कृषी मंत्रालय
जी-20 च्या कृषी कार्यगटांतर्गत कृषी मंत्र्यांची 3 दिवसीय बैठक आजपासून हैदराबादमध्ये सुरू
Posted On:
15 JUN 2023 8:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जून 2023
जी-20 च्या कृषी कार्यगटांतर्गत कृषी मंत्र्यांची 3 दिवसीय बैठक आजपासून हैदराबाद येथे सुरू झाली. या बैठकीत सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे 200 हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. बैठकीत कृषी प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा केली जात आहे आणि ही क्षेत्रे यावर्षीच्या कृषी कार्यगटांसाठी आधारभूत आहेत, असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अन्न सुरक्षा आणि पोषणासाठी पूर्ण वचनबद्धता आहे, त्यानुसार धोरणे तयार केली आहेत आणि त्याची यशस्वी अंमलबजावणीही केली जात आहे, असे तोमर यांनी सांगितले.

तोमर यांनी कृषी कार्यगटाच्या प्राधान्य क्षेत्रांची माहिती दिली. (अ) अन्न सुरक्षा आणि पोषण (ब) शाश्वत शेती तसेच हरित आणि हवामान लवचिक शेतीला वित्तपुरवठा करणे, हवामान स्मार्ट दृष्टीकोन असलेले तंत्रज्ञान आणि शेती प्रणाली (सी) लहान आणि अल्पभूधारक शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे. (ड) कृषी परिवर्तनासाठी डिजिटलायझेशन या चार क्षेत्रांवर बैठकीच्या वेगवेगळ्या सत्रांमध्ये चर्चा केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात भारत अतिशय समृद्ध आणि शक्तिशाली आहे, जागतिक पातळीवर कृषी क्षेत्राच्या हितासाठी भारत आपले ज्ञान आणि अनुभव सामायिक करतो आणि भविष्यातही हे करण्यासाठी भारत सज्ज आहे असे त्यांनी पुढे सांगितले, कृषी क्षेत्रात प्रभावी धोरणे अंमलात आणली, पथदर्शी कार्यक्रम राबवले, आपल्या अन्न व्यवस्थेसाठी व्यावहारिक आणि शाश्वत उपाय लागू केले असेही ते म्हणाले.
मंत्री आणि महासंचालकांसह जी 20 सदस्य देश, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे 200 हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1932717)
Visitor Counter : 171