पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचे संसदेच्या विशेष अधिवेशनात केलेले भाषण

Posted On: 18 SEP 2023 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 सप्‍टेंबर 2023

 

माननीय अध्यक्ष महोदय,

देशाच्या संसदेचा 75 वर्षांचा प्रवास, त्याचे पुन्हा एकदा स्मरण करण्यासाठी आणि नव्या सदनात जाण्यापूर्वी इतिहासातील त्या प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करत अग्रेसर होण्याची ही वेळ आहे. आपण सर्वजण या ऐतिहासिक भवनातून निरोप घेत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे सदन इंपिरियल लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे ठिकाण होते. स्वातंत्र्यानंतर या वास्तूला संसद भवन म्हणून नवीन ओळख मिळाली. हे खरे आहे की, या इमारतीच्या निर्मितीचा निर्णय विदेशी संसदेने घेतला होता, मात्र या भवनाच्या निर्मितीत माझ्याच देशवासियांनी घाम गाळला होता, परिश्रम केले होते आणि धन देखील माझ्याच देशाचे होते.

या 75 वर्षाच्या आपल्या प्रवासाने अनेक लोकशाही परंपरा आणि प्रक्रियांची उत्तमोत्तम निर्मिती केली आहे. आणि या सदनाचा सदस्य म्हणून सर्वांनी त्यामध्ये सक्रिय योगदान देखील दिले आहे तसेच तटस्थ भावनेने देखील पाहिले आहे. आपण भलेही नव्या सदनात जाऊ, मात्र जुने सदन देखील, हे सदन देखील भावी पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. हा भारताच्या लोकशाहीच्या स्वर्णीम प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे, जो संपूर्ण जगाला भारताच्या रक्तात लोकशाहीचे सामर्थ्य कसे भिनलेले आहे याच्याशी परिचित करून देण्याचे काम या सदनातून होत राहील.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

अमृत काळाच्या प्रथम प्रभेचा प्रकाश राष्ट्रात एक नवा विश्वास, नवा आत्मविश्वास, नवा उल्हास, नवीन स्वप्ने, नवा संकल्प आणि राष्ट्राचे नवे सामर्थ्य जागवत आहे. आज चोहीकडे भारतवासीयांच्या नवनवीन कामगिरीची चर्चा होत आहे आणि ही चर्चा गौरवपूर्ण होत आहे. हा आमच्या 75 वर्षांच्या संसदीय इतिहासाच्या एका सामूहिक प्रयत्नाचा परिणाम आहे. ज्यामुळे जगात आज तो आवाज प्रतिध्वनीत होत आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

चांद्रयान -3 च्या यशामुळे केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग अचंबित आहे आणि यात भारताच्या सामर्थ्याचे एक नवे रूप जे आधुनिकतेशी जोडलेले आहे, जे विज्ञानाशी जोडलेले आहे, जे तंत्रज्ञानाशी जोडलेले आहे, जे आपल्या वैज्ञानिकांच्या सामर्थ्याशी जोडलेले आहे, जे 140 कोटी देशवासीयांच्या संकल्पाच्या शक्तीशी जोडलेले आहे, ते देश आणि जगावर एक नवा प्रभाव टाकणार आहे. हे सदन आणि या सदनाच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा देशातील वैज्ञानिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोटी कोटी शुभेच्छा देत आहे, त्यांचे अभिनंदन करत आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या सदनाने भूतकाळात जेव्हा नाम (NAM) शिखर परिषद झाली होती, तेव्हा सर्व संमतीने प्रस्ताव मंजूर करून देशाच्या या प्रयत्नाची प्रशंसा केली होती. आज जी - 20 च्या यशस्वी आयोजनाचे देखील आपण सर्वसंमतीने कौतुक केले आहे. मला असे वाटते की, तुम्ही देशवासीयांचा गौरव वर्धित केला आहे यासाठी मी आपला आभारी आहे. जी 20 च्या आयोजनाचे यश 140 कोटी देशवासीयांचे आहे. हे संपूर्ण भारताचे यश आहे, कोण्या एका व्यक्तीचे यश नाही किंवा कोणत्या एका पक्षाचे यश नाही. भारताच्या संघीय संरचनेने, भारताच्या विविधतेने 60 ठिकाणी 200 हून अधिक शिखर परिषदा आयोजित केल्या. आणि त्यांचे यजमानपद हिंदुस्तानातील आगळ्यावेगळ्या रंग रूपात, देशातील विविध सरकारांनी मोठ्या थाटामाटात भूषविले आहे, आणि याचा प्रभाव जागतिक स्तरावर दिसून येत आहे. हा आपल्या सर्वांसाठी उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे. देशाचे गौरव गान वाढवणारा आहे. आणि ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, भारताला याचा अभिमान वाटेल, जेव्हा भारत अध्यक्षपदी होता, त्याच कालावधीत आफ्रिकन समूह या संघटनेचा सदस्य बनला. मी त्या भावपूर्ण क्षणाला विसरू शकत नाही जेव्हा आफ्रिकन संघाची घोषणा झाली आणि आफ्रिकन संघाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, माझ्या जीवनात तो असा क्षण होता की कदाचित बोलता बोलता माझे डोळे भरून आले असते. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की किती मोठ्या आकांक्षा आणि आशा पूर्ण करण्याचे काम भारताच्या नशिबात लिहिलेले आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

भारताप्रति शंका व्यक्त करणे हा काही लोकांचा स्वभावच बनला आहे आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासूनच हे सुरू आहे. यावेळीही हेच घडले. कोणतीही घोषणा केली जाणार नाही, अशक्य आहे. मात्र ही भारताची ताकद आहे, ते तर झालेच आणि वैश्विक सर्वसंमतीने एक सामायिक घोषणापत्र तयार करून पुढच्या मार्गाची आखणी करून याचा प्रारंभ झाला आहे.

