पंतप्रधान कार्यालय

मुंबईत 7 सप्टेंबर 2019 रोजी विविध विकासप्रकल्पांच्या उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

Posted On: 07 SEP 2019 9:33PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2019

 

माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

नमस्कार मुंबईकर!

गणपती बाप्पा मोरया ! गणपती बाप्पा मोरया !

इथे येण्यापूर्वी मला पार्ल्यातल्या लोकमान्य सेवा संघाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले. हे वर्ष लोकमान्य सेवा संघाच्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्षही आहे. लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र करण्यासाठी, संघटीत करण्यासाठी ज्या परंपरेचा विस्तार केला, त्या उत्सवाचा गजर आज देश विदेशातही घुमतो आहे.

आपले नवे राज्यपाल देखील आज इथे आले आहेत, श्री कोश्यारी जी. खूप कमी लोकांना माहित असेल कि ते उत्तराखंडचे अत्यंत यशस्वी मुख्यमंत्री होते. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट, जी सांगायला मला अभिमान वाटतो की जेव्हा मी भारतीय जनता पार्टीच्या संघटनेचं काम करायचो, तेव्हा एकदा उत्तराखंडचा प्रभारी होतो, त्यावेळी मी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम केले होते.

मित्रांनो, मुंबई आणि महाराष्ट्राच्या लोकांचा साधेपणा आणि स्नेह मला नेहमीच भारावून टाकतो. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मी महाराष्ट्राच्या अनेक शहरांचा दौरा केला, तुम्हा सर्वांशी संवाद साधला. मुंबईत तर रात्री जी सभा झाली होती, तिची चर्चा बरेच दिवस सुरु होती. या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे.  

आज इथे सारखे बदलणारे ऋतुमान असतांनाही तुम्ही सगळे वेळात वेळ काढून इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. तुमचा हा उत्साह, तुमच्या वृत्तीचाच प्रत्यय देत आहे, तुमच्या स्वप्नांच्या आकांक्षेचे संकेत देणारा आहे.

मित्रांनो, मी रशियात होतो, तेव्हाही मला मुंबईची खबरबात कळत होती. मी काल सकाळीच तिकडून परतलो आणि कालच संध्याकाळी बंगळूरूला गेलो. बंगळूरूला रात्रभर मी इस्रोच्या शास्त्रज्ञासोबत होतो. त्यांनी जी हिम्मत दाखवली आहे, ती बघून मी अत्यंत प्रभावित झालो. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी दिवसरात्र कशी मेहनत घेतली जाते, अत्यंत विपरीत परिस्थितीतही, मोठ्यात मोठ्या आव्हानाचा सामना करतांनाही कशी आपल्यां उद्दिष्टांची पूर्तता केली जाते, हे आपण आपल्या शास्त्रज्ञाकडून, आपल्या इंजीनियर्सकडून शिकू शकतो. 

बंधू आणि भगिनींनो, आपले शास्त्र म्हणजे ज्ञानाचे भांडारच आहेत. भ्रतुर्हारी यांनी म्हंटले होते-

प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः ,

प्रारभ्य विघ्नविहिता विरमन्ति मध्याः ।

विघ्नै: पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः ,

प्रारभ्य च उत्तमजनाः न परित्यजन्ति ।।

म्हणजेच, कोणतेही उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करणारे लोक तीन प्रकारचे असतात. सर्वात खालच्या पायरीवर असे लोक असतात, जे अडचणींना घाबरून कधी कामांची सुरुवातच करत नाहीत. त्यानंतर मधल्या पायरीवरचे लोक असतात, जे काम सुरु तर करतात, मात्र एखादी अडचण आली की घाबरून पळून जातात. या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या पलीकडे, त्यांच्यापेक्षा उच्च पातळीवर तिसऱ्या प्रकारचे लोक असतात. जे अनेक अडथळे आले तरीही आपल्या ध्येयपूर्तीचे प्रयत्न सोडत नाहीत, मोठी आव्हाने आली तरीही त्यांचे अविरत प्रयत्न सुरुच असतात आणि आपले धेय्य प्राप्त झाल्यावरच ते स्वस्थ बसतात.

