संरक्षण मंत्रालय

चाणक्य संरक्षण संवाद 2023 ची सांगता – सहकार्यातून सुरक्षाविषयक आराखड्याला आकार देणे

Posted On: 04 NOV 2023 6:39PM by PIB Mumbai

 

भारतीय लष्कराने, सेंटर फॉर लँड वेलफेअर स्टडीज, (CLAWS) या संस्थेच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या चाणक्य संरक्षण संवाद-2023 या दोन दिवसीय कार्यक्रमाची आज म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी सांगता झाली. दक्षिण आशिया आणि हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील सुरक्षा विषयक आव्हानांवर या परिषदेत प्रामुख्याने चर्चा झाली. 3 आणि 4 नोव्हेंबर असे दोन दिवस, माणेकशॉ केंद्रात आयोजित या कार्यक्रमात, सहा विविध सत्रे झाली, जी, “भारत आणि हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सेवेसाठी- सर्वसमावेशक सुरक्षेसाठी सहकार्यया मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित होती. या संवादात्मक कार्यक्रमाची प्रेरणा प्राचीन अर्थतज्ञ, राजनीतीज्ञ आर्य चाणक्य यांच्या विचारातून मिळाली होती. या चर्चेत, जागतिक आणि प्रादेशिक स्तरावरील सुरक्षाविषयक मुद्यांवर विशेष चर्चा करण्यात आली. ज्यात, दक्षिण आशिया आणि हिंद प्रशांत क्षेत्रावरील सुरक्षाविषयक घडामोडींवर विशेष भर देण्यात आला. तसेच, या प्रदेशाच्या सुरक्षेसाठी समन्वय, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी जास्तीत जास्त वापर, भारतीय संरक्षण उद्योगाची एकत्रित क्षमता वाढवणे आणि सर्वंकष प्रतिकारक्षमता साध्य करण्यासाठी भारताकडे असलेले पर्याय, यावर एक आराखडा तयार करण्यात आला.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 3 नोव्हेंबर 2023 रोजी या कार्यक्रमात विशेष भाषण केले. दक्षिण आशिया आणि भारत-प्रशांत क्षेत्रातील सुरक्षाविषयक गुंतागुंतीसंदर्भात सखोल विश्लेषणासाठी चाणक्य संरक्षण संवाद, एक योग्य व्यासपीठ ठरेलआणि यातून अखेर, या प्रदेशात एकत्रित सुरक्षा उपायांसाठीचा  मार्ग मोकळा होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या समापनाच्या भाषणात, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी विविध सत्रात चर्चा करण्यात आलेल्या काही महत्वाच्या पैलूची माहिती सांगितली. प्रादेशिक स्थैर्य आणि सामायिक समृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. जागतिक धोरणात्मक चर्चेत हिंद-प्रशांत क्षेत्र  केंद्रस्थानी राहिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

लष्करी संतुलनाद्वारे प्रादेशिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय धोक्यांना तोंड देण्यासाठी समविचारी राष्ट्रांमधील सहयोगी सुरक्षा आणि भागीदारीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

शांततेसाठी बलशक्ती महत्वाची असते आणि आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करणार्‍या समविचारी राष्ट्रांच्या एकतेतून शक्ती प्राप्त होते. सामूहिक आणि सहकार्यविषयक सुरक्षा भागीदारी हाच पुढचा मार्ग असल्याचे जनरल मनोज पांडे यांनी नमूद केले.

चाणक्य संरक्षण संवाद 2023 ने भविष्यासाठी बीज पेरले असून त्यात चर्चा, कल्पना आणि धोरणे सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध जागतिक आणि प्रादेशिक वातावरणात अंकुरित होतील. भारताने, त्याच्या समृद्ध वारसा आणि भविष्यवादी दृष्टीसह, अत्यंत लवचिक स्वागतार्ह भूमिका घेतली असून, या प्रदेशाची तत्कालिक आणि दीर्घकालीन एकत्रित सुरक्षा आणि समृद्धीसाठी राष्ट्रांच्या सौहार्दासाठी महत्वाची भूमिका पार पाडण्यास सज्ज आहे.

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974770) Visitor Counter : 86


Read this release in: English , Urdu , Hindi