आणि अध्यक्ष महोदय,

आपल्या नेतृत्वात, कारण की भारताच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आहे, म्हणूनच आपल्याजवळ जो वेळ आहे त्याचा उपयोग आपण करणार आहोत आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात जगभरात जे जी-20 चे सदस्य देश आहेत, त्यांची पी-20 अर्थात संसदेचे अध्यक्ष यांची एक शिखर परिषद, ज्याची आपण घोषणा केली, सरकार आपल्या या प्रयत्नांचे पूर्ण समर्थन करत राहील आणि सहयोग देत राहील.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आज भारत जगन्मित्राच्या रूपात आपली छबी बनवत आहे. ही आपल्या सर्वांसाठी गौरवास्पद बाब आहे. संपूर्ण जग भारतामध्ये आपला मित्र पाहात आहे, संपूर्ण विश्व भारताची मैत्री अनुभवत आहे. याचे मूळ कारण आपले जे संस्कार आहेत, वेदांपासून विवेकानंदांपर्यंत आपल्याला जे प्राप्त झाले आहे, 'सबका साथ - सबका विकास' हा मंत्र जगाला आपल्याशी जोडत आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

या सदनातून निरोप घेणे हा खूपच भावनिक क्षण आहे. एखादे कुटुंब जर आपले जुने घर सोडून नव्या घरात जात असेल तर अनेक तेथील आठवणी काही क्षणांसाठी त्यांना भाव विवश करतात आणि आपण जेव्हा हे सदन सोडून जात आहोत तेव्हा आपले मन आणि बुद्धी देखील त्याच भावनेने ओतप्रोत झाले आहे, अनेक आठवणींनी भारावून गेलो आहोत. या सदनात काही आंबट गोड अनुभव मिळाले, वादविवाद झाले, कधी संघर्षाचे वातावरण होते तर कधी या सदनात उत्सव आणि उल्हासाचे वातावरण देखील होते. या साऱ्या आठवणी आमच्या सोबतच सर्वांच्या सामायिक आठवणी आहेत. हा आपल्या सर्वांचा सामायिक वारसा आहे आणि म्हणूनच याचा गौरव देखील आपल्या सर्वांचा सामायिक आहे. स्वतंत्र भारताच्या नवनिर्माणाशी संबंधित अनेक घटना या 75 वर्षात याच सदनात साकार होत असल्याचे आपण पाहिले आहे. आज आपण जेव्हा या सदनातून निरोप घेऊन नया नव्या सदनाकडे प्रस्थान करत आहोत तेव्हा भारतातील सामान्य व्यक्तीच्या भावनांचा जो आदर मिळाला आहे, सन्मान मिळाला आहे हा क्षण त्या भावना अभिव्यक्त करण्याचा क्षण आहे.

आणि म्हणूनच आदरणीय अध्यक्ष महोदय,

मी पहिल्यांदा जेव्हा संसदेचा सदस्य बनलो आणि पहिल्यावेळी एका संसद सदस्यांच्या रूपात मी या भावनात प्रवेश केला तेव्हा मी अत्यंत सहज भावनेने या संसद भवनाच्या द्वारावर आपले मस्तक टेकवले आणि या लोकशाहीच्या मंदिराला श्रद्धेने नमस्कार करून आत पाऊल ठेवले.

ते क्षण माझ्यासाठी भावनांनी ओथंबलेले होते. मी कल्पनाही करू शकत नव्हतो. परंतु भारताच्या लोकशाहीची हीच खरी ताकद आहे. भारतातल्या सामान्य लोकांच्या दृष्‍टीने   लोकशाही म्हणजे  श्रद्धेचे प्रतिबिंब आहे की, रेल्वेच्या फलाटावर दिवस कंठणारा, एका गरीब कुटुंबातील मुलगा संसदेमध्ये पोहोचला. असे घडू शकेल, याची मी कधीही कल्पना केली नव्हती.की देश मला इतका मोठा सन्मान देईल, इतके आशीर्वाद देईल,इतके प्रेम देईल, असा विचारही अध्यक्ष महोदय, मी कधी केला नव्हता. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

आमच्यापैकी अनेक लोक आहेत, ते संसद भवनामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत, त्या सर्व वाचत असतात. कधी-कधी त्याचा उल्लेखही करीत असतात. आपल्या इथे संसद भवनाच्या प्रवेश द्वारावर  चांगदेव  यांचे एक उपदेशात्मक वाक्य लिहिले आहे. ‘लोकद्वारम्’ असे हे पूर्ण वाक्य आहे! त्याचा अर्थ असा आहे की, जनतेसाठी दरवाजे मुक्त करा आणि मग पहा, त्यांना आपले अधिकार कसे मिळतात. आपल्या ऋषी-मुनींनी  असे लिहून ठेवले आहे. अगदी आपल्या प्रवेश द्वारावर लिहिले आहे. आपण सर्वजण आणि आपल्या आधी जे लोक इथे आलेले होते, तेही या सत्याचे साक्षीदार आहेत. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

काळाबरोबर जसजसे दिवस पुढे गेले आहेत, आपल्या या भवनाची संरचनाही सातत्याने बदलण्यात आली आणि हे भवन अधिक समावेशक बनवण्यात आले. समाजाच्या प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधी इथे आहेत.  वैविध्याने भरलेले हे भवन असल्याचे दृष्टीस पडते. अनेक भाषा, अनेक प्रकारच्या बोली, अनेक प्रकारचे खाद्य प्रकार आहेत, भवनाच्या आतमध्येच सगळे काही आहे आणि समाजातील सर्व गटातील लोक आहेत, मग ते सामाजिक रचनेतील असोत किंवा आर्थिक रचनेतील असोत. अथवा गाव किंवा शहरातील असो, एक प्रकारे पूर्ण रूपाने सर्वसमावेशक वातावरण या सभागृहामध्ये पूर्ण ताकदीने सामान्य जनतेच्या इच्छा,आकांक्षांना प्रगट करीत असतात. दलित असो, पीडित असो, आदिवासी असो, महिला असो, प्रत्येकाचे  हळूहळू  योगदान वाढत चालले आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