मित्रांनो,

इस्रो आणि त्या संस्थेसोबत काम करणारी माणसं ही तिसऱ्या प्रवृत्तीवाली माणसे आहेत. जोवर आपले उद्दिष्ट प्राप्त करत नाहीत, तोवर ते ना उसंत घेत,ना थकत आणि ना विश्रांती घेत. आता आज चांद्रयान मोहिमेत आलेला एक अडथळा आपण पाहिला. मात्र इस्त्रोचे शास्त्रज्ञ तोपर्यत थांबणार नाहीत, जोपर्यत ते आपल्या ध्येयापर्यत पोहचत नाहीत. चंद्रावर पोहचण्याचे आपले स्वप्न निश्चितच पूर्ण होणार आहे.

आणि मित्रांनो, आपल्याला हे ही लक्षात घ्यायचे आहे की चांद्रयानासोबत पाठवलेला ओर्बीटर आजही तिथेच असून चंद्राला प्रदक्षिणा मारतो आहे. ही देखील एक ऐतिहासिक कामगिरीच आहे. मी मुंबईच्या लोकांच्या उत्साहाबद्दल, त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल खूप ऐकले आहे, स्वतः पहिले आणि अनुभवलेही आहे. आज इस्त्रोमधल्या लोकांमध्ये मला तेच उत्साह दिसला, त्यामुळे तुम्हालाही ही गोष्ट सांगावीशी वाटली.

बंधू-भगिनीनो, आपल्या संकल्पांच्या पूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची वृत्ती, गणेशोत्सवाचा उत्साह अशा वातावरणात महाराष्ट्रात आज हजारो कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभ होत आहे, श्रीगणेशा होत आहे.

मुंबईनंतर मी औरंगाबादलाही जाणार आहे. तिथेही अनेक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. मी विशेषतः मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो. आज इथून 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची कामे सुरु होत आहेत. नवी मेट्रो लाईन असो, मेट्रो भवन असो, मेट्रो स्टेशनात सुविधांचा विस्तार असो, वांद्रे-कुर्ला संकुलाला पूर्व द्रुतगती मार्गाशी जोडण्याचा प्रकल्प असो, या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई शहराला नवे आयाम तर मिळतीलच; त्यासोबत, इथल्या जनतेचे आयुष्य सुखकर होण्यासही त्यामुळे मदत मिळेल.

वांद्रे-कुर्ला संकुलाला पूर्व द्रुतगती मार्गाशी जोडण्याच्या प्रकल्पामुळे तर लाखो नोकरदार-व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

वांद्रे-कुर्ला संकुल तर व्यावसायिक कामांचे मोठे केंद्र आहे. इथे येणे-जाणे आता आणखी सोपे होणार आहे, कमी वेळात होणार आहे. आता सगळे जण म्हणताहेत, मुंबई काही मिनिटांच्या अंतरावर ! या सर्व प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वाना, प्रत्येक मुंबईकराला खूप खूप धन्यवाद देतो.

मित्रांनो, मुंबई असं शहर आहे ज्याच्या वेगाने देशालाही गती दिली आहे. इथले कष्टकरी लोक, इथला व्यावसायिक वर्ग, इथल्या माता-भगिनी, युवक सगळे लोक या शहरावर प्रेम करतात. अभिमानाने सांगतात-मी मुंबईकर ! गेल्या पाच वर्षात, आमची मुंबई च्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, विकसित करण्यासाठी आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले आहेत. फडणवीस यांच्यां सरकारने मुंबई आणि महाराष्ट्रातील एकेका प्रकल्पासाठी किती मेहनत घेतली आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे आज मुंबई शहरात हळूहळू बदल होतो आहे. आणि या सगळ्यात आणखी एक सकारात्मक बाजू ही आहे की वर्तमानासोबतच, भविष्यातील गरजांची पूर्तता करण्यासाठी, आगामी दशकातील गरजांचा विचार करुन आजच दूरगामी प्रयत्न सुरु आहेत.

