गृह मंत्रालय
भारताच्या शेजारी मित्र राष्ट्रांलगतच्या असलेल्या सीमांचा देशविघातक कृत्यांसाठी गैरवापर होणार नाही, याची सशस्त्र सीमादलाने काळजी घ्यावी: अमित शहा
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2019 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2019
भारताच्या शेजारी मित्र राष्ट्रांना लागून असलेल्या सीमांचा देशविघातक कृत्यांसाठी वापर होणार नाही याची काळजी सशस्त्र सीमादलाने घ्यायला हवी, तसेच सीमा रेषेलगतच्या रहिवाश्यांना अशा कृत्यांचा त्रास होणार नाही, यासाठी दक्ष असायला हवे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले.ते आज नवी दिल्लीत सशस्त्र सीमादलाच्या 56व्या पथसंचलन कार्यक्रमात बोलत होते. भारताला नेपाळ आणि भूतान या मित्र राष्ट्रांची 2450 किलोमीटरची सीमा आहे. या सीमेवरुन एकही घूसखोर भारतात येऊ शकणार नाही, याची काळजी घेतली जावी, असे ते म्हणाले. गेल्या वर्षभरात सीमादलाने 50 घूसखोरांना पकडले तसेच अनेक अवैध वस्तू तसेच अंमली पदार्थ जप्त केल्याबद्दल त्यांनी सैन्य दलाचे कौतुक केले.

सशस्त्र सीमादल अधिक बळकट करण्यासाठी तसेच सध्या असलेल्या सैनिकांवरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी 2020 च्या अखेरपर्यंत 12 हजार रिक्त पदे भरली जातील, असे शहा यांनी सांगितले. सशस्त्र सैन्य दलासाठी सरकार राबवत असलेल्या कल्याणकारी योजनांची त्यांनी माहिती दिली. सैनिक वर्षातले 100 दिवस तरी आपल्या कुटुंबासोबत घालवू शकेल, याची काळजी सरकार घेईल असे आश्वासन त्यांनी दिले. नक्षल प्रभावित भागांमध्ये सशस्त्र सीमादलाच्या सैनिकांच्या मुलांसाठी अधिकाधिक शाळा उभारण्यासह अनेक सुविधांचा त्यांनी उल्लेख केला. सशस्त्र सेना दल अविरत देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सज्ज असते. प्राणांची परवा न करता हे सैनिक देशासाठी प्रसंगी सर्वोच्च बलिदान देतात, अशा शब्दात शहा यांनी सशस्त्र सेना दलाचा गौरव केला.


B.Gokhale/R.Aghor/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1596988)
आगंतुक पटल : 122
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English