प्रारंभीच्या काळामध्ये महिलांची संख्या कमी होती. परंतु हळू-हळू माता- भगिनींनी या भवनाची प्रतिष्ठा वाढवली आहे. या भवनाच्या प्रतिष्ठेमध्ये खूप मोठे परिवर्तन घडऊन आणण्यामध्ये  त्यांचे योगदान आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

प्रारंभापासून आत्तापर्यंत एका ढोबळ अंदाजाच्या आकडेवारीनुसार या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून जवळपास साडेसात हजारांपेक्षा अधिक लोकप्रतिनिधींनी आपले योगदान दिले आहे. इतक्या वर्षांमध्ये जवळपास साडेसात हजारांपेक्षा  जास्त लोकप्रतिनिधी! या काळामध्ये जवळपास 600 महिला खासदारांनी या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली. हा आकडा दोन्ही सभागृहांचा मिळून आहे. 

आणि आदरणीय अध्यक्ष महोदय, 

आता जाणून घेऊया की, सभागृहामध्ये आदरणीय इंद्रजीत गुप्ता जी 43 वर्ष, जर माझ्याकडून चूक होत नसेल तर, 43 वर्ष, या सभागृहामध्ये सर्वात दीर्घ काळ सदस्य म्हणून बसले आहेत. या सभागृहाचे सर्वाधिक काळ साक्षीदार बनण्याचे भाग्य त्यांना मिळाले आहे. आणि याच सभागृहात आदरणीय अध्यक्ष महोदय, इथे शतिगुर रहमान जी यांनी वयाच्या 93 व्या वर्षीही आपले योगदान दिले आहे. रहमान जी यांचे वय 93 वर्षे होते. आणि आदरणीय अध्यक्ष महोदय, हीच खरी भारतीय लोकशाहीची ताकद आहे. 25 वर्ष वयाच्या चंद्रमणी मुर्मू या सभागृहाच्या सदस्य बनल्या  होत्या. फक्त वयाच्या 25 व्या वर्षी, वयाने सर्वात लहान सदस्य त्या बनल्या  होत्या. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

वाद, विवाद, तिरकस कटाक्ष अशा सर्व गोष्टींचा आपण सर्वांनीच अनुभव घेतला आहे. अशा सर्व गोष्टीत आपण कोणीच कसर सोडलेली नाही. असे असले तरीही आपल्यामध्ये एक प्रकारचा कौटुंबिक भाव आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांमध्येही असा भाव होता. जे लोक प्रचाराच्या माध्यमांतून आपले इथले रूप पाहतात, आणि बाहेर पडतात, त्यावेळी आपल्यामध्ये जी आपुलकीची भावना असते, कौटुंबिकतेची भावना असते, ती सर्वांनाच एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते, आणि ही सुद्धा या सभागृहाची ताकद आहे. सर्वांमध्ये एक कौटुंबिक भाव आणि त्याचबरोबर आम्ही कधीही कटुता मनामध्ये ठेवत नाही. हे सभागृह सोडल्यानंतर अनेक वर्षांनीही भेटलो तरी आम्ही त्याच प्रेमभावनेने एकमेकांना भेटतो. त्या काळात निर्माण झालेल्या स्नेहबंधांचे आम्हाला कधीच विस्मरण होत नाही. त्या स्नेहमयी दिवसांना आम्ही विसरत नाही. याचा अनुभव मी करू शकतो. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

आमच्या आधीही आणि वर्तमान काळातही आम्ही अनेकदा पाहिले आहे की, अनेक संकटे आली तरीही, अनेक असुविधा होत्या तरीही खासदार या सभागृहामध्ये आलेले आहेत आणि त्यांना बरेचदा त्याचा शारीरिक त्रासही सहन करावा लागला. तरीही त्यांनी सभागृहामध्ये खासदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. अशा अनेक घटना आज आपल्या समोर आहेत. अतिशय गंभीर आजार असतानाही काहीजणांना तर चाकाच्या खुर्चीवरून सभागृहामध्ये यावे लागले आहे. काहीजणांना तर बाहेर डॉक्टरांना उभे करून सभागृहामध्ये यावे लागले. तरीही सर्व खासदारांनी कधी ना कधी अशा प्रकारे आपली भूमिका पार पाडली आहे. 

