पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड -19 या जागतिक घोषित 'महामारी' संदर्भात सार्वजनिक उपाययोजनांसाठी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

Posted On: 24 MAR 2020 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 मार्च 2020

नमस्कार!!

माझ्या प्रिय देशवासियांनो,

मी आज पुन्हा एकदा, कोरोना वैश्विक महामारीविषयी बोलण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्यामध्ये आलो आहे. दि. 22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’चा आपण सर्वांनी ‘एक राष्ट्र’ म्हणून जो संकल्प केला होता, तो संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रत्येक भारतवासियाने अगदी संवेदनशीलपणानं आणि संपूर्ण जबाबदारीनं आपलं योगदान दिलं. अबालवृद्ध, लहान, मोठे, ज्येष्ठ नागरिक,गरीब, मध्यम, प्रत्येक वर्गातले लोक, अगदी सर्वच्या सर्व लोक या कठीण परीक्षेच्या काळात एक झाले. जनता कर्फ्यूला प्रत्येक भारतवासियाने यशस्वी बनवलं. एका दिवसाच्या जनता कर्फ्यू द्वारे भारताने दाखवून दिलं की, ज्यावेळी देशावर संकट येतं, ज्यावेळी मानवतेवर संकट येतं, त्यावेळी आम्ही सर्व भारतीय मिळून, एकजूट होतो. कशा प्रकारे त्या आपत्तीला तोंड देतो, हे आपण सर्वांनी दाखवून दिलं.

आपण सर्वजणांनी  ‘जनता कर्फ्यू’ यशस्वी करून दाखवला, त्याबद्दल तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात.

मित्रांनो, आता कोरोना वैश्विक महामारी आणि त्याविषयी संपूर्ण दुनियेमध्ये काय सुरू आहे, याविषयी येत असलेल्या बातम्या तुम्ही ऐकत आहात आणि पहातही आहात. आपण हेही पाहत आहात की, या जगातल्या सर्वात सामर्थ्‍यवान असलेल्या, महाशक्तिशाली देशांनाही या महामारीनं  अगदी नाकीनऊ आणलं आहे. अगदी लाचार बनवलं आहे. हे देश या आजाराच्या संकटाला परतवून लावण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत, असं नाही. किंवा या देशांकडे साधनसामुग्रीची कमतरता आहे, असंही नाही. परंतु कोरोना विषाणूचा इतका वेगानं प्रसार होत आहे की, सर्वांनी  पुरेशी तयारी केलेली असतानाही  आणि अनेक प्रयत्न केले जात असतानाही कोरोना आजाराच्या संकटाचे आव्हान दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.

या सर्व देशांमध्ये दोन महिन्यात घडलेल्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर जो निष्कर्ष निघतोय, आणि या क्षेत्रातले तज्ञही असंच म्हणत आहेत की, या वैश्विक महामारी कोरोनाला तोंड देण्यासाठी म्हणजेच या आजाराविरूद्ध एकमेव प्रभावी पर्याय, तोडगा आहे. तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर राखणे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे एकमेकांपासून दूर राहणे. आपल्या घरांमध्येच बंद राहणे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. आणखी दुसरी कोणतीही पद्धत नाही. एकमेकांपासून दूर राहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कोरोनाचा प्रसार होणे थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी त्याच्या संक्रमणाचे जे चक्र आहे, ते चक्र आपल्याला तोडावेच लागणार आहे.

काही लोक अगदी चुकीच्या समजुती मनाशी बाळगून आहेत. सोशल डिस्टन्सिंग केवळ जे लोक आजारी आहेत, त्यांच्यासाठी आहे, असं त्यांना वाटतं. मात्र ही समजूत अजिबात योग्य नाही. ती गैरसमजूत आहे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सामाजिक अंतर राखणं, हे प्रत्येक नागरिकासाठी आहे. प्रत्येक कुटुंबासाठी आहे. परिवारातल्या प्रत्येक सदस्यासाठी आहे. अगदी पंतप्रधानांसाठीही आहे.

