नागरी उड्डाण मंत्रालय

दिल्ली-धरमशाला-दिल्ली या पहिल्या इंडिगो विमान सेवेला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, ज्योतिरादित्य शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग यांनी दाखवला हिरवा झेंडा


इंडिगो विमानसेवेमुळे राज्यातील निम्म्या लोकसंख्येला लाभ होईल असे अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन, संपूर्ण भारतातून थेट कनेक्टिव्हिटीचे आवाहन

Posted On: 26 MAR 2023 11:25AM by PIB Mumbai

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह यांनी आज इंडिगो एअरलाइनच्या पहिल्या दिल्ली-धरमशाला-दिल्ली विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवला.

हिमाचल प्रदेशला इंडिगो कनेक्टिव्हिटी सुकर केल्याबद्दल यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे आभार व्यक्त केले आणि सांगितले की, डोंगराळ प्रदेशात हवाई वाहतूक केल्याशिवाय इंडिगो खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विमान कंपनी बनू शकली नसती. ठाकूर यांनी एका मोठ्या विमानतळासाठी एक मुद्दा मांडला आणि सांगितले की, सध्या संपूर्ण भारतातून हिमाचलमध्ये येणाऱ्या प्रवाशांना दिल्लीला जावे लागते आणि त्यानंतर या राज्यात येणाऱ्या विमानाने प्रवास करावा लागतो. मोठ्या विमानतळामुळे प्रवाशांना थेट अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील विमानतळ पायाभूत सुविधांच्या जलद विस्ताराचे श्रेय देत ठाकूर म्हणाले की, अल्पावधीतच ही संख्या 74 वरून 140 च्या वर गेली आहे. ते पुढे म्हणाले की उडान योजनेमुळे हवाई चप्पल वापरणारे नागरीकसुद्धा विमान प्रवास करू शकतात.

विमानतळाद्वारे पुरवल्या जाणार्‍या सेवेच्या व्याप्तीविषयी बोलताना ठाकूर म्हणाले की, धरमशाला विमानतळ पाच जिल्ह्यांना सुलभ संपर्क यंत्रणेने जोडतो आणि त्याचा थेट लाभ राज्यातील निम्म्या लोकसंख्येला होतो. इंडिगोची ही एक विमान सेवा निम्मे राज्य आणि पंजाबमधील काही ठिकाणे देशाच्या इतर भागांना जोडण्यात मोठी भूमिका निभावेल.

केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह म्हणाले की, धरमशाला विमानतळावरून 1990 मध्ये पहिली  विमान सेवा सुरू झाली आणि त्यानंतर त्याची सेवा विस्तारली आणि आता त्याला 1376 मीटरची  धावपट्टी आहे. मंत्र्यांनी सांगितले की, जागेची परवानगी मिळाल्यास धावपट्टी आणखी विस्तारता येईल. दलाई लामा यांच्या उपस्थितीमुळे विमानतळावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, असे त्यांनी नमूद केले आणि हा विमानतळ सर्व वायव्य हिमाचल प्रदेशला हवाई कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. इंडिगोचे विमानसेवेमुळे अधिकाधिक पर्यटक हिमाचलमध्ये येतील आणि याचा लाभ राज्यातील लोकांना होईल.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात गेल्या 65 वर्षात जे काही साध्य झाले नाही ते गेल्या 9 वर्षात 148 विमानतळ, वॉटरड्रोम आणि हेलीपोर्ट्सच्या निर्मितीने साध्य झाले आहे. ते पुढे म्हणाले की, येत्या तीन ते चार वर्षांत ही संख्या 200 च्या पुढे नेण्याच्या उद्दिष्टाने मंत्रालय कार्यरत आहे. हा प्रयत्न मोठ्या मेट्रो विमानतळांना तसेच शेवटच्या घटकापर्यंत संपर्क यंत्रणा प्रदान करणार्‍या दुर्गम विमानतळांना समान महत्त्व देईल.

इंडिगो एअरलाईन दिल्ली ते धरमशाला दररोज विमानसेवा चालवेल. या नवीन उड्डाण क्षेत्रामुळे इंडिगोच्या दैनंदिन उड्डाणांची संख्या 1795 एवढी झाली आहे आणि निर्गमनाच्या (डिपार्चर) बाबतीत ती जगातील सातवी सर्वात मोठी विमान कंपनी ठरते.

***

S.Thakur/V.Joshi/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1910903) Visitor Counter : 145