कोरोना काळाचे आपल्या समोर उदाहरण आहे. प्रत्येक कुटुंबाला असे वाटत होते की, बाहेर जावे तर मृत्यूला आमंत्रण दिल्यासारखे होईल. असा काळ असतानाही आमचे माननीय खासदार संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये, कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये आले, त्यांनी आपले कर्तव्य बजावले. आम्ही राष्ट्र कार्यात खंड पडू दिला नाही. सामाजिक अंतर ठेवावे तर लागणारच होते. आणि वारंवार कोरोना चाचण्याही कराव्या लागत होत्या. सभागृहामध्ये सर्वजण येत होते, पण सर्वांनाच मास्क वापरावा लागत होता. आसन व्यवस्थाही वेगवेगळी केली होती. कामाच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. देशाचे काम थांबू नये म्हणून जे जे करणे आवश्यक होते, ते ते सर्व काही केले. यामागे एकच भावना होती, की काम सुरू रहावे.  सर्व सदस्यांनी या सभागृहाला आपल्या कर्तव्याचे महत्वपूर्ण अंग मानले आहे. संसद चालली पाहिजे आणि मी पाहिले आहे की, सभागृहाविषयी सर्व सदस्यांना इतकी आपुलकी असते की, आधीच्या काळात आपण पाहत होतो की, तीस वर्षांपूर्वी खासदार असेल, 35 वर्षांपूर्वी खासदार असतील, ते एकदा तरी मध्यवर्ती सभागृहामध्ये येऊन जाणारच. ज्याप्रमाणे मंदिरामध्ये जाण्याची सवय असते, तशीच त्यांनाही सभागृहामध्ये येऊन जाण्याची सवय असते. या जागेविषयी त्यांना प्रेम वाटत असते. मनामध्ये  एक प्रकारची आत्मीयता असते. आणि असे अनेक जुने लोक आहेत. त्यांना येता- जाता  सहजच एक फेरी इथे मारून जावी, असे वाटत असते. वास्तविक आज त्यांची लोकप्रतिनिधी या नात्यांने कोणतीही जबाबदारी नाही. तरीही या भूमीविषयी त्यांना वाटणारी आपुलकी इथे घेऊन येते. हे सामर्थ्य खरं तर या सभागृहाचे आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय, 

स्वातंत्र्यानंतर खूप मोठ-मोठ्या विद्वान  लोकांनी अनेक प्रकारच्या शंका व्यक्त केल्या होत्या. माहीत नाही, देशाचे आता काय होणार, कसा चालवला जाईल, चालवता येईल की नाही, हा देश एकसंध राहील की विखरून जाईल, लोकशाही टिकणार की नाही. अशा एक नाही पन्नास शंका व्यक्त होत होत्या. परंतु या देशाच्या संसदेची ताकद आहे की, संपूर्ण विश्वाला चुकीचे सिद्ध केले. आणि हे राष्ट्र पूर्ण सामर्थ्यानिशी पुढे जात आहे. आणि याच विश्वासाने आमच्याविषयी भलेही मग शंका असो, शंकांचे काळेकुट्ट ढग जमा झालेले असो, मात्र आम्ही यशस्वी होणारच! आणि ही गोष्ट आम्ही सर्व लोकांनी, आमच्या जुन्या पिढ्यांनी मिळून हे काम करून दाखवले आहे. या गोष्टीचा गौरव करण्याची ही वेळ आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

याच इमारतीत दोन वर्षे अकरा महिने संविधान सभेच्या बैठका झाल्या. आणि त्यात देशासाठी  एक मार्गदर्शक संविधान दिले जे आजही देशाची व्यवस्था चालवते आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला जी राज्यघटना आपल्याला मिळाली ती 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. या 75 वर्षातील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे या संसदेवरचा देशातील सामान्य माणसाचा विश्वास वाढतच गेला आहे. आणि लोकशाहीची सर्वात मोठी ताकद हीच आहे की त्यांचा या महान संस्थेप्रति , या व्यवस्थेप्रति  विश्वास अतूट  आहे,  अबाधित आहे. या 75 वर्षांत आपले संसद भवनही जनभावनांच्या अभिव्यक्तीचे भवन बनले आहे. येथे जनतेच्या भावनांची तीव्र अभिव्यक्ती आहे आणि राजेंद्र बाबूंपासून ते डॉ. कलाम, रामनाथ जी कोविंद आणि आता द्रौपदी मुर्मूजी पर्यंतच्या सर्वांच्या भाषणांचा लाभ आपल्या सभागृहांना झाला आहे ,त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

पंडित नेहरू जी, शास्त्री जी पासून ते अटलजी, मनमोहनजी पर्यंत अनेक नेत्यांनी या सभागृहाचे नेतृत्व केले आहे आणि सभागृहाच्या माध्यमातून देशाला दिशा दिली आहे. देशाला नव्या रूपात नव्या ढंगात साकारण्यासाठी  त्यांनी कठोर परिश्रम आणि प्रयत्न केले आहेत. आज त्या सर्वांचे गुणगान करण्याची देखील ही  संधी आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

सरदार वल्लभभाई पटेल, लोहिया जी, चंद्रशेखर जी, अडवाणी जी, अशी असंख्य नावे आहेत ज्यांनी हे सभागृह  समृद्ध करण्यात, चर्चा समृद्ध करण्यात आणि देशातील सामान्यातील सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम या सभागृहात केले आहे. जगभरातील अनेक राष्ट्रप्रमुखांनाही आपल्या या सभागृहांना संबोधित करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याही  बोलण्यातून भारताच्या लोकशाहीबद्दल आदर व्यक्त झाला आहे.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आनंद आणि उत्साहाच्या क्षणी क्वचित सभागृहाच्या डोळ्यांतून अश्रूही वाहिले आहेत. हे सभागृह दु:खाने हळहळले जेव्हा देशाला आपल्या तीन पंतप्रधानांना त्यांच्याच कार्यकाळात गमवावे लागले . नेहरूजी, शास्त्रीजी, इंदिराजी, तेव्हा हे सभागृह साश्रू नयनांनी त्यांना निरोप देत होते.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