काही लोकांची बेपर्वा वृत्ती, काही लोकांमध्ये असलेली गैरसमजूत- तुम्हाला, तुमच्या मुलांना, तुमच्या माता-पित्यांना, तुमच्या परिवाराला, तुमच्या मित्रांना, स्नेहींना, आणि पुढे जावून संपूर्ण देशाला खूप मोठ्या संकटाच्या खाईत लोटू शकेल. जर अशा प्रकारे कुणी बेपर्वाईने वागणं सुरू ठेवलं तर भारताला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. आणि ही किंमत नेमकी किती मोजावी लागेल, त्याचा अंदाज लावणेही खूप अवघड आहे.

मित्रांनो, गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या अनेक भागांमध्ये ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेले आहे. राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांना अतिशय गांभिर्यानं सर्वांनी घेतलं पाहिजे. आरोग्य क्षेत्रातले तज्ञ आणि गेल्या काही दिवसात इतर देशांना आलेल्या अनुभवांचा विचार करून देश आज एक महत्वपूर्ण निर्णय घेणार आहे.

आज रात्री, आज मध्यरात्री 12.00 वाजल्यापासून संपूर्ण देशामध्ये, अगदी लक्षपूर्वक ऐका- संपूर्ण देशामध्ये आज मध्यरात्री बारा वाजल्यापासून पूर्णपणे ‘लॉकडाऊन’ करण्यात येईल. हिंदुस्थानला वाचवण्यासाठी, हिंदुस्थानच्या प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुम्हाला वाचवण्यासाठी, तुमच्या परिवाराला वाचवण्यासाठी, आज रात्री 12.00 वाजल्यापासून घरातून बाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. देशातल्या प्रत्येक राज्यांना, सर्व केंद्रशासित प्रदेशांना, प्रत्येक जिल्ह्यांना, प्रत्येक गाव, नगर, शहर, खेडी, वाडे-वस्ती, गल्ली-बोळ, अशा सर्वांना ‘लॉकडाऊन’ करण्यात येणार आहे. ही एकप्रकारे संचारबंदीच आहे. जनता कर्फ्यूपेक्षाही काही पावले पुढे जाणारी ही संचारबंदी आहे. जनता कर्फ्यूपेक्षाही जरा जास्त कडक, कठोर असणार आहे. कोरोना महामारीच्या विरोधात आता निर्णायक लढा देण्यासाठी ही पावले उचलणे अतिशय गरजेचं आहे. निश्चित स्वरुपात या लॉकडाऊनची एक आर्थिक किंमत देशाला मोजावी लागणार आहे. मात्र, एकेक भारतीयाचा जीव वाचवायचा आहे, तुमचा जीव वाचवायचा आहे, तुमच्या कुटुंबाचा जीव वाचवायचा आहे, हीच यावेळी माझी, भारत सरकारची, देशाच्या राज्य सरकारची, प्रत्येक स्थानिक शासन संस्थेची सर्वात मोठी प्राधान्यक्रमाची बाब आहे. माझी तुम्हाला विनंती आहे आणि मी हात जोडून तुम्हाला विनंती करत आहे की यावेळी तुम्ही देशात कुठेही असाल तिथेच राहा. सध्याची स्थिती पाहाता देशात हा लॉकडाऊन 21 दिवसांचा असेल, तीन आठवड्यांचा असेल. यापूर्वी मी जेव्हा तुमच्याशी बोललो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की मी तुमच्याकडून काही आठवडे मागण्यासाठी आलो आहे. आगामी 21 दिवस प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आरोग्य विशेषज्ञांचा सल्ला लक्षात घेतला तर कोरोना विषाणूच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी कमीत कमी 21 दिवसांचा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. जर या एकवीस दिवसात आपण काळजी घेतली नाही तर देश आणि तुमचे कुटुंब 21 वर्षे मागे जाईल. जर या एकवीस दिवसात आपण काळजी घेतली नाही तर अनेक कुटुंबे कायमची उद्ध्वस्त होतील आणि मी ही गोष्ट एक पंतप्रधान या नात्याने नव्हे तर तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून सांगत आहे. म्हणून बाहेर पडणे काय असते हे आगामी 21 दिवसांसाठी विसरुन जा. घरातच राहा.... घरातच राहा आणि एकच काम करा ते म्हणजे आपल्या घरातच राहा. मित्रांनो, आजच्या निर्णयामुळे देशव्यापी लॉकडाऊनमुळे तुमच्या घराच्या बाहेर एक लक्ष्मणरेषा आखली गेली आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की घराच्या बाहेर पडणारे तुमचे एक पाऊल, तुमचे केवळ एक पाऊल कोरोनासारख्या गंभीर महाआजाराला तुमच्या घरात प्रवेश देईल. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेकदा कोरोनाने बाधित झालेली व्यक्ती सुरुवातीला अगदी सामान्य आणि निरोगी दिसते. ती व्यक्ती बाधित आहे हे कळतसुद्धा नाही. म्हणूनच काळजी घ्या, आपल्या घरातच राहा. तसं पाहायला गेलं तर जे लोक घरात आहेत ते लोक समाज माध्यमांवर नवनव्या पद्धतीने, नावीन्यपूर्ण प्रकाराने ही गोष्ट लोकांना सांगत आहेत. एक बॅनर मला सुद्धा आवडला. अतिशय कमी शब्दात एक महत्त्वाचा संदेश देणारा हा बॅनर मला तुम्हाला दाखवायचा आहे. को- रो- ना म्हणजे कोई – रोडपर – ना निकले, को रो ना म्हणजे  कोई रोड पर ना निकले. विशेषज्ञांचे असे देखील सांगणे आहे की आज जर एखादी व्यक्ती कोरोनामुळे बाधित झाली असेल तर तिच्या शरीरात याची लक्षणे दिसेपर्यंत अनेक दिवस निघून जातात. या काळात ती व्यक्ती जाणते अजाणतेपणे तिच्या संपर्कात येणाऱ्या अनेक लोकांना संक्रमित करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार या आजाराने बाधित असलेली एक व्यक्ती, नीट ऐका केवळ एक व्यक्ती आठवडाभरात- दहा दिवसात शेकडो लोकांपर्यत हा आजार पसरवते. म्हणजेच हा रोग एखाद्या वणव्याप्रमाणे पसरत जातो. जागतिक आरोग्य संघटनेची आणखी एक आकडेवारी आहे. अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो जगभरात कोरोना विषाणूची सर्वप्रथम एक लाख लोकांना लागण व्हायला 67 दिवस लागले. म्हणजेच एक लाख लोकांपर्यंत पोहोचायला 67 दिवस, त्यानंतर केवळ 11 दिवस, केवळ 11 दिवसात आणखी एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली म्हणजे दोन लाख लोकांना. जरा विचार करा पहिल्या एक लाख लोकांना लागण व्हायला 67 दिवस आणि त्यानंतर ही संख्या दोन लाख व्हायला केवळ 11 दिवस. त्यानंतर ही बाब आणखी भयावह आहे की दोन लाख लोकांपासून तीन लाख लोकांपर्यंत या रोगाचा फैलाव व्हायला केवळ चार दिवस लागले. तुम्ही कल्पना करू शकता की कोरोना विषाणूचा फैलाव किती झपाट्याने होऊ शकतो आणि जेव्हा याचा फैलाव होऊ लागतो तेव्हा त्याला आवर घालणं अतिशय अवघड होतं. मित्रांनो, याच कारणामुळे चीन, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इराण सारख्या अनेक देशामध्ये ज्यावेळी कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाला तेव्हा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि हे देखील लक्षात ठेवा इटली असो किंवा अमेरिका, त्यांची आरोग्य सेवा, त्यांची रुग्णालये, त्यांची अत्याधुनिक संसाधने, संपूर्ण जगभरात सर्वोत्तम आहेत. त्यांची व्यवस्था सर्वोत्तम मानली जाते. असे असूनही या देशांना कोरोनाचा प्रभाव कमी करता आला नाही. या परिस्थितीत असा प्रश्न निर्माण होतो की या परिस्थितीमध्ये आशेचा किरण कुठे आहे? उपाय काय आहे? कोणता पर्याय आहे? कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आशेचा किरण हा आहे की ज्या देशांनी या संकटाला तोंड दिले आहे त्यांच्याकडून मिळालेला अनुभव. म्हणजे ज्या देशांनी या संक्रमणावर नियंत्रण मिळवले. अनेक आठवडे या देशातील नागरिक घराबाहेर पडले नाहीत. या देशातल्या नागरिकांनी शत प्रतिशत, शंभर टक्के सरकारी निर्देशांचे पालन केले आणि म्हणून हे काही देश या महामारीच्या विळख्यातून बाहेर पडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. आपल्याला देखील हे धरून चालले पाहिजे की आपल्यासमोर केवळ आणि केवळ हाच एकमेव मार्ग आहे. एषाः पंथाः आपल्याला घरातून बाहेर पडायचे नाही, मग काही झाले तरी चालेल, घरातच राहायचे आहे, सोशल डिस्टन्सिंग. पंतप्रधानांपासून गावातील सर्वसामान्य नागरिकापर्यंत सर्वांचा कोरोना पासून तेव्हाच बचाव होऊ शकतो, जेव्हा घराच्या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन होणार नाही. आपल्याला या महामारीचा फैलाव थांबवायचा आहे. या विषाणू संक्रमणाची साखळी तोडायची आहे. मित्रांनो, भारत आज त्या टप्प्यावर आहे जिथे आपली सध्याची कृती हे निश्चित करणार आहे की या महाभयंकर आपत्तीच्या प्रभावाला आपण किती कमी करू शकतो. ही वेळ आपला संकल्प वारंवार मजबूत करण्याची आहे, ही वेळ पावलो पावली संयम पाळण्याची आहे, जान है तो जहान है हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे. मित्रांनो ही धैर्य आणि शिस्त दाखवण्याची वेळ आहे. जोपर्यंत देशात लॉकडाऊनची स्थिती आहे आपल्याला आपला संकल्प पाळायचा आहे. आपले वचन पाळायचे आहे.

माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की घरात राहून तुम्ही अशा लोकांचा विचार करा, त्यांच्यासाठी मंगल कामना करा, प्रार्थना कराजे आपलं आयुष्य धोक्यात घालून तुम्हाला वाचवण्यासाठी काम करत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, निमवैद्यकीय क्षेत्रातले कर्मचारी, पॅथॉलॉजि   कर्मचारी जे या साथीच्या आजारापासून एक एक जीव वाचविण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.

रुग्णालय प्रशासनातील व्यक्ती, रुग्णवाहिकांचे वाहन चालक, वॉर्ड बॉईज आणि त्या सफाई कर्मचाऱ्यांचा विचार करा, जे या कठीण परिस्थितीत इतरांची सेवा करीत आहेत. आपण त्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करा, जे आपल्या गृहनिर्माण संस्था, आपल्या परिसरातील गल्ल्या, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहेत, या विषाणूला नामशेष करण्यासाठी झटत आहेत. आपणा सर्वांना योग्य माहिती देण्यासाठी चोवीस तास काम करणाऱ्या प्रसारमाध्यमातील लोकांचाही विचार करा, जे संसर्गाची जोखीम पत्करून रस्त्यांवर, रुग्णालयांमध्ये वावरत आहेत. आपण आपल्या सभोवतालच्या पोलिसांबद्दल विचार करा, जे आपल्या स्वतःच्या घराची, कुटुंबाची काळजी करण्याऐवजी आपल्या रक्षणासाठी, आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. अनेकदा ही मंडळी काही लोकांच्या रोषालाही बळी पडतात.

