पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 विरुद्धच्या लढ्याची धुरा पंतप्रधानांकडे

विविध संबंधितांशी पंतप्रधानांचा संवाद

दररोज 200 हून अधिक जणाशी संवाद

Posted On: 29 MAR 2020 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 मार्च 2020

 

कोविड-19 विरुद्ध भारताचा लढा सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, यासंदर्भात विविध संबंधीतांशी संवाद साधत आहेत.

पंतप्रधान दररोज 200 हून अधिक जणांशी संवाद साधत असून याद्वारे, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून, कोविड-19  विरुद्धच्या उपाययोजनांबाबत थेट माहिती घेत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून, समाज आणि राष्ट्राप्रती त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना प्रोत्साहनही देत आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून पंतप्रधान, समाजाच्या विविध स्तरातल्या लोकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवादही साधत आहेत. 

पंतप्रधानांनी इलेक्ट्रोनिक मध्यम समूहाच्या प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे चर्चा केली. 24 मार्चला मुद्रित माध्यमाच्या प्रमुखांशी त्यांनी संवादही साधला. सकारात्मक संदेश देत या माध्यमांनी जनतेमधली भीती आणि नकारात्मकतेची भावना कमी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 विविध रेडीओ जॉकी आणि ऑल इंडिया रेडीओच्या निवेदकांशी त्यांनी 27 मार्चला व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून संवाद साधला.

काही कोरोना बाधीतांशी आणि त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींशीही पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून संवाद केला आणि यासंदर्भात माहिती घेतली.

25 मार्चला वाराणसी या आपल्या लोकसभा मतदार संघातल्या जनतेशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून संवाद साधला. जनतेने संयम आणि संवेदनशील राहून या विषाणूशी लढा देण्याबाबतच्या आवश्यक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 

नियमित संवाद आणि बैठका

कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठीचे उपाय आणि मार्ग याबाबत, पंतप्रधानांनी, जानेवारीपासून विविध स्तरातल्या लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या आणि  बैठकी घेतल्या.

मुख्य सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव यांच्या समवेत दररोज बैठक घेऊन त्यांच्याकडून, कोविड-19 संदर्भात पंतप्रधान नियमित माहिती घेत आहेत.

 सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि उचलण्यात येत असलेली पावले याबाबत, मंत्री गटाकडून पंतप्रधान माहिती घेत आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली हा मंत्री गट स्थापन करण्यात आला आहे.

 

आदर्श उदाहरण

जनतेने सोशल डिस्टन्सिंग राखावे यासाठी होळी कार्यक्रमात आपण सहभागी होणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

राष्ट्राला संबोधन-जनता कर्फ्यू आणि 3 आठवड्याचा लॉकडाऊन

कोविड-19 शी मुकाबला करण्यासाठी जनतेने सज्ज राहावे यासाठी पंतप्रधांनानी 19 मार्च 2020 राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात जनतेने, 22 मार्च 2020 रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 14 तासांच्या जनता कर्फ्यूमधे स्वेच्छेने सहभागी होण्याचे आवाहन केले.

सोशल डिस्टन्सिंगसाठी जनतेला सज्ज करण्याकरिता, 24 मार्च 2020 ला जनतेला केलेल्या संबोधनात 3 आठवड्याच्या लॉकडाऊनचे आवाहन करत या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केवळ हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात ‘निर्धार आणि संयम’ हा द्विसूत्री मंत्र त्यांनी राष्ट्राला दिला.

देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील असे सांगतानाच जनतेने उतावीळपणे खरेदी करू नये अशी विनंती त्यांनी केली.

 

कोविड-19 आर्थिक प्रतिसाद कृती दल

या महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, कोविड-19 आर्थिक प्रतिसाद कृती दल स्थापनेची घोषणा पंतप्रधानांनी केली. आव्हानांचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने, हे दल, विविध संबंधीतांशी सल्लामसलत करून निर्णय घेईल. या निर्णयांच्या अंमलबजावणीची खातरजमाही हे कृती दल करेल.

व्यापारी वर्ग आणि उच्च उत्पन्न गटातला व्यक्तींनी, आपण ज्यांच्याकडून सेवा घेतो अशा, कमी उत्प्पन्न गटातल्या व्यक्तींच्या आर्थिक गरजा लक्षात घेत, हा वर्ग लॉकडाऊनच्या काळात कामावर उपस्थित राहू शकला नाही त्या काळातले त्यांचे वेतन कापू नये असे आवाहन  पंतप्रधानांनी केले. अशा काळात मानवतावादी दृष्टिकोनावर त्यांनी भर दिला.

 

पीएम केअर्स फंड

कोविड-19 महामारी सारख्या आपत्कालीन परिस्थितीत, बाधीताना दिलासा देण्यासाठी समर्पित राष्ट्रीय निधीची गरज लक्षात घेऊन प्राईम मिनिस्टर्स सिटीझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड निर्माण करण्यात आला आहे.