अनेक आव्हाने उभी ठाकूनही , प्रत्येक सभापतीने , प्रत्येक अध्यक्षाने दोन्ही सभागृहे सुरळीत चालवली आहेत आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले  आहेत. ते निर्णय मावळंकर जी यांच्या काळापासून सुरु झाले असतील  किंवा सुमित्राजींच्या काळातले असतील  किंवा बिर्लाजींच्या काळातले असतील , आजही ते निर्णय संदर्भ किंवा मूल्यांकनाच्या दृष्टीने  पाहिले जातात.  हे काम आपल्या सुमारे  17 सभापतींनी केले आहे आणि त्यातील आपल्या दोन महिला सभापती होत्या आणि मावळंकरजी पासून ते सुमित्रा ताई आणि बिर्लाजी पर्यंत, आजही ते आपल्याला मिळत आहे. प्रत्येकाची स्वतःची शैली होती. मात्र त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन आणि नियम व कायद्यांचे पालन करून हे सभागृह नेहमीच ऊर्जाशील ठेवले आहे. आज मी त्या सर्व सभापतींना वंदन करतो , अभिनंदन करतो.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आपण लोकप्रतिनिधी आपापल्या भूमिका बजावतो हे खरे, मात्र सातत्याने आपल्याबरोबर इथे जे कर्मचारी बसतात, त्यांच्याही अनेक पिढ्या बदलल्या आहेत. कधी-कधी ते कागद घेऊन धावत येतात, त्यांचे योगदानही कमी नाही. ते आपल्यापर्यंत कागदपत्रे पोहोचवण्यासाठी धावतात, सभागृहात कोणतीही चूक होऊ नये, त्यांच्या निर्णयात कुठलीही चूक होऊ नये यासाठी ते सजग राहतात.

त्यांनी केलेल्या कामामुळे सभागृहातील कारभाराचा दर्जा सुधारण्यास देखील मोठी मदत झाली आहे. मी त्या सर्व सहकार्‍यांचे आणि त्यांच्या आधी जे होते त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. एवढेच नाही, सभागृहाचा अर्थ केवळ हा भागच नाही. या संपूर्ण परिसरात अनेक लोकांनी कुणी आपल्याला चहा पाजला असेल, कुणी पाणी पाजले असेल, कुणी रात्रभर कामकाज चाललेल्या सभागृहात कुणाला उपाशी राहू दिले नसेल, अनेक प्रकारच्या सेवा दिल्या असतील. एखाद्या माळ्याने  बाहेरच्या परिसराची काळजी घेतली असेल, कोणीतरी इथली स्वच्छता केली असेल, असे कितीतरी लोक असतील ज्यांनी आपणा सर्वांना चांगल्या प्रकारे  काम करण्यास मदत केली असेल आणि येथे जे काम होईल ते काम देशाला पुढे नेण्यासाठी अधिकाधिक वेगाने व्हावे यासाठी जे वातावरण तयार केले , व्यवस्था उभारली , त्यासाठी ज्यांनी-ज्यांनी योगदान दिले त्यांना माझ्या वतीने आणि या सभागृहाच्या वतीने, मी वंदन करतो.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

लोकशाहीचे हे सभागृह .. दहशतवादी हल्ला झाला. संपूर्ण जगात हा दहशतवादी हल्ला इमारतीवर झालेला नव्हता. ही लोकशाहीची जननी आहे, एक प्रकारे आपल्या आत्म्यावर हा हल्ला केला होता. हा देश ती घटना कधीच विसरू शकत नाही, मात्र  दहशतवाद्यांशी लढताना ज्यांनी सभागृह वाचवण्यासाठी आणि प्रत्येक सदस्याला वाचवण्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या , त्यांनाही मी आज सलाम करतो.  ते आपल्यात नाहीत मात्र त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आज जेव्हा आपण हे सभागृह सोडत आहोत, तेव्हा मी त्या पत्रकार मित्रांचे देखील स्मरण करतो , ज्यांनी आपल्या जीवनात, काही लोक असेही होते ज्यांनी आयुष्यभर, काही लोक तर असेही होते ज्यांनी संपूर्ण आयुष्य संसदेच्या कामकाजाचे  वार्तांकन करण्यात व्यतीत केले. एक प्रकारे ते जिवंत साक्षीदार आहेत . त्यांनी इथल्या प्रत्येक क्षणाची माहिती देशापर्यंत पोहोचवली आहे आणि तेव्हा हे सर्व तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. तेव्हाही तेच लोक होते जे इथल्या बातम्या पोहचवत असत आणि आतली बित्तंमबातमी  पोचवण्याची क्षमता त्यांच्यात होती आणि मी पाहिलं की संसदेच्या कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची नावं कुणाला माहीत नसतील मात्र त्यांचे काम कुणीही विसरू शकत नाही. आणि बातम्यांसाठी नाही तर संसद भवनातून भारताचा हा विकास प्रवास जाणून घेण्यासाठी त्यांनी आपली शक्ती खर्ची घातली होती. आजही मला संसदेच्या कामकाजाचे वार्तांकन करणारे जुने पत्रकार मित्र भेटतात ज्यांनी कधी संसदेचे कामकाज पाहिले आहे, तेव्हा ते मला अशा अज्ञात गोष्टी सांगतात ज्या त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत आणि कानाने ऐकल्या आहेत, ज्या आश्चर्यकारक आहेत. म्हणजे एक प्रकार जशी ताकद इथल्या भिंतींची आहे तशी  त्यांच्या लेखणीत आहे आणि त्या लेखणीतून त्यांनी संसद आणि संसद सदस्यांप्रति अभिमानाची भावना जागवली आहे.

