पंतप्रधान कार्यालय

झारखंड येथील हजारीबाग येथे पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे अनावरण


आचार्य विनोबा भावे विद्यापीठात आदिवासी अभ्यासकेंद्राची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

Posted On: 17 FEB 2019 8:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधल्या हजारीबागला 17 फेब्रुवारी 2019 रोजी भेट दिली. झारखंडमधल्या विविध विकासकामांचे अनावरण त्यांनी केले. यावेळी झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुरमू, केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा आणि मुख्यमंत्री रघुवर दास उपस्थित होते.

यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधान म्हणाले, ‘देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या झारखंडच्या सुपूत्राला विजय सोरेंग यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. शहीदांच्या कुटुंबांची आपण पावलोपावली काळजी घ्यायची आहे.’

हजारीबाग, दुमका आणि पलामू येथील वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले. या महाविद्यालयांसाठी पंतप्रधानांनी 2017 मध्ये पायाभरणी केली होती. 885 कोटी रुपये खर्च करून ही नवी महाविद्यालये बांधण्यात आली आहेत. झारखंडमधल्या  11 जिल्ह्यातल्या 1.5 कोटी नागरिकांना याचा फायदा होणार आहे. हजारीबाग, दुकमा, पलामू आणि जमशेदपूर येथे 500 खाटांच्या रुग्णालयांसाठी पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

आरोग्य आणि पिण्याचे स्वच्छ पाणी हे एकमेकांचे अविभाज्य घटक असल्याचे सांगून रामगड आणि हजारीबाग जिल्ह्यातल्या चार ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे उद्‌घाटन केले. तसेच या भागात आणखी सहा पाणीपुरवठा योजनांसाठी पायाभरणी केली. हजारीबाग येथे 500 कोटी रुपयांच्या शहरी पाणीपुरवठा योजनेसाठी पायाभरणी पंतप्रधानांनी केली. यामुळे 56,000 घरांना सुरक्षित पेयजल मिळणार आहे.

ई-नाम अंतर्गत मोबाईल फोन खरेदी करण्यासाठीच्या शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांनी निवडक लाभार्थ्यांना धनादेश देऊन केला. पंतप्रधान म्हणाले, याचा फायदा 27 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. स्मार्टफोनच्या मदतीने शेतकऱ्यांना हवामानविषयक माहितीबरोबरच पिकांच्या किंमती, सरकारी योजना, शेतीच्या नव्या पद्धती याबाबतही माहिती मिळेल.

रामगढ येथे केवळ स्त्रियांसाठीच असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पंतप्रधानांनी ई-उद्‌घाटन केले. पूर्व भारतातले हे पहिले तर संपूर्ण देशातले हे तिसरे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. हजारीबाग येथील आचार्य विनोबा भावे विद्यापीठातल्या आदिवासी अभ्यास केंद्राची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली. आदिवासी पद्धती आणि संस्कृतीबाबत ज्ञानाचा प्रसार या केंद्रामुळे होईल असे पंतप्रधानांनी सांगितले. ‘सबका साथ सबका विकास’ यात गरीब, आदिवासी, महिला, युवा यांसह समाजातल्या सर्व घटकांचे सक्षमीकरण अपेक्षित असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

सरकारी शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी कान्हा दूध योजनेचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला. यात प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज 200 मिली दूध देण्यात येणार आहे. स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी वीरांच्या स्मृती संग्रहालय आणि स्मारकांद्वारे जतन करण्याचे प्रयत्न सरकार करत असून बिरसा मुंडा संग्रहालय हे त्याचे एक उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor


(Release ID: 1565077) अभ्यागत कक्ष : 101
Read this releasein: English