात्रा' करत आहे यशस्वीपणे मार्गक्रमण, लाभार्थींनी 'मेरी कहानी मेरी जुबानी' अंतर्गत मांडले त्यांचे अनुभव

Posted On: 13 DEC 2023 7:50PM by PIB Mumbai

नागपूर, 13 डिसेंबर 2023

 

विदर्भात 'विकसित भारत संकल्प यात्रा' यशस्वीपणे मार्गक्रमण करत  आहे, दिवसेंदिवस अधिकाधिक नागरिक या यात्रेशी  जोडले जात आहेत. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी 'मेरी कहानी मेरी जुबानी' या मालिके अंतर्गत  त्यांचे अनुभव मांडत आहेत. असेच एक  अनोखे उदाहरण वर्धा येथे पाहायला मिळाले.

ट्रान्सजेंडर समुदायातील  निलेश हे  पीएम स्वनिधी  योजनेचे  लाभार्थी आहेत   या योजने अंतर्गत   केंद्र सरकारकडून 10,000 रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतल्यानंतर ते  आपला खानपान व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत.या माध्यमातून निलेश यांनी  केवळ ट्रान्सजेंडर समुदायासमोरच नव्हे तर संपूर्ण समाजासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे.

कोविड महामारीच्या  लॉकडाऊनच्या काळात अनेक छोट्या  विक्रेत्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजनेंतर्गत बिनव्याजी कर्ज द्यायला सुरुवात केली. निलेश यांनी हे  10000 रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर काही आवश्यक साहित्य आणले आणि त्यांच्या  व्यवसायात सुधारणा केली. निलेश यांनी  वर्धा येथे मोहिनी बचत गट  नावाचा स्थानिक बचत गट देखील स्थापन केला आहे. या बचत गटामध्ये एकूण 7 ट्रान्सजेंडर आणि 4 महिला सदस्य आहेत, जिथे प्रत्येक सदस्य दरमहा 200 रुपयांची बचत करतो. जेव्हा निलेश यांनी  आपला खाद्यपदार्थांचा  व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला कारण लोक ट्रान्सजेंडरला खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यास टाळाटाळ करत असत. पण निलेश यांनी  सकारात्मक राहात  कामावर लक्ष केंद्रित केले. हळुहळू गोष्टी   बदलल्या आणि निलेश  आपला व्यवसाय स्थापित करण्यात यशस्वी झाले. आपला अनुभव सांगताना निलेश म्हणाले की,  पीएम स्वनिधी योजना त्यांच्यासाठी वरदान  ठरली .त्यांनी  केंद्र सरकारचे आभार मानले आणि त्यांच्यासारख्या शिक्षित ट्रान्सजेंडरसाठी आणखी योजना सुरू केल्या जातील अशी आशा व्यक्त केली.

आणखी एक लाभार्थी शाहीन परवीन वसीम खान यांनी अमरावती जिल्ह्यातील येसूर्ना गावात विकसित भारत संकल्प यात्रेत आपली 'कहाणी' सांगितली. शाहीन या  स्थानिक बचत गटाच्या  सचिव आहेत .त्यांनी सांगितले की,   गावात त्या नेहमीप्रमाणे आयुष्य जगत होत्या. घरच्या कामात त्या दिवसभर व्यस्त असायच्या. पण 2019 मध्ये केंद्र सरकारच्या प्रोत्साहनाने त्यांच्या  गावात एकूण 14 स्थानिक बचत गट स्थापन करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी जेव्हा सांगितले की, बचत  गटात सहभागी  व्हायचे आहे तेव्हा त्यांना त्यांच्या  कुटुंबाच्या नाराजीचा सामना करावा लागला. जर तू बचतगटात सहभागी झालीस तर तुला बँकांमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी जावे लागेल, हे तुला कसे काय जमणार ? असे त्यांच्या कुटुंबीयांनी  त्यांना विचारले . " बीएचे शिक्षण पूर्ण केलेली मी एक सुशिक्षित महिला आहे  मी हे चांगले सांभाळू  शकते", असे उत्तर शाहीन यांनी त्यांच्या  कुटुंबातील सदस्यांना दिले.आणि आज 4 वर्षे झाली आहेत आणि हा बचत गट  खूप छान सुरु आहे , असे शाहीन यांनी सांगितले.

अशाप्रकारे, केंद्र सरकारच्या विविध योजनांचे फलित म्हणून लाभार्थ्यांच्या  जीवनात सामाजिक आर्थिक बदल कसे घडले हे सांगण्यासाठी 'विकास भारत संकल्प यात्रा' अनेक लाभार्थ्यांना  एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.

 

* * *

PIB Nagpur | N.Chitale/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1986032) Visitor Counter : 79


Read this release in: English