निती आयोग

लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नीति आयोग आराखडा तयार करणार


भारतीय लोकसंख्या संस्थेसोबत उद्या यासंदर्भात बैठक

Posted On: 19 DEC 2019 6:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2019

 

‘कोणालाही वंचित न ठेवता, लोकसंख्या स्थिरीकरणासंदर्भातला दृष्टिकोन समजून घेणे’ या विषयावर नीति आयोगाने उद्या एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. भारतीय लोकसंख्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत भारताचे लोकसंख्या धोरण आणि कुटुंबनियोजन कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्याविषयी चर्चा होणार आहे. या विषयातले तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी होतील. या बैठकीतल्या चर्चेनंतर ज्या शिफारसी केल्या जातील, त्यांच्या आधारावर नीति आयोग लोकसंख्या स्थिरीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा आराखडा तयार करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात याची घोषणा केली होती.

या आराखड्यात कुटुंबनियोजनकार्यक्रमात राहिलेल्या महत्वाच्या त्रुटींवर काम केले जाणार आहे. त्याशिवाय कुमारवयीन आणि तरुणांवर भर देऊन प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी विशेष शिफारसी केल्या जातील. कुटुंबनियोजन कार्यक्रमाचा प्रसार आणि जागृती करण्याबाबत नव्या योजना तयार केल्या जातील.

भारताची लोकसंख्या सध्या 137 कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत आपण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहोत. देशातला सरासरी जन्मदर कमी झाला असला, तरीही आज 30 टक्के लोकसंख्या युवकांची असल्यामुळे भारताची लोकसंख्या आजही वाढतेच आहे. या पार्श्वभूमीवर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

 

 

B.Gokhale/R.Aghor/D.Rane



(Release ID: 1596989) Visitor Counter : 192


Read this release in: English