माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इफ्फी- 54 मध्ये इन कन्व्हरसेशन अंतर्गत दिग्गज क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनने आपल्या चरित्रपटावर घेतले मार्गदर्शन सत्र


चित्रपट म्हणून केले जाणारे उदात्तीकरण टाळून वस्तुस्थिती मांडायची होती: मुरलीधरन

‘अ लीजंडरी 800 - अगेन्स्ट ऑल ऑड्स’ हा चित्रपट म्हणजे एका महान खेळाडूचे, एखाद्या काल्पनिक कथेपेक्षा सुद्धा भक्कम असे मानवी नाट्य आहे: मधुर मित्तल

“चित्रपटाचे उद्दिष्ट, एका अशा दिग्गज खेळाडुचे जीवनसार मांडण्याचे आहे ज्याचा जीवन प्रवास मैदाना इतकाच मैदानाबाहेरही तितकाच नाट्यमय होता”: चित्रपट निर्माते श्रीपथी एम

Posted On: 26 NOV 2023 10:10PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 26 नोव्‍हेंबर 2023

 

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज झालेल्या संवाद सत्रात ‘अ लीजंडरी 800 - अगेन्स्ट ऑल ऑड्स’ या चित्रपटात श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज क्रिकेटपटू मुथैय्या  मुरलीधरन याची भूमिका साकारणारा अभिनेता मधुर मित्तल मुरलीधरन सोबत सहभागी झाला. मुरलीधरनचा चरित्रपट असलेला हा चित्रपट, या महोत्सवाचा एक महत्त्वाचा आकर्षण बिंदू ठरला.

कोमल नहाटा यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात, मुरलीच्या, स्वतः कुणीही नसल्यापासून ते दिग्गज क्रिकेटपटू  बनण्यापर्यंतच्या प्रवासाबाबत गहन चिंतन करण्यात आले.

फिरकीचा जादूगार मुरलीधरन संवाद सत्रात काय बोलला ते पहा

श्रीलंकेतील युद्ध आणि अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर सुरू झालेली आणि क्रिकेटमधील दिग्गज व्यक्तीमत्व बनण्यासाठी सर्व प्रतिकुलतेवर मात करतानाची आपली रोमहर्षक कथा सांगताना मुरली म्हणाला, "त्या सर्व धकाधकीच्या  काळात क्रिकेट हा माझ्यासाठी विसावा होता." आपल्या बालपणीच्या स्वप्नांच्या आठवणींना उजाळा देताना त्याने सांगितले की, देशाचे प्रतिनिधित्व करणे तर सोडाच;स्वतःच्या शाळेसाठी खेळण्याचे स्वप्न देखील त्याने कधी बाळगले नव्हते. 

आपल्या आयुष्यावर आधारित आगामी चरित्रपटावर चर्चा करताना, मुरलीने सत्यकथनाच्या महत्त्वावर जोर दिला.  "हे उदात्तीकरण नाही तर वस्तुस्थिती आहे," असे त्याने ठामपणे सांगितले. चित्रपटाची कथा, त्याने झेललेला संघर्ष आणि त्यावर मिळवलेल्या विजयाशी प्रामाणिक राहावी याकरता, चित्रपट संहितेची आपण अनेक वेळा बारकाईने पारायणे केली, असे तो म्हणाला. 

1995 मध्ये ऑस्ट्रेलियात त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरून निर्माण झालेल्या ‘चकिंग कॉन्ट्रोव्हर्सी’ अर्थात फेकी गोलंदाजीच्या आरोपांवरून निर्माण झालेल्या वादाबद्दल बोलताना मुरलीने दावा केला की त्याला पुढे जाऊ न देण्यासाठी हे सर्व हेतुपुरस्सर केले गेले होते.  तो म्हणाला, "हे सर्व दुःखदायी   होते, मात्र मी हार मानली नाही आणि माझे सहकारी तसेच क्रिकेट मंडळाच्या सक्रीय पाठिंब्याच्या आधारावर पुढे पुढे जात राहिलो."

आपल्या क्रिकेट जीवनातील चढ-उतार आणि संघर्षाबाबत बोलताना मुरलीने सांगितले की श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर पाकिस्तानात झालेला हल्ला ही त्याच्या क्रिकेट इतिहासातील सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना होती.

समाजोपयोगी कार्यासाठी मुरली, फाउंडेशन ऑफ गुडनेस ही सेवाभावी संस्था चालवत आहे. ही संस्था, सीनिगामा प्रदेशाच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे आणि मुलांच्या गरजा, शिक्षण आणि प्रशिक्षण, आरोग्य सेवा आणि मानसिक-सामाजिक पाठबळ, गृहनिर्माण, उपजीविका, खेळ आणि पर्यावरण यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक समाजाला मदत करते.

चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीपती एम म्हणाले की हा चित्रपट केवळ एका सेलिब्रिटी क्रिकेटरचे चित्रण नसून, मुरलीधरन यांच्या असामान्य जीवनाला आकार देणार्‍या थरारक  घटना आणि संघर्ष हा चित्रपट सांगतो. "चित्रपटाचा उद्देश या दिग्गज व्यक्तिमत्वाचा जीवन पट उलगडणे हा आहे, ज्याचा प्रवास मैदानाबाहेरही तेवढाच नाट्यमय होता," त्यांनी स्पष्ट केले.

श्रीपति म्हणाले की, बायोपिक (व्यक्तिचित्रण) करण्यासाठी विशिष्ट ढाचा अथवा पटकथेच्या ऐवजी  आम्हाला एक  सत्यकथा बनवायची होती, ज्याचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन उलगडणे खूप नाट्यमय आहे.” 

चित्रपटात मुरली यांची भूमिका साकारणारा मधुर मित्तल म्हणाला, “हा चित्रपट एखाद्या क्रीडापटा पेक्षा अधिक काही सांगतो. ही एका माणसाच्या नाट्यमय जीवनाची कथा आहे, जी एका महान खेळाडूची लवचिकता सांगते, जो कल्पनेपेक्षा अधिक कणखर आहे.”

वयाच्या सातव्या वर्षी 'कहीं प्यार ना हो जाए'  चित्रपटातील भूमिका ते मुरली यांची भूमिका साकारण्यापर्यंतच्या आपल्या अभिनय प्रवासाबद्दल बोलताना मधुर म्हणाला की, बायोपिकमध्ये एका दिग्गज क्रिकेटरची भूमिका करणे खूप रोमांचक आणि सन्मानाची गोष्ट होती. मधुर म्हणाला, “फिरकी गोलंदाजीमधल्या जादूगाराच्या गोलंदाजीचे अनुकरण करण्यासाठी, आणि  मुरली यांचा सन्मान करण्यासाठी मी दोन महिने गोलंदाजी प्रशिक्षकाबरोबर सराव केला.” 

प्रत्येक कसोटी सामन्यात सरासरी सहा बळी घेणारे, मुरलीधरन यांना खेळाच्या इतिहासातील महान गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखले जातात. कसोटी सामन्यांमध्ये 800 बळी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 530 हून अधिक विकेट घेणारा हा एकमेव गोलंदाज आहे. 1996 चा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघात त्यांचा समावेश होता.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Ashutosh/Rajshree/D.Rane



(Release ID: 1980057) Visitor Counter : 108


Read this release in: English , Urdu , Hindi