युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे युवकांना आवाहन

Posted On: 09 AUG 2022 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2022

 

देशातल्या  हर घर तिरंगा या मोहिमेचा एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत  घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री  अनुराग सिंह ठाकूर यांनी युवकांना  केले. आज "ऑगस्ट क्रांती" दिनाच्या निमित्ताने आपल्या तरुणांनी आपापल्या क्षेत्रात समर्पण भावनेने आणि मेहनतीने योगदान देऊन जगात अव्वलस्थानी तिरंगा फडकवण्याची शपथ घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. आपला राष्ट्रध्वज म्हणजे केवळ कापडाचा तुकडा नाही तर  130 कोटी भारतीयांना एकत्र आणण्याचे सामर्थ्य  तिरंगा ध्वजात आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. देशाला एकसंध ठेवण्यासह  भारताला पुढे घेऊन जाण्याचा  आणि भारताला बळकट करण्याचा संकल्प आपल्या तरुणांनी केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.  शिमला येथे नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक आणि विविध युवा मंडळांच्या सदस्यांसोबत आयोजित युवा परिषदेत ते आज बोलत होते.शिमला (हिमाचल प्रदेश )  येथील नेहरू युवा केंद्राने या परिषदेचे आयोजन केले होते.

भारत दर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवण्याचे आवाहन त्यांनी तरुणांशी संवाद साधताना केले.प्रत्येक तरुणाने आपल्या राज्यातील आणि देशातील अन्य  ठिकाणे आणि भागांना भेट दिली पाहिजे या माध्यमातून त्यांच्यात  आपुलकीची आणि देशभक्तीची भावना निर्माण होण्यास आणि त्यांना जबाबदार नागरिक बनण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

 या परिषदेतील  सहभागीसोबत उत्स्फुर्त  चर्चा करताना , देशातील विविध विषयांबाबत  आणि समस्यांबाबत तरुणांची मते जाणून घेण्याचा अनुराग ठाकूर यांनी प्रयत्न  केला. नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विविध युवा मंडळांच्या तरुणांसोबत त्यांनी महिला सक्षमीकरण, एक भारत श्रेष्ठ भारत, कौशल्य विकास, क्रीडा क्षेत्राची  भूमिका, फिट इंडिया चळवळ आणि करियर  समुपदेशन यांसारख्या विषयांवर चर्चा केली.

हर घर जल योजना, स्वच्छता, उज्वला योजना आणि डिजिटल इंडिया इत्यादी केंद्र सरकारच्या योजनांच्या यशाचाही  त्यांनी उल्लेख केला.फिट इंडिया चळवळीला चालना देण्यासाठी त्यांनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात 250 जिम स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल  क्रीडा स्पर्धांमध्ये  भारताने 61 पदके जिंकली  आणि स्पर्धेत चौथे स्थान मिळवले. या निकालावरून ,क्रीडा क्षेत्रात आपले यश  अनेक पटींनी वाढल्याचे  दिसून आले आहे, असे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1850338) Visitor Counter : 172


Read this release in: Odia , English , Urdu , Hindi