गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियानासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा विषय आहे, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आपल्या देशाने लोकशाहीची मुळे खोलवर रुजवली तसेच विकासाच्या प्रत्येक पैलूच्या दृष्टीने आज आपण जागतिक स्तरावर योग्य स्थानावर उभे आहोत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नव्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे.
'हर घर तिरंगा', देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकाधिक वृद्धिंगत करणारे अभियान
लोकसहभागातून 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी राष्ट्रध्वज फडकवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, या प्रयत्नात देशातील सरकारी आणि खाजगी आस्थापनाही सहभागी होणार
यावर्षी 22 जुलैपासून आपण सर्वांनी आपल्या होमपेजवर, प्रत्येक राज्यातील प्रत्येक संकेतस्थळावर आणि देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाउंटच्या होमपेजवर तिरंगा लावावा
भारत सरकारने ध्वज निर्मितीसाठी अनेकप्रकारे व्यवस्था केली आहे, तिन्ही प्रकारचे ध्वज देशातील टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध असतील, प्रत्येक जण
Posted On:
17 JUL 2022 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2022
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत 'हर घर तिरंगा' अभियानासंदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी किशनरेड्डी देखील उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा विषय आहे,असे शहा यांनी यावेळी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याचा अमृतोत्सव नव्या पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प केला आहे असे त्यांनी सांगितले.

'हर घर तिरंगा' ही मोहीम देशातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकाधिक वृद्धिंगत करणारा कार्यक्रम असल्याचे शहा यांनी सांगितले. देशातील 20 कोटींहून अधिक घरे आणि शंभर कोटींहून अधिक लोक तीन दिवस आपापल्या घरावर तिरंगा फडकवतील आणि तिरंग्याच्या माध्यमातून पुन्हा भारतमातेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करतील. लोकसहभागातून 13 ते 15 ऑगस्ट 2022 दरम्यान सर्व घरांवर राष्ट्रध्वज फडकवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी सांगितले. या प्रयत्नात देशातील सरकारी आणि खाजगी आस्थापनांचाही सहभाग असेल. तिरंगा फडकवल्याने देशाप्रती देशप्रेमाची भावना अधिक दृढ होईल आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी अगणित हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची जाणीव देशातील बालके आणि तरुणांना होईल, असे त्यांनी सांगितले. 20 कोटी तिरंगे घरांवर फडकवणे हे एक भगीरथ कार्य आहे आणि हा कार्यक्रम देशात देशभक्तीची नवीन भावना जागृत करण्यात मोठे योगदान देईल.

यावर्षी 22 जुलैपासून आपण सर्वांनी आपल्या होमपेजवर, प्रत्येक राज्याच्या प्रत्येक संकेतस्थळावर आणि देशातील प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांवरील खात्याच्या होमपेजवर तिरंगा लावला तर याची प्रसिद्धी आपोआप होईल असे गृह मंत्री म्हणाले.
राज्य सरकारांच्या सर्व जाहिरातींमध्ये ‘हर घर तिरंगा’चा प्रचार करण्यात यावा, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि स्थानिक वाहिन्यांना विनंती केल्यास त्या वाहिन्यादेखील छोटे- छोटे कार्यक्रम करून हे अभियान पुढे नेतील. गावातील सहकारी संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातूनही याचा प्रचार करायला हवा. प्रत्येक व्यक्ती या उपक्रमाशी जोडली जाईल, यादृष्टीने प्रसिद्धीची सर्व माध्यमे वापरली पाहिजेत. असे शहा यांनी सांगितले.
देशातील टपाल कार्यालयांमध्ये तिन्ही प्रकारचे ध्वज उपलब्ध असावेत, अशी व्यवस्था भारत सरकारने केली आहे. टपाल कार्यालयामधूनही तुम्ही तुमची मागणी नोंदवू शकता, तिथे जाऊन प्रत्येक नागरिक ध्वज खरेदी करू शकतो आणि ऑनलाइन खरेदीचीही व्यवस्था आहे. राज्य सरकारांसाठी जीईएमवर हे ध्वज उपलब्ध आहेत.

13 तारखेला जेव्हा हे अभियान सुरू होईल, तेव्हा आपल्या घरावर झेंडा फडकवून जर आपण भारत सरकारच्या (https://harghartiranga.com/) या समर्पित संकेतस्थळावर आपली सेल्फी टाकली तर 13 तारखेपासूनच या अभियानाला गती मिळेल.आणि 15 तारखेपर्यंत कोट्यवधी घरांवर तिरंगा फडकलेला पाहण्याचे भाग्य आपल्या सर्वांना मिळेल,असे आवाहन त्यांनी सगळ्यांना केले. देशाच्या तरुण पिढीत देशभक्तीची भावना ओतप्रोत रुजवणे आणि देशातील लहान मुले, किशोरवयीन आणि तरुणांना येत्या दीर्घ काळासाठी देशाच्या विकास, सुरक्षा आणि भविष्याशी जोडण्याचे संस्कार देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत गुजरात, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, नागालँड, आसाम आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 'हर घर तिरंगा' कार्यक्रमाबाबत आपले विचार आणि सूचना मांडल्या.या अभियानात आपापल्या राज्यातील सर्व घरे आणि आस्थापना पूर्णपणे सहभागी होतील ,अशी ग्वाही त्यांनी या बैठकीत दिली. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करत त्यांनी आभार व्यक्त केले.
* * *
N.Chitale/S.Kakade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842241)