बंधू आणि भगिनींनो, आज आपला देश 5 ट्रिलीयन डॉलर्स च्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करतो आहे, त्यावेळी आपल्याला आपली शहरे 21 व्या शतकाशी सुसंगत बनवावीच लागतील. मग वाहतूक व्यवस्था असो, संपर्कव्यवस्था असो, उत्पादकता, शाश्वतता असो किंवा सुरक्षितता, प्रत्येक दृष्टीने आपल्याला एक उत्तम व्यवस्था निर्माण करायला हवी आहे. याच विचाराने आमचे सरकार येत्या पाच वर्षात देशभरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च करणार आहे. या निधीतला मोठा लाभ मुंबईसह महाराष्ट्रातील संपूर्ण शहरांना मिळणार आहे.

मित्रांनो, देशभरातल्या शहरांमध्ये वाहतूक व्यवस्था, गतिशीलततेच्या सुविधा अधिक उत्तम करण्यासाठी आम्ही एकात्मिक व्यवस्थेवर भर देत आहोत. रस्ते असोत, रेल्वे असो, मेट्रो असो, दळणवळणाच्या प्रत्येक माध्यमाला आम्ही एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत.आज इथे मुंबई महानगर प्रदेशात, एक उत्तम आणि दर्जेदार  सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करण्यासाठी एक आराखडा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे येण्याजाण्यासाठीच्या वेगवेगळ्या वाहतूक माध्यमांना, म्हणजे लोकल सेवा असो, बसेस असो किंवा मेट्रो सेवा या सगळ्याचा कसा वापर करावा याविषयीची सविस्तर माहिती या आराखड्यात देण्यात आली आहे. विशेषतः मुंबई मेट्रोसाठीचा प्रमुख आराखडा अर्थात मास्टर प्लान देखील यात बनवण्यात आला आहे.

बंधू आणि भगिनीनो,

गेल्या पाच वर्षात मला मुंबई मेट्रोच्या विस्तारीकरणाशी संबंधित बाबींमध्ये सातत्याने सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. सुमारे दीड लाख कोटी रुपये खर्च करुन मेट्रोचे जाळे इथे विकसित केले जात आहे. मुंबईत सध्या केवळ 11 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आहे. मात्र, 2020, 2023 आणि 2024 पर्यत हे जाळे वाढून सव्वातीनशे किलोमीटरपेक्षा अधिक होणार आहे. याचा सर्वात मोठा लाभ असा होईल की आज जितके लोक मुंबईत लोकलनी प्रवास करतात, साधारण तेवढीच मेट्रोची क्षमता पण वाढेल. लोकलसेवा आधुनिक बनवण्यासोबतच, मेट्रोचा विस्तार , यामुळे मुंबईच्या सध्याच्या वाहतुकीच्या गरजा पूर्ण होतीलच, त्याशिवाय, भविष्यासाठीची सोय देखील होईल.  

मित्रांनो,

आपण केवळ मेट्रोची लाईन बनवतो आहोत असे नाही, तर या लाईन्सवर धावणाऱ्या मेट्रोचे डबे देखील भारतातच तयार होत आहेत. थोड्या वेळापूर्वीच मी मोकप कोच पहिला. मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणारे हे आधुनिक डबे मुंबई मेट्रो ला अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि त्याचवेळी स्वस्त, सर्वाना परवडणारी वाहतूक सेवा बनवणार आहेत.

बंधू आणि भगिनींनो, पायाभूत सुविधांचा जितका संबंध अर्थव्यवस्थेशी आहे, जीवनमान सुकर करण्याशी आहे, तितकाच संबंध रोजगाराशी देखील आहे. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा अर्थ आहे, रोजगाराच्या तितक्याच नव्या संधी निर्माण करणे. जर फक्त मुंबईत सुरु झालेल्या मेट्रोच्या कामांविषयी बोलायचं झाल्यास, केवळ या प्रकल्पांमुळे 10 हजार इंजीनीयर्स आणि 40 हजार कुशल तसेच अकुशल लोकांना रोजगाराची संधी मिळू शकेल.

