शिक्षण मंत्रालय

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांनी पुणे येथील डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभाला केले संबोधित


देशात उत्तम प्रशासन निर्माण करण्यासाठी युवकांनी सत्य, शांती आणि अहिंसेचा मार्ग अनुसरायला हवा :डॉ.राजकुमार रंजन सिंग

Posted On: 08 OCT 2022 8:38PM by PIB Mumbai

 

पुणे, 08 ऑक्टोबर 2022

केंद्रीय शिक्षण आणि परदेश व्यवहार राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंग यांनी आज सांगितले की,देशाचे भावी नेतृत्व असलेल्या युवा पिढीने आपल्या स्वप्नातील भारताची उभारणी करण्यासाठी सत्य, शांती आणि अहिंसेचा मार्ग अनुसरायला हवा. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि राष्ट्रीय नेत्यांचा संघर्ष तसेच त्यांनी दिलेले योगदान यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, या सर्वांनी उत्तम प्रशासनासाठी आपल्याला राज्यघटना दिली.

पुणे येथील डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाच्या चौथ्या दीक्षांत समारंभात उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, आपण इतिहासाच्या अशा टप्प्यावर आहोत की जिथे सर्व पातळ्यांवर अत्यंत जलदगतीने बदल घडून येत आहेत. आपण सर्वांनी नव्या गोष्टी शिकत राहून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 हे 21 व्या शतकातील आपले पहिलेच शैक्षणिक धोरण आहे. आपल्याजवळ मजबूत ज्ञानाचा पाया असेल तरच त्यावर सशक्त भारताची उभारणी करता येईल असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिक्षण घेणे म्हणजे केवळ पदव्या मिळविणे नव्हे तर शिक्षित असणे म्हणजे चांगला माणूस असणे, ज्ञानी होणे आणि आपल्या समाजातील सामाजिक विषमता कमी करणे होय. आणि यासाठी आपल्याला समाजाच्या एकंदर हितासाठी प्रयत्न करतानाच सहयोगात्मक दृष्टीकोन स्वीकारणे गरजेचे आहे असे केंद्रीय राज्यमंत्री पुढे म्हणाले. आजच्या आधुनिक शिक्षणाला नितीमूल्यांच्या मजबूत पायाची गरज असल्याचं ते पुढे म्हणाले. नवीन शिक्षण धोरण तयार करताना प्राचीन परंपरा आणि आधुनिकतेचा योग्य संयोग साधला गेल्याचे त्यांनी सांगितले. नविनतम तंत्रज्ञानासह संशोधन आणि ई-लर्निंगला या धोरणात महत्त्व दिल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षण मंत्रालयातर्फे उच्च शिक्षणात विविध माहिती आणि संवाद  उपक्रमांचा समावेश केल्याचे डॉ सिंग यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे अध्यक्ष डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्यासह युनेस्कोचे अध्यक्षपद भूषवणारे आदरणीय प्राध्यापक तसच पुण्याच्या एम ए ई ई आर अर्थात  महाराष्ट्र अभियांत्रिकी आणि शैक्षणिक संशोधन अकादमीच्या एम आय टी चे संस्थापक आणि मुख्य आश्रयदाता डॉक्टर विश्वनाथ डी कराड तसच एम ए ई ई आर, एम आय टी विश्व शांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अंतराळ दुर्बिणीची उभारणी तसच इतर ग्रहांवरच्या सजीवांचा शोध घेण्यासह भारताच्या येत्या पन्नास वर्षातल्या अंतराळ कार्यक्रमामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना मुबलक संधी उपलब्ध होणार असल्याचे डॉ कस्तुरीरंगन यांनी सांगितले. हायब्रीड नोकऱ्यामध्ये  वाढ होत असून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आपली शिक्षण प्रणाली ही 21व्या शतकाच्या गरजांबरोबर जोडली जात असल्याचं ते म्हणाले.

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, मुक्तकला, ललित कला, बी एड, माध्यम आणि पत्रकारिता, वाणिज्य, अर्थशास्त्र, विज्ञान, औषधनिर्मिती, शाश्वत अभ्यासक्रम, डिझाईन, सुशासन या क्षेत्रातल्या एकूण 4 हजार ५७६  विद्यार्थ्यांना  पदवीदान समारंभात सुवर्ण, रौप्य    आणि कांस्य पदकांसह यावेळी पदव्या प्रदान करण्यात आल्या. केवल पद्मावार आणि मिनू कलीता यांना अनुक्रमे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकारी अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

***

S.Patil/S.Chitnis/S.Naik/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1866119) Visitor Counter : 157


Read this release in: English