 

1.7 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज

गरिबांना लवकर रक्कम हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदी सरकारने, 26 मार्चला 1.7 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीत या जनतेला सहाय्य करण्यासाठी 3 महिन्यांचे अन्नधान्य, डाळीं आणि गॅसचा, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत पुरवठा करण्याचा यामध्ये समवेश आहे.

 

डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत बैठक

24 मार्चला पंतप्रधानांनी, डॉक्टर्स, परिचारिका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञाशी संवाद साधला. कोविड-19 संदर्भात राष्ट्राची निस्वार्थी सेवा करत असल्याबद्दल त्यांनी वैद्यक विश्वाचे आभार मानले.

तुमच्या आशावादी दृष्टीकोनाने या लढ्यात राष्ट्र विजयी होईल असा मोठा आत्मविश्वास माझ्यासह राष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे असे ते म्हणाले. वैद्यक विश्वाची सुरक्षितता सर्वात महत्वाची असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार सर्वतोपरी पावले उचलेल असे आश्वासन त्यांनी दिले.

 

औषध निर्माण क्षेत्रासमवेत बैठक

औषध आणि वैद्यकीय साधनांचा पुरवठा नियमित राखण्यासाठी पंतप्र्धांनी, 21 मार्चला औषध निर्माण प्रतिनिधीसमवेत बैठक घेतली. कोविड-19 च्या निदानासाठी आरएनए निदान संचाची युध्द पातळीवर निर्मिती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आवश्यक औषधांचा पुरवठा सुरळीत राखणे महत्वाचे असून काळाबाजार आणि साठेबाजी रोखणेही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

आयुष व्यावसायिकांसमवेत  बैठक

आयुष व्यावसायिकांसमवेत पंतप्रधानांनी 28 मार्चला बैठक घेतली. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आयुष क्षेत्राचे महत्व अनेक पटींनी वाढल्याचे ते म्हणाले.

या खडतर काळात, मन तणावमुक्त आणि शांत राखण्यासाठी, #YogaAtHome ला प्रोत्साहन देत असल्याबद्दल त्यांनी आयुष मंत्रालायाची प्रशंसा केली.

 

राज्यांसमवेत समन्वयाने काम

20 मार्चला पंतप्रधानांनी राज्यांच्या मुख्यमंत्रांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या  माध्यमातून संवाद साधला. या महामारीला आळा घालण्यासाठी, त्याच्या प्रसारावर लक्ष ठेवण्यासाठी, केंद्र सरकार  आणि राज्य सरकारांनी समन्वयाने काम कण्याचे आवाहन त्यांनी केले.

काळा बाजार आणि  अवाजवी  किमती रोखण्यासाठी, राज्यांच्या  मुख्यमंत्र्यांनी व्यापारी संघटनांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून संवाद करावा अशी सूचनाही त्यांनी केली.

 

सार्क  देशांची एकजूट

प्रादेशिक सल्लामसलत आणि चर्चा करण्यासाठी सार्क नेत्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या  माध्यमातून संवाद साधण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम केली. भारताच्या नेतृत्वाखाली 15 मार्चला सार्क नेत्यांची बैठक झाली.

कोविड-19 आपत्कालीन निधी निर्माण करून सर्वांनी स्वेच्छेनेत्यासाठी योगदान देण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. यासाठी भारताने प्रारंभिक 10 दशलक्ष डॉलर्सचे योगदान दिले आहे. तातडीच्या बाबींसाठी भागीदार राष्ट्रांना या निधीचा वापर करता येईल.

 

असामान्य व्हर्च्युअल जी-20 परिषद

कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी 26 मार्चला असामान्य व्हर्च्युअल जी-20 परिषद आयोजित करण्यात आली होती. याआधी पंतप्रधानांनी या विषयावर सौदी अरेबियाच्या युवराजांशी संवाद साधला. मानवतेच्या कल्याणासाठी नव्या जागतिकीकरणाचा प्रारंभ करण्यासाठी मदतीची साद त्यांनी जागतिक नेत्यांना घातली.

 

आंतरराष्ट्रीय प्रयत्न

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेत्यनाहू यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्चला दूरध्वनीवर संवाद साधला. तर 17 मार्चला सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली.

25 मार्चला पंतप्रधानांनी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी तर 26 मार्चला अबू धाबीचे युवराज महंमद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी तसेच कतारच्या युवराजांशीही  दूरध्वनीवरून संवाद साधला.

 

अडकलेल्या नागरिकांना सहाय्य

कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या चीन, इटली, इराण यासह जगातल्या इतर देशात अडकलेल्या आपल्या सुमारे 2000 नागरिकांची भारताने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुटका केली.

 

 

 

G.Chippalkatti/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1608997) Visitor Counter : 209


Read this release in: English