  बंधू-भगिनींनो, पायाभूत सुविधांची जी कामे गावात सुरु आहेत, शहरात सुरु आहेत, त्यातून  या क स्तरावर ज्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी निर्माण होतात, छोट्या-छोट्या व्यापारांना ज्या व्यवसायाच्या संधी मिळतात, त्याची खूप चर्चा लोक करत नाहीत. कदाचित हे ही कारण असेल, की आज ज्या गतीने कामे होत आहेत, त्या गतीने आणि एवढ्या व्यापक स्तरावर आधी कामे झालीच नाहीत. त्यामुळे या बाजूकडे लोकांचे लक्ष न जाणे अगदी स्वाभाविक आहे. आता जेव्हा परिस्थिती बदलते आहे, तेव्हा ह्या विषयावर पण चर्चा सुरु होईल. विचार करा, की आधी कोणी कल्पनाही केली होती का की अनेक वर्षांपासून रखडत असलेले नवी मुंबई विमानतळाचे काम, मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम इतक्या व्यापक प्रमाणात सुरु होईल? इतक्या वेगाने पुढे जाईल? हे सगळे प्रकल्प मुंबई आणि आसपासच्या भागात रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध करत आहेत. 

बंधू आणि भगिनीनो,मी जेव्हा गती आणि व्यापक स्वरूपाविषयी बोलतो, तेव्हा माझ्याजवळ इतकी उदाहरणे असतात, की ती सांगत बसलो तर संध्याकाळ होईल. आज इथे मेट्रोचे मोठे प्रकल्प सुरु झाले आहेत तर मी त्याचेच उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. 

मित्रांनो, आपल्या देशात पहिली मेट्रो 30-35 वर्षे आधी सुरु झाली होती. त्यानंतर, 2014 पर्यंत केवळ काही मोठ्या शहरातच मेट्रो सुरु होऊ शकली. आज देशात 27 शहरात एकतर मेट्रो सुरु झाली आहे किंवा नजीकच्या भविष्यात सुरु होणार आहे. आज देशभरात मेट्रोच्या पावणे सातशे किलोमीटर्सच्या लाईन्स कार्यरत आहेत त्यापैकी 400 किलोमीटर्सची मेट्रो सेवा गेल्या पाच वर्षात सुरु झाली आहे.विचार करा, अर्ध्याहून अधिक मेट्रो सेवा गेल्या पाच वर्षात कार्यरत झाली आणि आणिखी 850 किलोमीटर्सपेक्षा जास्त मेट्रो लाईनचे काम सुरु आहे.

बंधू आणि भगिनींनो,जवळपास 600 किलोमीटर्सच्या नव्या मेट्रो लाईन्सना गेल्यां पाच वर्षात मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई असो, पुणे किंवा नागपूर मेट्रो, या सगळ्या भागात याचा पाच वर्षात ही कामे सुरु झालीत. आणि मी आज मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुक करतो, कि त्यांनी ह्या सर्व प्रकल्पांचे काम अत्यंत वेगाने सुरु केले आहे.

बंधू आणि भगिनींनो, देशात 21व्या शतकाच्या आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ते देशाच्या नव्या गतीसाठी, विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आज देशातल्या पायाभूत सुविधा सर्वसमावेशकरित्या पूर्ण विकसित करण्यावर भर दिला जातो आहे. तुकड्या-तुकड्यात नाही, तर ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ हा दृष्टीकोन घेऊन आम्ही पुढे जातो आहोत. ‘एक देश-एक पॉवर ग्रीड’ पासून ते एक देश-एक वाहतूक कार्ड पर्यत, ‘एक देश-एक कर पासून ते एक देश –एक ओप्टीकल फायबर नेटवर्क पर्यत, संपूर्ण देशभरात सरकार आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करत आहे.

