पर्यटन मंत्रालय
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, जी. किशन रेड्डी आणि अजय भट यांच्या उपस्थितीत जी-20 च्या तिसर्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीचे केले उद्घाटन
भारताच्या जी- 20 अध्यक्षतेखाली, जी-20 पर्यटन कार्यगट पाच परस्परांशी संबंधित प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करतील, यामुळे शाश्वत
विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी एक साधन म्हणून पर्यटनासाठी मार्गदर्शक ठरेल : जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल
भारताच्या अध्यक्षतेखाली जी -20 चे बोधचिन्ह आणि संकल्पना प्रभावी संदेश देत आहे जो संपूर्ण जगामध्ये समान आणि न्याय्य विकासासाठी प्रयत्नशील आहे : डॉ जितेंद्र सिंह
भारतात आणि जगभरात शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय जी- 20 राष्ट्रांबरोबर काम करण्यास उत्सुक : जी. किशन रेड्डी
Posted On:
23 MAY 2023 9:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मे 2023
जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज श्रीनगरच्या एसकेआयसीसी येथे ‘पर्यटन कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीचे’ उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान डॉ जितेंद्र सिंह; केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी आणि केंद्रीय पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट उपस्थित होते. तसेच याप्रसंगी जी-20 राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि निमंत्रित देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली, पर्यटन कार्यगटाने पाच परस्परांशी संबंधित असलेल्या प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी एक साधन म्हणून पर्यटनासाठी पथदर्शक कार्यक्रम तयार करता येईल.
नायब राज्यपाल सिन्हा पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीर लवकरच जगातील पहिल्या 50 गंतव्यस्थानांमध्ये स्थान मिळवेल आणि ते जागतिक पर्यटकांच्या ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मध्ये म्हणजे भेट दिलेच पाहिजे, अशा पर्यटक स्थानांच्या यादीमध्ये असेल. जम्मू आणि काश्मीरमधील वुलर तलावाच्या काठावर देशातील सर्वात मोठे पुस्तक गाव विकसित करीत आहे. जम्मू- काश्मीरमधील ग्रामीण भागाला भेट देण्यासाठी ते लोकप्रिय पर्यटन स्थळ बनवविण्यात येत आहे. ही स्थाने शाश्वत बनवतानाच, आकर्षक वारसा स्थळांचे सौंदर्य जतन करणे हे उद्दिष्ट यामाग्र आहे, यावर नायब राज्पालांनी भर दिला.
उद्घाटन सत्रामध्ये बोलताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, जी-20 चे बोधचिन्ह आणि संकल्पना भारताच्या अध्यक्षपदाविषयी प्रभावी संदेश देणारे असून संपूर्ण जगामध्ये समान आणि न्याय्य वृद्धीसाठी भारत प्रयत्नशील असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.
डॉ. सिंह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरमध्ये आयफेल टॉवरपेक्षाही उंच असलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल 'चिनाब ब्रिज’ आहे आणि भारतातील सर्वाधिक लांबीचा द्वि दिशात्मक महामार्ग बोगदा चेनानी-नाशरी बोगदा आहे. हा बोगदा आशियातील सर्वात लांब ‘द्वि-दिशात्मक’ महामार्ग बोगदा आहे, यासारख्या अनोख्या पायाभूत सुविधांसह हे राज्य आधुनिक बनले आहे. जम्मू-काश्मीर पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने आकर्षक स्थान आहे.
उद्घाटन सत्रामध्ये बोलताना जी. किशन रेड्डी म्हणाले, भारत आणि जगभरात शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय जी -20 राष्ट्रांबरोबर काम करण्यास उत्सुक आहे.
जी. किशन रेड्डी पुढे म्हणाले, तिसर्या पर्यटन कार्यगटाने हरित पर्यटन , डिजिटलायझेशन, कौशल्य, एमएसएमई आणि ‘ डेस्टिनेशन मॅनेजमेंट’ या पाच प्रमुख प्राधान्य क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. पर्यटन क्षेत्राच्या संक्रमणाला गती देण्यासाठी आणि 2030 चे शाश्वत विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी हे प्राधान्यक्रम महत्त्वाची पायाभरणी करणारे आहेत, यावर त्यांनी भर दिला.
जी20 चे शेर्पा, अमिताभ कांत म्हणाले, हरित पर्यटन , डिजिटलायझेशन, कौशल्य , एमएसएमई आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट अंतर्गत तिसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीत पाच प्रमुख प्राधान्य क्षेत्रांमध्ये प्रशंसनीय प्रगती झाली आहे. पर्यटन हा विकासाचा प्रमुख वाहक असून , रोजगार निर्मितीचा प्रमुख चालक आहे, यावर कांत यांनी भर दिला.
जी -20 राष्ट्रांचे प्रतिनिधी, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था याशिवाय केंद्रीय पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, जी- 20 चे मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रृंगला आणि सचिव पर्यटन अरविंद सिंग हेही उद्घाटन सत्रात उपस्थित होते.
* * *
N.Chitale/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1926774)
Visitor Counter : 118