पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

“भारत बाघों की तस्करी का गढ” या शीर्षकाने राजस्थान पत्रिकेत 09.11.2022 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीचे खंडन


वाघांच्या मृत्यूंबाबतची ही बातमी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारित आहे

Posted On: 10 NOV 2022 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2022

 

“भारत बाघों की तस्करी का गढ” शीर्षकाची बातमी राजस्थान पत्रिकामध्ये 9 नोव्हेंबर 2022  रोजी  प्रकाशित झाली आहे. ही बातमी चुकीची तथ्ये, आकडेवारी आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर आधारित आहे तसेच सनसनाटी बातमी निर्माण करण्याच्या उद्देशाने  ती प्रकाशित करण्यात आली आहे. जप्तीविषयक माहिती अचूक आहे आणि वाघांच्या मृत्यूची संख्या मिळवण्यासाठी जप्त केलेले वाघांचे भाग खरे आहेत अशा अवास्तव गृहितकांवर विसंबून तयार केलेल्या काही अहवालांवर हे वृत्त आधारित आहे.

मात्र भारतात असे काही समुदाय आहेत जे पशुधनाच्या हाडांचा वापर करून बनावटपणे वाघाचे पंजे बनवण्यात तरबेज आहेत. त्यामुळे अशा प्रकारची गृहीतके  चुकीची सिद्ध होतात. डीएनए आधारित तंत्राचा वापर करून खरेपणाची पडताळणी न करता पंजासारख्या जप्त केलेल्या बनावट अवयवाच्या आधारे वाघाची गणना केल्याने अनेकदा वाघांच्या मृत्यूची संख्या वाढते. भारत सरकारच्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना बदनाम करण्यासाठी असे अहवाल अर्धवट माहितीसह प्रकाशित केले जातात.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे (एनटीसीए) वाघांच्या मृत्यूंची पद्धतशीर आकडेवारीची नोंद 2012 पासूनच केली जात आहे आणि 2012 पूर्वीच्या वाघांच्या मृत्यूच्या तपशिलांचा हवाला देणारा कोणताही अहवाल नेहमीच पडताळणी न करता येणारी तथ्ये/ गृहितके आणि सांगीव पुराव्यावर अवलंबून असतो.

2017-2021 या कालावधीसाठी, एनटीसीएने 547 वाघांच्या मृत्यूच्या घटनांची नोंद केली आहे, त्यापैकी 393 वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला. 154 प्रकरणे विषबाधा (25), फासात अडकणे  (9), गोळी मारणे/निर्मूलन (7) जप्तीसह (55) , विजेचा धक्का  (22) आणि शिकार म्हणून नोंदलेली प्रकरणे (33) आहेत. शरीराच्या अवयवांसाठी बेकायदेशीरपणे शिकार आणि वन्यजीवांच्या व्यापारामुळे होणारी वाघांच्या मृत्यूची वास्तविक संख्या 88 आहे जी गेल्या 5 वर्षात नोंदलेल्या एकूण वाघांच्या मृत्यूच्या घटनांच्या 16% आहे.

ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन हा कार्यक्रम 2006 पासून अंमलात असून तो वाघ, सह-भक्षक आणि त्यांच्या शिकार तळांसाठी विज्ञान आधारित देखरेख कार्यक्रम आहे. त्यानुसार भारतीय वाघांच्या वाढीचा वार्षिक दर 6% राहील, असा अंदाज आहे. शिकारीसह विविध कारणांमुळे होणारा वाघांचा  मृत्यू  दर व्याघ्रसंख्येची नैसर्गिक वृद्धी दर झाकोळून टाकतो . शिवाय, वाघांची घनता जास्त असलेल्या भागात स्पष्ट नैसर्गिक प्रक्रिया प्रचलित असल्याने जास्त मृत्यू नोंदवले जातात.

वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी, एनटीसीएने कठोर मानके स्थापित केली आहेत आणि असे करणारा कदाचित भारत हा जगातील एकमेव मुक्त व्याघ्र क्षेत्र  श्रेणीचा देश आहे. वाघाच्या शवाची विल्हेवाट लावण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) विकसित करण्यात आली आहे. शवविच्छेदन आणि त्यानंतर दहनाद्वारे  शवाची विल्हेवाट लावण्यासाठी समितीच्या  स्थापनेचा समावेश या प्रणालीत आहे. अंतर्गत  अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी जतन केले जातात. तपशीलवार अंतिम अहवालाच्या आधारे, व्याघ्र प्रकल्प/ व्याघ्र श्रेणी राज्यांनी सादर केलेले पुरावे/दस्तावेज, वाघांच्या मृत्यूचे कारण निश्चित केले जाते आणि त्यानुसार मृत्यू प्रकरणाची नोंद केली जाते.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत  व्याघ्र प्रकल्प विभाग आणि एनटीसीए, कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे, प्रगत तांत्रिक साधनांचा वापर करून व्याघ्र प्रकल्पांचे आणि  वाघांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहेत.

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875048) Visitor Counter : 201


Read this release in: English , Urdu , Hindi