कृषी मंत्रालय

कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या परतफेडीवर सवलत देणार


बँकांना 2 टक्के व्याज सवलत तर वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के प्रोत्साहन पर लाभ

1 मार्च 2020 ते 31 मे 2020 दरम्यान देय 3 लाख रुपयांपर्यंतच्या सर्व अल्पमुदतीच्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी लागू

Posted On: 30 MAR 2020 8:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मार्च 2020

 

शेतकऱ्यांनी बँकाकडून घेतलेले सर्व अल्पमुदतीचे पीक कर्ज जे 1 मार्च 2020 आणि 31 मे 2020 दरम्यान देय आहे किवा असेल, अशा कर्जाची परतफेड मुदत 31 मे 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आता 31 मे 2020 पर्यंत कोणत्याही दंडात्मक व्याजाशिवाय केवळ 4 टक्के प्रतिवर्ष व्याजदराने आपल्या पीक कर्जाची परतफेड करु शकणार आहेत.

सध्या लोकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असल्यामुळे, अनेक शेतकरी अल्प मुदतीच्या पीक कर्जाची थकबाकी भरण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. याशिवाय लोकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध आणि वेळेत विक्री करण्यात येणारी अडचण आणि त्यांच्या उत्पादनाची रक्कमही न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना या कालावधीत पडणाऱ्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाची पतफेड करण्यात अडचणी येऊ शकतात.

शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी, 31 मे 2020 पर्यंतच्या 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाच्या व्याज अनुदान (आयएस) आणि वेळेत  परतफेड प्रोत्साहन  लाभाची मुदत 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात  आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा कर्जाची परतफेड 4 टक्के वार्षिक व्याजदराने कोणताही दंड न आकारता करता येणार आहे.

सरकार बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवीत आहे. ज्यामध्ये बँकांना 2 टक्के व्याज अनुदान दिले जाते. आणि कर्ज परतावा वेळेवर  केल्यास शेतकऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त लाभ अशाप्रकारे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्यास दरसाल 4 टक्के व्याज आकारले जाईल.

 

U.Ujgare/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1609385) Visitor Counter : 226


Read this release in: English