बंधू आणि भगिनींनो, आपण आज ज्या कठीण परिस्थितीत आहोत, जे कष्ट आपल्याला पडत आहेत, ते कष्ट आपल्या मुलांना म्हणजेच येणाऱ्या पिढीला करावे लागू नये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण आपल्या मुलांना वारसा म्हणून समस्या, त्रास द्यायला नको. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनमानात होणारी सुधारणा हीच देशाच्या स्थितीतही सुधारणा घडवून आणत असते. आपल्याला आपले वर्तमान उत्तम करत असतांनाच, आपल्या भूतकाळातील स्वप्नांची पूर्तता करत असतांनाच भविष्याची तयारी करण्यासाठी देखील मेहनत घ्यावी लागणार आहे.आजपासूनच आपले भविष्य सुकर करण्याची तयारी आपण सुरु केली, तरच, आपली मुले-बाळे सुखी, विनासायास आयुष्य जगू शकतील. तुमच्या आशीर्वादाने नवे सरकार स्थापन झाल्यावर आमच्या सरकारने जे निर्णय घेतले ते भारतीयांचे भविष्य अधिक सुरक्षित आणि उज्ज्वल करणारे ठरणार आहेत. देशाच्या जनतेने जो जनादेश दिला आहे, त्याचा सन्मान करत योग्य दिशेने अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत . या सरकारला लवकरच 100 दिवस पूर्ण होणार आहेत. या 100 दिवसात सरकारने असे अनेक निर्णय घेतले आणि अशी कामे केलीत जी अभूतपूर्व होती, ऐतिहासिक होती. जल जीवन अभियानाची सुरुवात असो, किंवा देशाच्या प्रत्येक शेतकऱ्याला किसान-सन्मान निधी योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय असो, आपल्या मुस्लीम भगिनी-मुलींना तीन तलाकच्या संकटांपासून मुक्त करणारा कायदा असो किंवा मग बालकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कायदा, प्रत्येक क्षेत्रात अत्यंत जलद गतीने काम सुरु आहे.

मात्र सरकारचे हे निर्णय आणि कामांच्या दरम्यान, तुमची सेवा करतांनाच मी आणखी एक संकल्प केला आहे. हा संकल्प आहे जास्तीत जास्त लोकांना, जास्तीत जास्त प्रसंगांच्या निमित्ताने त्यांच्या नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांप्रती सजग करण्याचा. लोकमान्य टिळक यांनी म्हंटले होते-‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे’. आपल्या स्वातंत्र्याला आता 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि यावेळी आमच्यासाठी नवा मंत्र आहे –सुराज्य आम्हा सर्व देशवासियांचे कर्तव्य आहे. एक भारतीय-एक संकल्प यासह मी आपल्या सगळ्यांकडे प्रार्थना करतो-की आपण हा ठरवलेला संकल्प-जरूर पूर्ण करा. काहीतरी संकल्प करा, जो देशहिताचा असेल आणि तो संकल्प पूर्ण करतांना कधी मागे हटू नका. तुम्ही सगळे, मुंबईच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी जो संकल्प घेऊ शकाल, तो संकल्प करा.

तसा एक सल्ला मी ही तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही ऐकणार का? आवाज जरा हळू येतो आहे. ऐकणार? नक्की ऐकणार ना? संकल्प पूर्ण करणार? एकटे राहूनही करणार ना? एकत्र येऊन करणार का?

मित्रांनो, गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी, खूप सारे प्लास्टिक आणि इतर कचरा आपल्या समुद्रात जातो. यावेळी आपण प्रयत्न करायला हवा की जलप्रदूषण वाढवणाऱ्या वस्तू आणि कचरा आपण पाण्यात टाकणार नाही. इतकेच नाही, तर विसर्जन झाल्यावर आपण सगळे समुद्र आणि नद्यांमध्ये प्रदूषण करणारे घटक टाकू देणार नाही. आपण जल स्त्रोतांना प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न कराल. समुद्रापासून ते मिठी नदीपर्यत,आणि इअतर जलाशयांनाही प्लास्टिकमुक्त करण्याचा आपण संकल्प करू या. आपण हे काम करणार का? नक्की करणार ना? जरा मागून आवाज येऊ द्या! मला पूर्ण विश्वास आहे की तुमचा हा उत्साह संपूर्ण देशाला प्लास्टिकपासून मुक्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल.

पुन्हा एकदा विकासाच्या सर्व प्रकल्पांसाठी मी तुम्हा सर्वाचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. सण वार उत्सवांच्या या व्यस्त दिवसांमध्ये आपण सगळे इथे आलात, यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो.

जय मुंबई, जय महाराष्ट्रात।

भारत माता की - जय

भारत माता की - जय

भारत माता की - जय

खूप खूप धन्यवाद!

 

B.Gokhale/R.Aghor/P.Kor



(Release ID: 1584701) Visitor Counter : 85


Read this release in: English