आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमधील एम्स (AIIMS) येथे 37 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन
सेवाभाव आणि सहयोग या वैभवशाली भारतीय परंपरांचा दाखला देत, अवयव दानाकडे कल वाढवण्याचे केले आवाहन
Posted On:
08 SEP 2022 11:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022
“आरोग्य ही सेवा आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना जीवन रक्षक समजणारा देश म्हणून जगात ओळख असलेल्या आपल्या देशात आपण अवयव दानाद्वारे आणि आपल्या देशवासीयांमध्ये नेत्र आणि अवयव दानाची मानसिकता निर्माण करून अशाच स्वरूपाचा “सेवा भाव” निर्माण करू शकतो.” केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथल्या एम्स, अर्थात अखिल भारतीय आरोग्य विज्ञान संस्थेमध्ये (AIIMS) 37 व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात हे प्रतिपादन केले.
नेत्रदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच या उदात्त कामामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल नेत्रदात्यांचे कुटुंबीय, सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करून ते म्हणाले की अवयव दानामुळे लाभार्थींच्या जीवनाचा दर्जा सुधारतो आणि दात्यांच्या कुटुंबियांना समाधान मिळते.
केंद्रीय मंत्री असेही म्हणाले की “उत्तम ज्ञान आणि परिभाषित जबाबदारी असून देखील, आपल्या नागरिकांचा अवयव दानाला अपेक्षे पेक्षा कमी प्रतिसाद राहिला आहे. देशात अवयवदानाच्या दिशेने वर्तणुकीत बदल घडण्याची आवश्यकता आहे. जन आंदोलनाच्या माध्यमातून यासाठी व्यापक जनजागृती निर्माण करण्याचे मी सर्वांना आवाहन करतो.”
यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, अवयव दानाला चालना देण्यासाठी आणि त्याची उद्दिष्ट पूर्ण क्षमतेने साध्य करण्यासाठी भारत सरकार प्रभावी आणि पद्धतशीर कार्यपद्धती निर्माण करत आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रीय नेत्र पेढी, आरपी केंद्राचा 2021-22 वर्षाचा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला.
N.Chitale /R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857913)
Visitor Counter : 152