मी आज अनेक पत्रकार बंधू जे कदाचित आता नसतील परंतु माझ्यासाठी जसे हे सदन सोडणं हा भावूक क्षण आहे, मला पक्कं ठाऊक आहे या पत्रकार बंधुसाठीही या सदनाला निरोप देणं तितकाच भावूक क्षण असेल, कारण त्यांचं यासोबतचं नातं अधिक गहिरं राहिलं आहे. काही पत्रकार असे असतील जे आपल्यापेक्षा अधिक काळ तर काही लोक कमी काळापासून येथे काम करत असतील. आज त्यांच्या त्या महत्वपूर्ण लोकशाहीची ताकद बनण्यासाठीच्या योगदानाकरताही स्मरण करण्याचा क्षण आहे. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

जेव्हा आपण सदनाच्या आत येतो. आपल्या येथे नादब्रह्माची कल्पना आहे. आपल्या शास्त्रात असे मानले जाते. एखाद्या ठिकाणी एकाच लयीत वारंवार उच्चारण केल्यास ते तपोस्थळ बनते. त्यात एक सकारात्मक उर्जा आहे. नादाची एक शक्ती आहे, जी त्या स्थानाला सिद्ध स्थानात परिवर्तित करते.  या सभागृहातही सात-साडेसात हजार लोकप्रतिनिधींकडून वारंवार प्रतिध्वनीत झालेले शब्द आणि वाणी त्याने या सदनात आपण बसून या पुढे चर्चा करु किंवा न करु, परंतु यांचा गुंजारव यास तीर्थक्षेत्र बनवते, एक जागृत स्थान बनते. लोकशाहीवर श्रद्धा असणारा व्यक्ती 50 वर्षांनंतरही जेव्हा येथे पाहण्यासाठी येईल, तेव्हा त्याला या प्रतिध्वनीची अनुभूती येईल की कधी काळी भारताच्या आत्म्याचा आवाज येथे दुमदुमत होता. 

आणि म्हणून अध्‍यक्ष महोदय,

हे ते सदन आहे जिथे कधी भगत सिंह, बटुकेश्‍वर दत्‍त, त्यांनी आपली वीरता, सामर्थ्याने बॉम्बचा स्फोट घडवून इंग्रजी सत्ता हादरवून टाकली होती. त्या बॉम्बस्फोटाचा तो आवाजही जे देशाचे भले इच्छितात, त्यांनाही कधी झोपू देत नाही.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

हे ते साधन आहे जिथे पंडितजी यांचे यासाठी स्मरण केले गेले, अनेक बाबींसाठी स्मरण करण्यात आले, परंतु आम्ही त्यांचे नक्कीच स्मरण करु. याच सदनातील पंडित नेहरू यांचा At the Stroke of Midnight उद्घोष आपल्या सगळ्यांना प्रेरित करत राहील. याच सदनात अटलजींचा आवाजही दुमदुमला होता. त्यांचे शब्द आजही इथे घुमत आहेत. सरकारें आएंगी, जाएंगी, पार्टियां बनेंगी, बिगड़ेंगी, लेकिन ये देश रहना चाहिए।

आदरणीय अध्यक्ष महोदय,

पंडित नेहरू यांचे जे प्रारंभिक मंत्रिमंडळ होते. बाबासाहेब आंबेडकर त्यातील एक मंत्री होते. जगभरातील सर्वोत्तम पद्धती भारतात आणण्यावर ते जोर देत असत. फॅक्टरी कायद्यात आंतरराष्ट्रीय सुविधा सामील करण्याबाबत बाबासाहेब सर्वाधिक आग्रही होते आणि परिणामस्वरूप आज त्याचे लाभ देशाला मिळत आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला नेहरूजी यांच्या सरकारमध्ये जलधोरण दिले होते. ते जलधोरण तयार करण्यात बाबासाहेबांची भूमिका खूप महत्त्वाची होती.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

आपल्याला हे ठाऊक आहे की बाबासाहेब आंबेडकर भारताबद्दल एक बाब नेहमी बोलत असत की भारतात सामाजिक न्यायाकरिता औद्योगिकीकरण होणं खूप गरजेचे आहे. कारण देशातील दलित - मागास यांच्याकडे जमीन नाही, ते काय करतील, औद्योगिकीकरण व्हायला हवे. आणि बाबासाहेबांची ही भूमिका स्वीकारून डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जे पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य होते, त्यांनी या देशात, पहिले वाणिज्य मंत्री आणि उद्योग मंत्री म्हणून औद्योगिक धोरण आणले होते. आजही कितीही औद्योगिक धोरणे बनोत, मात्र त्याचा आत्मा हा पहिल्या सरकारने दिला होता आणि त्यात त्यांचे खूप मोठे योगदान होते.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

लालबहादूर शास्त्रीजी यांनी 65 च्या युद्धात आपल्या देशातील जवानांचं मनोबल उंचावलं होतं. त्यांच्या सामर्थ्याला पूर्णपणे राष्ट्रहिताकरता झोकून देण्याची प्रेरणा त्यांनी याच सदनातून दिली होती. लालबहादूर शास्त्री यांनी याच ठिकाणाहून हरितक्रांतीसाठी एक मजबूत पाया रचला होता.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

बांगलादेश मुक्तिसंग्रामाचे आंदोलन आणि त्याचं समर्थन देखील याच सदनात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात करण्यात आलं होतं. याच सदनानं आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर झालेला हल्ला देखील पाहिला होता आणि याच सदनाने भारतीय जनतेच्या सामर्थ्याची जाणीव करत मजबूत लोकशाहीचं पुनरागमन देखील पाहिलं होतं. याने राष्ट्रीय संकटही पाहिलं होतं आणि सामर्थ्यही पाहिलं होतं.

आदरणीय अध्यक्ष महोदय,

याच सदनात आपले माजी पंतप्रधान चरणसिंहजी यांनी ग्रामीण मंत्रालयाचे गठन केलं होतं. यासाठी हे सदन कायम ऋणी राहील. याच सदनात मतदानाचं वय 21 वरून 18 करण्याचा निर्णय झाला होता आणि देशातील तरुण पिढीला त्यांचं योगदान देण्याकरिता प्रेरित करण्यात आलं होतं. त्यांना प्रोत्साहित करण्यात आलं होतं.

