माहिती आणि प्रसारण मंत्रालय

विकसित भारत संकल्प यात्रेला महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागात मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted On: 17 NOV 2023 5:10PM by PIB Mumbai

मुंबई, 17 नोव्हेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून  विकसित भारत संकल्प यात्रा रवाना केल्यानंतर देशभरातील आदिवासीबहुल भागात कालपासून हे  संकल्प रथ ठिकठिकाणी जाऊन  विविध शासकीय योजनांबद्दल व्यापक जनजागृती करत  आहेत. महाराष्ट्रात  नंदुरबार पालघर, नाशिक,गडचिरोली आणि नांदेड या आदिवासीबहुल जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा प्रामुख्याने आयोजित करण्यात आली असून कालपासून हे प्रचार रथ वेगवेगळ्या गावांमध्येपोचत असून गावकर्यांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 सरकारच्या या विशाल संपर्क कार्यक्रमाचा भाग असलेले हे संकल्प रथ म्हणजे विशेष प्रकारे रचना केलेल्या 5 आयईसी(माहिती,शिक्षण आणि संपर्क ) व्हॅन आहेत. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रमुख योजना, ठळक मुद्दे आणि कामगिरी दर्शवणाऱ्या  हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधील चित्रफिती , माहितीपत्रके, पुस्तिका, पत्रके आणि फ्लॅगशिप स्टँडीच्या माध्यमातून माहितीचा प्रसार  करण्यासाठी या आयईसी व्हॅन्स अर्थात प्रसार रथ सुसज्ज आहेत.

कालपासून या संकल्प रथांनी पालघर  जिल्ह्यातील  ग्रामीण भागात आपला संचार सुरु केला आहे. पालघर तालुक्यासह, वाडा, डहाणू आणि विक्रमगड या तालुक्यांमध्ये एकूण 4 संकल्प रथ  विविध गावात भेटीसाठी दाखल झाले आहेत.पालघरमधील शिरगांव, बोर्डी, बिलावली आणि कोंडगांव याठिकाणी विकसित भारत संकल्प रथाचे जोरदार स्वागत करण्यात आले. रथातून देण्यात येत असलेल्या माहितीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील कोठरी आणि मांडवा या गांवामध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या संकल्प रथांचे स्वागत केले तर अधिकाऱ्यांनी यावेळी विविध योजनांची माहिती दिली.

 

 

नंदुरबार जिल्यातील नवापुर तालुक्यातील उमराण आणि मालोनी या गावातही संबंधित अधिकाऱ्यांनी विविध योजनाची गावकर्यांना माहिती देत त्यांना योजनाचे कसे लाभ घ्यायचे याबाबत मार्गदर्शन केले तर शहादा तालुक्यातील लोणखेडा ग्रामपंचायतीच्यावतने यात्रेचे औपचारिक स्वागत करण्यात आले तसेच इथे  विकसित भारतासाठी शपथ घेण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

 

विकसित भारत संकल्प यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातही पोचली असून आज अहेरी तालुक्यातील राजोलीसह अन्य गावांमध्ये नागरिकांना शासकीय योजनाची माहिती दिली जात आहे.

 

 

नाशिक जिल्ह्यात आज विकसित भारत संकल्प यात्रा आज नाशिक तालुक्यातील गोवर्धन आणि देवरगाव, सुरगाणा तालुक्यातील शिंदे,रोटी आणि बुबळी या गावात तसेच दिंडोरी तालुक्यातील देवने आणि भनवड या गावात पोचली.

 

सरकारी योजनांचे लाभ कालबद्ध पद्धतीने सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत संपूर्णपणे पोहोचत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी  लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे तसेच कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून देणे यावर या यात्रेचा भर असेल.या यात्रेत सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन मिशन, एकलव्य आदर्श  निवासी शाळांमध्ये नावनोंदणी; शिष्य वृत्ती योजना; वन हक्क नियम: वैयक्तिक आणि सामुदायिक जमीन ; वन धन विकास केंद्र: बचत गटांचे आयोजन यांसारख्या आदिवासी भागाच्या विशिष्ट समस्यांकडे देखील लक्ष दिले जात आहे.

JPS/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1977661) Visitor Counter : 188


Read this release in: English , Urdu , Hindi