मित्रांनो, कोरोना या विषाणूजन्य साथीमुळे जागतिक स्तरावर उद्भवलेल्या या परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारे वेगाने कार्य करीत आहेत. दैनंदिन आयुष्यात लोकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी निरंतर प्रयत्न करीत आहेत. सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत रहावा यासाठी, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत आणि यापुढेही केल्या जाणार आहेत. संकटाचा हा काळ गरिबांसाठी फारच बिकट आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांबरोबरच समाजातील इतर संघटना, नागरी समाजातील काही व्यक्तीही गरिबांच्या अडचणी कमी व्हाव्यात यासाठी निरंतर प्रयत्नशील आहेत. गरिबांच्या मदतीसाठी अनेक जण साथ देत आहेत.

मित्रहो, आयुष्य जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व बाबींसह, जीवन वाचवण्यासाठी, आयुष्य वाचविण्यासाठी जे जे आवश्यक आहे, त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावेच लागेल. या जागतिक साथीचा मुकाबला करण्यासाठी, देशात आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे काम केंद्र सरकार सातत्याने करीत आहे. जागतिक आरोग्य संघटना, देशातील नावाजलेल्या वैद्यकीय संशोधन संस्था तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला आणि सूचनांनुसार सरकारने सातत्याने निर्णय सुद्धा घेतले. आता कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी, देशाच्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, केंद्र सरकारने आज 15000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे कोरोनाशी संबंधित चाचण्यांची सुविधा, वैयक्तिक सुरक्षाविषयक उपकरणे, आयसोलेशन बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणांची संख्या तातडीने वाढवली जात आहे. त्याचबरोबर वैद्यकीय आणि पॅरा वैद्यकीय (पॅरामेडिकल) मनुष्यबळ प्रशिक्षणाचे कामसुद्धा केले जाणार आहे. या वेळी सर्व राज्यांनी आरोग्य सेवेलाच प्राधान्य दिले पाहिजे, अशी विनंती मी सर्व राज्य सरकारांना केली आहे. संकट आणि संक्रमणाच्या या काळात देशातील खाजगी क्षेत्र सुद्धा खांद्याला खांदा भिडवून, सर्व देशवासियांना सोबत ठामपणे उभे  आहे, याचे मला मनापासून समाधान वाटते. खाजगी प्रयोगशाळा, खाजगी रुग्णालये, सर्वच, आव्हानाच्या या कठीण प्रसंगी सरकारच्या सोबत काम करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

मात्र मित्रहो, एक गोष्ट लक्षात असू द्या की अशावेळी कळत-नकळत अफवांचे सुद्धा पीक  येत राहते. या अफवा पसरण्याचा वेग सुद्धा फार मोठा असतो. आपण कोणत्याही प्रकारच्या अफवेवर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आपण सर्वांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि वैद्यकीय पेशातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे आणि सूचनांचे पालन करणे, फार गरजेचे आहे. या आजाराची लक्षणे दिसू लागली तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका, अशी प्रार्थना मी आपणा सर्वांना करतो. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा जीवघेणा ठरू शकतो.

मित्रहो, संकटाच्या या काळात प्रत्येक भारतीय व्यक्ती, सरकार तसेच स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करेल, असा विश्वास मला वाटतो. 21 दिवसांचा लॉक डाऊन काळ आहे, दीर्घ काळ आहे, मात्र आपले आयुष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हे गरजेचे आहे, आपल्याकडे हाच एकमेव मार्ग आहे. प्रत्येक भारतीय व्यक्ती या संकटाचा समर्थपणे मुकाबला करेल आणि या कठीण काळावर विजय मिळवेल, असा विश्वास मला वाटतो. आपण आपली काळजी घ्या, आपल्या माणसांची काळजी घ्या. आत्मविश्वासासह, सर्व नियमांचे पालन करीत, संपूर्ण संयम बाळगत, विजयाचा संकल्प करीत आपण सर्वजण या बंधनांचा स्वीकार करू या. आपणा सर्वांचे अनेकानेक आभार.

 

B.G/G.C/S.B/S.P/R.A/M.P/P.M

 

 

 



(Release ID: 1608010) Visitor Counter : 556


Read this release in: English