आपल्या देशाने युती-आघाडीची सरकारे पाहिले. व्ही पी सिंगांची आणि चंद्रशेखर यांची. यानंतर बदल होत राहिले. दीर्घ काळ देश एका दिशेने जात होता. आर्थिक धोरणांच्या ओझ्याखाली देश दबला होता. परंतु नरसिंह राव यांच्या सरकारने धैर्याने जुनी आर्थिक धोरणं सोडून नव्या मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे परिणाम आज देशाला लाभत आहेत. अटल बिहारी वाजपेयी जी यांचेही सरकार आपण या सदनात पाहिले. देशात आज महत्वपूर्ण ठरलेलं सर्व शिक्षा, आदिवासी कार्यालय मंत्रालय, अटलजींनी बनवलं होतं, ईशान्येच्या राज्यांसाठी मंत्रालयाची स्थापना अटलजींनी केली होती. अणू चाचणी (Nuclear Test) भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक बनले. आणि याच सदनात मनमोहनजी यांच्या सरकारच्या काळात कॅश फॉर वोटचं कांडही सदनाने पाहिलं. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

‘सबका साथ सबका विकास’ हा मंत्र, अनेक ऐतिहासिक निर्णय, दशकांपासून प्रलंबित विषय, त्यावरील कायमस्वरूपी उपाययोजना देखील याच सदनात झाल्या आहेत. कलम (Article) -370,  हे सदन कायम गर्वाने म्हणेल, याच सदनाच्या कार्यकाळात ते हद्दपार झालं. एक राष्ट्र, एक कर,  ‘वन नेशन, वन टॅक्स’ - जीएसटीचा निर्णय देखील याच सदनाने घेतला. एक श्रेणी एक निवृत्तीवेतन  ‘वन रँक, वन पेंशन’ ओआरओपी देखील याच सदनाने पाहिलं. गरीबांसाठी कोणत्याही वादाशिवाय 10 टक्के आरक्षणाची भेट पहिल्यांदाच या देशात देण्यात आली. 

आदरणीय अध्यक्ष महोदय,

भारताच्या लोकशाहीत आपण अनेक चढ-उतार पाहिले आहेत आणि हे सभागृह लोकशाहीचे सामर्थ्य आहे, लोकशाहीच्या सामर्थ्याचे साक्षीदार आहे आणि जनतेच्या विश्वासाचा केंद्रबिंदू राहिला आहे. या सभागृहाची खासियत पाहा, आजही जगभरातील लोक आश्चर्यचकित होतात. हे असे सभागृह आहे ज्यात एकेकाळी 4 खासदार असलेला पक्ष सत्तेत होता आणि 100 सदस्य असलेला पक्ष विरोधी पक्षात बसायचा.

ही पण ताकद आहे. या सदनाच्या लोकशाहीच्या ताकदीची ओळख करून देत आहे, आणि हेच सदन आहे ज्यामध्ये एका मताने अटलजी यांचे सरकार पडले होते आणि लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवली होती, हे पण याच सदनामध्ये घडलेले होते. आज अनेक लहान लहान प्रादेशिक पक्षांचे संसदेमधील प्रतिनिधित्व आपल्या देशाच्या विविधतेला, आपल्या देशाच्या आशा आकांक्षांचे एक प्रकारे ते आकर्षणाचे केंद्रबिंदू बनलेले आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

या देशात दोन पंतप्रधान असे झाले मोरारजी देसाई, व्ही.पी. सिंह एका वेळेला निवडणूक लढले होते, काँग्रेसमध्ये त्यांनी आपले संपूर्ण जीवन घालवले परंतु ते अँटी काँग्रेस सरकारचे नेतृत्व करत होते, हे पण याचे वेगळेपण होते, आणि आपले नरसिंह राव जी, ते तर घरी परत जाण्याची तयारी करत होते त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा देखील केली होती परंतु याच लोकशाहीची ताकद पाहा या सदनाची ताकद पाहा की ते पंतप्रधानांच्या रूपाने पाच वर्षापर्यंत आपली सेवा करत राहिले.

माननीय अध्यक्ष महोदय,

सर्वांच्या सहमतीने अवघडात अवघड काम पूर्ण होताना आपण पाहिले आहे. 2000 सालात जेव्हा अटलजी यांचे सरकार होते याच सदनाने तीन राज्यांची स्थापना सर्वानुमते केली आणि ती पण मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये केली. जेव्हा छत्तीसगड राज्याची स्थापना झाली तेव्हा उत्सव छत्तीसगडमध्ये सुद्धा साजरा झाला, त्याचवेळी असाच उत्सव मध्यप्रदेशाने सुद्धा साजरा केला, जेव्हा झारखंड राज्याची स्थापना झाली तेव्हा असाच उत्साह उत्सव झारखंडमध्येही साजरा झाला त्याचप्रमाणे बिहारने सुद्धा असाच उत्सव साजरा केला. हीच आपल्या सदनाची ताकद आहे सर्व सहमतीनेचे वातावरण निर्माण करून, परंतु काही कटू आठवणी अशा देखील आहे की तेलंगणाचा अधिकार  दाबण्याचा सुद्धा मोठा प्रयत्न झाला, रक्ताचे पाट सुद्धा वाहिले. आता स्थापना झाल्यानंतर ना तेलंगणा उत्सव साजरा करू शकला ना आंध्र उत्सव साजरा करू शकला एक प्रकारे, कटुतेचे बीज रोवले गेले. चांगले झाले असते जर आपण त्याचप्रमाणे आनंदाने उत्साहाने आपण तेलंगणा राज्याची स्थापना करू शकलो असतो तर एका नव्या उंचीवर आज तेलंगणा राज्य पोहोचले असते.

माननीय अध्यक्ष महोदय,

या सदनाची ही परंपरा राहिलेली आहे संविधान सभेने त्यावेळी आपला दिवसाचा भत्ता 45 रुपयां ऐवजी कमी करून 40 रुपये एवढा केला होता. त्यांना वाटले आपण याला कमी केले पाहिजे.

माननीय अध्यक्ष महोदय,

हेच ते स़दन आहे ज्याच्या उपहारगृहामध्ये मिळणारे अनुदान, जे खूपच कमी किमतीमध्ये जेवण मिळत होते याच सदस्यांनी त्या अनुदानाला सुद्धा रद्द केले आणि आज पूर्ण पैसे देऊन आता उपारगृहामध्ये ते जेवण घेतात.

माननीय अध्यक्ष महोदय,

कोरोना काळात जेव्हा गरज पडली तेव्हा याच सदस्यानी ज्यांनी एमपीएलएडीएस निधी चा त्याग केला आणि देशाला या संकटाच्या काळात मदत करण्यासाठी पुढे आले एवढेच नाही तर कोरोना काळात याच सदनाच्या सदस्यांनी आपल्या  पगारात 30 टक्क्यांनी घट केली आणि त्यांनी देशाच्या पुढे आलेल्या या संकटात आपली खूप मोठी जबाबदारी निभावली.

माननीय अध्यक्ष महोदय,

आम्ही अभिमानाने असे म्हणू शकतो, या सदनामध्ये बसलेले सदस्य सुद्धा म्हणू शकतात, आपल्या पूर्वी जे या सदनात बसले होते ते सुद्धा म्हणू शकतात की, आम्हीच ते लोक आहोत ज्यांनी स्वतःला शिस्त लावण्यासाठी आमच्या इथे लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये वेळोवेळी कठोरपणा आणला, कायदे आम्हीच स्वतःवर लावून घेतले आणि आम्हीच हे निश्चित केले की नाही लोकप्रतिनिधी यांच्या जीवनात हे होऊ शकत नाही. मी हे मान्य करतो की हेच जिवंत लोकशाहीचे खूप मोठे उदाहरण आहे आणि हे उदाहरण या सदनाने समोर ठेवले. हेच माननीय सदस्यांनी पण दिलेले आहे आणि आपल्या पूर्वीच्या पिढीच्या लोकप्रतिनिधी दिलेले आहे, आणि मी हे मान्य करतो की कधीकधी अशा गोष्टींची सुद्धा कधी कधी आठवण करणे गरजेचे आहे.

माननीय अध्यक्ष महोदय,

आपण जे सध्याचे संसदेचे सदस्य आहोत त्यांच्यासाठी तर हा एक विशेष भाग्याचा क्षण आहे,भाग्याचा क्षण यासाठी आहे की आम्हाला इतिहास आणि भविष्य या दोघांमधील दुवा बनण्याची संधी मिळाली आहे. काल आणि आज ला जोडण्याची आपल्याला संधी मिळाली आहे आणि येणाऱ्या उद्या ची निर्मिती करण्याचा एक नवा विश्वास नवा उत्साह नवा आनंद घेऊन आपण इथून निरोप घेणार आहोत.

माननीय अध्यक्ष महोदय,

आजचा हा दिवस फक्त आणि फक्त या सदनातल्या सर्व साडेसात हजार लोकप्रतिनिधी राहिलेल्यांचा गौरव करण्याचे एक पान आहे. या भिंतींपासून आपण जी प्रेरणा घेतलेली आहे जो नवीन विश्वास घेतला आहे त्याला आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे. खूप सार्‍या गोष्टी अशा होत्या ज्या सदनातल्या प्रत्येक सदस्यांच्या टाळीच्या योग्यतेच्या होत्या. परंतु राजकारण त्यामध्ये सुद्धा आडवे आलेले दिसले, नेहरूजी यांच्या योगदानाबद्दल स्तुती केली असती तर या सदनामध्ये असा कोण सदस्य आहे ज्याला टाळी वाजवण्याचे मन झाले नसते. परंतु या खेरीज पण देशाच्या लोकशाहीसाठी हे खूप गरजेचे आहे की आपण सगळ्यांनी आपल्या अपेक्षांसाठी माननीय अध्यक्ष महोदय मला पूर्व विश्वास आहे की आपल्या मार्गदर्शनाखाली आणि या अनुभवी माननीय संसद सदस्यांच्या एकत्रित ताकदीने आपण नव्या संसद भवनात जेव्हा जाऊ तेव्हा नवीन विश्वास बरोबर घेऊन जाऊ.

मी पुन्हा एकदा आज पूर्ण दिवस आपण या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी दिला. एका चांगल्या वातावरणात सर्वांची आठवण करण्याची संधी दिली. यासाठी मी आपल्या सर्वांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो आणि मी सर्व सदस्यांना आवाहन करतो की, आपल्या जीवनातल्या अशा मधुर आठवणींना इथे आपण जरूर व्यक्त करा, कारण  संपूर्ण देशापर्यंत हे पोहोचले पाहिजे. खरोखरच आमचे हे सदन, आमच्या लोकप्रतिनिधींचे कार्य खऱ्या अर्थाने देशाला समर्पित होते. यातला खरा भाव लोकांपर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा घेऊन मी पुन्हा एकदा या मातृभूमीला वंदन करतो. आणि, मागच्या 75 वर्षांमध्ये भारताच्या लोकशाहीला नवीन सामर्थ्य, ताकद देणाऱ्या प्रत्येक गुरूला, त्या नादब्रह्माला नमन करत मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. खूप खूप आभार !

 

* * *

S.Patil/Shraddha/Suvarna/Sushma/Vinayak/Vikas/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1958773) Visitor Counter : 177